समीर,
आपल्या कडाक्याच्या भांडणानंतर तू बॅग भरून निघून गेलास.आणि वाटलं नेहमी प्रमाणे तू तुझ्या आईकडे दापोलीला गेला असशील! पण दुसऱ्याच दिवशी आईंचा फोन आला, तू घाटकोपरला जव्हेरींकडे रहातोयस.
काळजी नव्हती वाटत पण एक रुखरुख होती.
अंतराच सारख बाबा, बाबा सुरू होतं त्यामुळे असेल कदाचित आणि काय योगायोग आहे ती पहिला शब्द बोलतेय'बाबा'!
आणि काल, पंधरा दिवसांनंतर माझ्या साठी घटस्फोटाच्या वकीली नोटीशीच कुरिअर आलं.क्षणभर आत कुठेतरी काहीतरी हातातून निसटतय असं जाणवलं.पण क्षणभरच! कारण हे कधीतरी होणार ते अपेक्षितच होतं!
नोटीस शांतपणे उघडून बघितली.पण समीर, तितक्या शांतपणे नाही वाचू शकले.मनाविरूध्द डोळे वहात होते.दु:खानी नाही तर अपमानानी रडायला येत होतं.ज्याच्यावर जिवापाड प्रेम केलं त्यानं असे घाणेरडे आरोप करावे हे दु:ख डोळ्यातून वहात होतं.
मनात आल बरं झालं हे बघायला बाबा नाहीत. तुला भेटल्यावर ते म्हणाले होते 'हा मुलगा आळशी आहे.आणि त्याला अजिबात महत्त्वाकांक्षा नाहीय पण तुझ्यासाठी मी त्याला स्वीकारतोय!
आणि त्यामुळेच माझी बाजू कळावी हेच माझ्या ह्या पत्राच कारण आहे.किती तरी वेळा बोललेय पण ---
तुझा पहिला आरोप आहे की माझं आणि अक्षयच अफेअर आहे.किंबहूना नोटीशीतला शब्द आहे'अनैतिक संबंध'
समीर,अक्षय तुझा जवळचा, शाळेपासूनचा मित्र!जे.जे.मध्ये आपण तिघे भेटलो आणि आपल्या तिघांच मैत्रीच एक सुंदर नातं जुळत गेलं.
अक्षयच्या वडिलांची स्वत:ची प्रसिद्ध अॅडव्हटायझिंग एजन्सी! आर्थिकदृष्ट्या समृद्ध घरातला अक्षय आणि आपण दोघेही मध्यमवर्गीय पण हे कधीच अक्षयनी मैत्रीच्या आड येऊ दिलं नाही.
मी आणि अक्षय डिझाईनींगमध्ये तर तू चित्रकार, उत्तम फोटोग्राफर, तुझ्या रंगाची जाण,रेषांवरच प्रभूत्व तुला चित्र काढताना बघणं हा माझ्यासाठी आनंदानुभव असायचा.तुझ्या चित्रांनी मला वेड लावलं होतं.
आपलं लग्न अक्षयच्या पुढाकारामुळेच होऊ शकलं, हे तू सोयिस्कररित्या विसरलास. तुला फ्री लान्सींग करायचं होतं त्यासाठीच अक्षयने सुरवातीला तुला जव्हेरींच्या जाहिरातीच काम मिळवून दिलं. जव्हेंरीच्या महाराष्ट्रभर दागिन्यांच्या दुकानाच्या शाखा आणि बिल्डर म्हणूनही नावलौकिक! मात्र त्यांच्या एका कामावर गेली चार वर्ष तू फक्त स्वत:चा खर्च चालवतो आहेस.आणि आता तर तू त्यांच्या आश्रयाला गेला आहेस.
इतका मोठा आरोप करताना अक्षयनी तुझ्यावर केलेले उपकार तर स्मरायचे होतेस.
त्याच्या सुखी संसाराची अशी थट्टा करताना थोडातरी विचार करायचास!
तू माझ्या प्रेमाचा आणि माझ्या मैत्रीचा फार मोठा अपमान केला आहेस.
