बॅंकेत स्वत:च्या केबिनमध्ये शिरत असतानाच मीनलचा मोबाईल वाजला,अनोळखी नंबर बघून'हॅलो, कोण?'मीनलनी घाईघाईने विचारल..मीनल सबनीस बोलताहेत का?साहिल सबनीसच्या आई!समोरचा आवाज बाईचा होता. कोण बोलतय?मीनलच्या स्वरात काळजी होती."मी साहिलच्या शाळेतून बोलतेय"साहिलच्या प्रगतीबाबत चर्चा करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी दहा वाजता शाळेत यायचय. साहिलच्या वडिलांनाही ह्याचवेळी यायचं आहे.अर्थात तसा त्यांना फोन केलाय .मीनलनी काही विचारण्या आधी फोन ठेवला होता.इतक्यात बॅंकेच्या स्टाफमधली प्रज्ञा आत आली.मीनलच्या चेह-यावरची काळजी बघून म्हणाली"काय झालं मॅडम?अग साहिलच्या शाळेतून फोन आला होता, उद्या आम्हा दोघांना सकाळी दहा वाजता शाळेत बोलावलय!काय सांगणार आहेत कोणास ठाऊक?तू सकाळी सांभाळून घेशील ना? मी लंच पर्यंत येतेच.पण नाहीच जमल यायला तर मी तुला कळवेनच.
संध्याकाळी मीनल घरी पोचली तर सतीश तिचा नवरा तिची वाटच बघत होता."या, उद्या शाळेत बोलावलय ना! एकुलत्या एका लेकाचे पराक्रम ऐकले का चार विषयात नापास झालाय. त्यामुळे आपल्याला शाळेत बोलावून घेतलय!साहिल रडवेल्या चेह-यानी खाली मान घालून बसला होता."माझा, सतीश सबनीसचा मुलगा सातवीच्या सहामाही परीक्षेत नापास होतो! सतीश त्याच्या स्वभावाप्रमाणे 'मी'शब्दाभोवती फिरत होता.मीनलला वाटलं त्याला सांगाव"अरे बाबा असं का झालं त्याबद्दल साहिलशी बोलूया ना!!पण आपण अस काही बोललो तर नेहमी प्रमाणे भांडण होणार.त्यापेक्षा तिनी ठरवल साहिलला घेऊन त्याच्या खोलीत जाऊया.
"अरे साहिल नको रे त्या चौकीदाराच्या मुलाशी बाबूशी खेळत जाऊ,त्याच्या घरी जात जाऊस!! तुला प्रायव्हेट ट्युशन लावूया का? आपल्या इतक्या पाॅश सोसायटीत आमची लाज नको रे घालवू."मीनलची असहाय्यता आवाजात लपत नव्हती.
"पण मम्मा बाबू तर त्याच्या वर्गात पहिला आलाय"साहिल निरागसपणे म्हणाला.अरे तुझी ठाण्यातली शाळा किती मोठी आणि पाॅश आहे.तुझ्या शाळेत खूप काॅम्पिटीशन असते बेटा! मीनलला कळत होतं की ह्याच्या मनात काही तरी वेगळच आहे.आणि आपण काही तरी वेगळंच बोलतोय!
"चल जेवायला"मीनलनी साहिलला जवळ घेऊन म्हटल."मी बाबूच्या घरी जेवलो"साहिल खाली बघत बोलला.मला डॅडींची भीती वाटत होती"
बाबू,बाबू काय आहे त्या घरात? किती वेळा सांगितलं तुला नको जाऊस त्यांच्या घरी!तुझा डॅडी किती ओरडतो मला, सोसायटीतल्या बायका पण तू तिथे का जातोस म्हणून विचारत असतात!! मीनलची चिडचिड झाली होती."बाबूच्या दोन बहिणी, आई ,बाबा सगळे जण माझे खूप लाड करतात.माझ्याशी गप्पा मारतात"मीनलच्या प्रश्र्नांना उत्तर द्यावं असं साहिलला मनापासून वाटलं.
पण तो "साॅरी मम्मा" येवढच बोलून झोपायची तयारी करायला लागला!
सकाळी घरातल वातावरण अस्वस्थच होत! सतीशनी घराबाहेर पडताना"उगीचच काही तरी ते शाळेतले मला शिकवायला लागले तर मी अजिबात ऐकून घेणार नाही!"असा मीनलला दम दिला.तिनी फक्त त्याच्या पुढे हात जोडले. रस्ताभर सतीशची बडबड सुरूच होती. गाडीतून उतरल्यावर मीनलनी साहिलला जवळ घेऊन"मी आहेना,काळजी नको करू"अस म्हटल.
शाळेत त्यांना प्रिन्सिपलच्या खोलीत बोलावल आणि साहिलला त्याच्या वर्गावर पाठवल. तिथे प्रिंन्सिपल मॅडम बरोबर अजुनही एक मॅडम होत्या."Meet Mrs. Vaidehi Soman, Our School's Counselor. And Mrs. Vaidehi, they are the parents of Sahil Sabnis." प्रिन्सिपलमॅडमनी एकमेकांशी ओळख करून दिली.
. "आपण मराठीतच बोलूया, त्यामुळे मला तुमच्याशी मोकळेपणाने बोलता येईल."वैदेही मॅडमनी सुरवात केली.मीनलला तीसपस्तीशीतली जीन्स टी शर्ट घातलेली वैदेही आवडली होती. तिच्या बोलण्यातल्या ठामपणामुळे सतीशपण थोडा शांत वाटत होता! टेंशन नका घेऊ!साहिल नापास झाला आहे तो चुकीची उत्तरे लिहिल्यामुळे नाही तर त्यानी पेपर लिहीलाच नाही, त्या चारही पेपरांपैकी एकेका पेपरात त्यानी जेमतेम तीन-चार उत्तर लिहीली आहेत. वैदेही सांगत होती आणि मीनलच्या मनांत आलं "साहिल जर पेपर लवकर देवून टाकत असेल तर तेव्हाच टीचरच्या लक्षात का नाही आलं?"
साहिलनी लवकर पेपर दिला ते टिचरच्या लक्षात कसं नाही आल असं तुमच्या मनात आलं ना! वैदेहीनी मीनलला विचारलं.टिचरला पहिल्याच पेपरला लक्षात आलं होतं आणि तिने मला तस सांगितल सुध्दा!मीच टिचरना परीक्षा पूर्ण होऊदे असं म्हटल.वैदेही संपूर्ण तयारीनिशी आली आहे ते दोघांनाही जाणवल!काय सांगू सबनीस मॅडम त्याला नापासच व्हायच होत!कारण कधीतरी रागाने सबनीस सरांनी त्याला म्हटल होत कि"तू नापास झालास तर टाकेन त्या बाबूच्या शाळेत! साहेबांनी ठरवल नापास व्हायच! इतरही बरेच प्लॅन होते त्याच्या डोक्यात.
मी गेले पंधरा दिवस साहिलशी बोलतेय! अनेक वेळा त्याच बोलणं रेकाॅर्ड पण करुन ठेवलय! अर्थात त्याला ह्याची काहीच कल्पना नाही.फक्त प्रिन्सिपल मॅडमना ह्याची माहिती होती.कारण पालक असं म्हणू शकतात कि आमचा मुलगा अस बोलणारच नाही.वैदेहीच्या अभ्यासपूर्ण बोलण्याने, तिच्या व्यक्तिमत्त्वामुळे सतीश प्रभावित झालाय ते बघून मीनल पण रिलॅक्स झाली होती
"तुमच्या मुलाचा प्राॅब्लेम आहे त्याच एकटेपण! तुम्ही बॅंकेत नोकरी करता ना?" वैदेहीनी मीनलला विचारलं. आणि तुम्ही? सतीशकडे बघून विचारलं"माझा स्वत:चा व्यवसाय आहे."साहिल शाळेतून घरी १ वाजता येत असेल तेव्हा घरात कोण असत"वैदेहीनी विचारलं.आमच्या स्वैपाकाच्या मावशी असतात आणि त्या संध्याकाळपर्यंत थांबतात."मीनलनी सांगितल.आता मी सांगते ते नीट ऐका वैदेही त्या दोघांकडे बघत म्हणाली "साहिलच्या म्हणण्या प्रमाणे तो घरी येतो तेव्हा त्या टी.व्ही.बघत असतात किंवा झोपलेल्या असतात.तो आपल आपलच जेवण वाढून जेवतो.