तुझा दुसरा आरोप मी तुला डाॅमिनेट करते.रोज संध्याकाळी ग्लास घेऊन बसणार्या तुला ह्या व्यसनांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न म्हणजे तुला डॉमिनेशन वाटत असेल कदाचित! पण मला सांग "आपल्या लग्नानंतर गेल्या चार वर्षांत एका तरी महिन्यात घराचा बॅंकेचा हप्ता भरलास का? कधीतरी घरखर्चासाठी पैसे दिलेस का? तरीही मी हे निमुटपणे
सहन करावं अशी तुझी अपेक्षा त्यामुळे संतापाने बडबड करणारी मी, ह्याला तू वर्चस्व गाजवणे म्हणत असशील पण मी ह्याला अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे म्हणते!
आपल्या लग्नाच्या वेळी मला उत्तम पगाराची नोकरी होती.अंतराचा जन्म झाल्यावर वर्षभर तुझी आई आपल्याकडे रहायला आली पण तुझ वागणं बघुन कायमच्या रहायला आलेल्या त्या परत दापोलीला गेल्या.वडिलांच्या मागे कष्टानी वाढवलेल्या तू त्यांना खूप निराश केलंस.
त्या गेल्यावर "मी अंतराला सांभाळणार नाही"असं तू म्हटलस आणि मी नोकरी सोडून घरातून काम सुरू केलं,आता तर सर्व घरखर्च मी त्या कामातूनच चालवतेय ह्याला वर्चस्व गाजवणं असं कोणी म्हणत असेल तर मला काही फरक पडत नाही! कारण जे फ्री लान्सीग करायचंय असं तू म्हणत होतास ते मी करून दाखवलंय.
तुझी तिसरी मागणी 'मी सध्या रहात असलेल्या घरावर तुझा पण हक्क आहे.तेव्हा घराच्या अर्ध्या किमती एवढे पैसे मी तुला द्यावेत.
आपल्या घराच डाऊन पेमेंट माझ्या बाबांनी आपल्या लग्नाची भेट म्हणून केलं होतं. कारण आपण लग्न रजिस्टर केलं.तेव्हा माझी नोकरी सुरू होती त्यामुळे उरलेल्या रकमेच कर्ज मी माझ्या नावांवर घेतलं.आणि बाबांच्या इच्छेनुसार आणि तू कमवत नसल्यामुळे घर माझ्या एकटीच्या नांवावर घेतलं.तेव्हा तुझा घरावर कोणताही हक्क नाही.
समीर,जो घटस्फोट परस्पर संमतीने झाला असता आणि त्यानंतर सुध्दा आपण दोघे चांगले मित्र राहिलो असतो त्या संबंधात नोटीस बजावून इतका कडवटपणा,व्यवहार तू आणलास की त्यामुळेच मला हे पत्र लिहाव लागलं.
पत्र वाचून तुला उपरती व्हावी ही अपेक्षा अजिबात नाही.कारण माझ्या बाजूने हे संबंध संपले आहेत.
संबंध कसे ठेवावेत हे तुझ्या आईकडून शिक.तू घरातून निघून गेला आहेस हे कळल्याबरोबर आई लगेच अंतरासाठी इथं आल्यात.आणि महत्त्वाचं म्हणजे अंतराची आजी ह्या नात्यानं त्यानी आमच्या बरोबर रहायला माझी हरकत नाही.
त्या स्वाभिमानी आहेत त्यामुळे मला गरज आहे असं वाटून त्या आल्यात.
मी माझ्या आईला बोलावू शकत होते पण ती माझ्या भावाकडे सुखात आहे.
समीर,मनातून एकटी झालेय ती तुझी आई!
पत्राखाली सही करताना तू मला "सानी" हाक मारायचास ते आठवलं.माझं नांव 'सानिका' पण तू म्हणायचास आपल्या प्रेमात 'का' नकोच!पण आता मात्र तूच माझ्या आयुष्यात अनेक प्रश्न निर्माण करून ठेवले आहेस.काळजी नको करू ते सोडवायला मी एकटी खूप सक्षम आणि आत्मनिर्भर आहे. त्यामुळेच------अंतराची आई---
सानिका.
ललिता छेडा

No comments:
Post a Comment