रात्री पण तो एकटाच जेवतो कारण डॅडी ड्रींक्स घेतात म्हणून उशीरा जेवतात, मग मम्मीशी खूप भांडतात.त्याला खूप भीती वाटते.तेव्हा त्याला वाटत की आपल्याला पण बाबूसारखी एकतरी बहिण हवी होती.मीनलच्या डोळ्यातले अश्रू बघून वैदेही म्हणाली"आपण प्रश्र्न सोडवायला भेटलो आहे.हल्ली ब-याच घरांतल्या एकुलत्या एक मुलांचा हा प्रश्न आहे.आईवडिल दोघेही नोकरी, व्यवसायानिमित्ताने घराबाहेर असतात.आणि मुल एकलकोंडी होतात.कधी वाईट संगतीला लागतात.एकुलत्या एका मुलासाठी भरपूर पैसे खर्च केले म्हणजे जबाबदारी संपत नाही.तुमच्या नशिबाने साहिलला बाबूच घर आहे जिथे तो गप्पा मारतो,हसतो, एकत्र जेवतो.पण तुम्हाला तेही आवडत नाही.तुम्हाला माहीत आहे का "मी काल साहिल बरोबर बाबूच्या घरी पण जाऊन आले.वैदेही हसत हसत म्हणाली.सबनीस मॅडम मी एकदा केस हातात घेतली की तिचा पूर्ण अभ्यास करते! बाबूच्या दोघी बहिणी दहावी बारावीला आहेत.उत्तम मार्क मिळवताहेत!बाबू पण वर्गात पहिला आलाय.निव्वळ तुमच्या उच्चभ्रू सोसायटीच्या चौकीदाराची मुल म्हणून त्यांना लांब ठेवणं किती चुकीचे आहे.
" वैदेही ताई मला माझी चूक समजलीय."मीनल शांतपणे म्हणाली.साहिलसाठी मला जे काही निर्णय घ्यावे लागतील ते मी घेईन.मी तुम्हाला उद्या फोन करेन चालेल ना?बोलता बोलता मीनल उठली.सतीश त्याच्या स्वभावाप्रमाणे चिडला होता पण वैदेहीच बोलण इतकं स्पष्ट आणि खर होत कि तो तिच्याशी न बोलता न बघताच निघाला.
शाळेबाहेर पडल्यावर सतीशनी उपरोधाने विचारलं"काय निर्णय घेणार आहात?"गाडीत बसता बसता मीनल म्हणाली"आपण तुमच्या आईला आणायला कांदिवलीला जाणार आहोत.तुमच्या स्वभावाला,दारूला कंटाळून त्या एकट्या त्यांच्या घरी रहायला गेल्यात.आणि त्यानंतरच हे सगळं घडलय.
साहिल शाळेतून यायच्या आधी आपण आजींना घेऊन यायचं.आणि त्याला सरप्राइज द्यायच.वैदेही जे काही बोलली आहे त्यावर तुम्हालाच विचार करायचा आहे .स्वभाव बदलात तर उत्तम नाहीतर मी साहिलला, आजींना घेऊन कांदिवलीला जाऊन राहीन.मीनलचा स्वर निर्णायक होता.
सतीशनी गाडी कांदिवलीच्या दिशेला निमुटपणे वळवली होती.
ललिता छेडा

No comments:
Post a Comment