Thursday, June 28, 2018

दखल

      आईची चाहूल लागल्याबरोबर राधा पांघरूण बाजूला सारून उठली.तशी तिला रात्रभर झोप लागलीच नव्हती.आईला मागून मिठी मारुन ती म्हणाली"गुड मॉर्निंग माय स्वीट आई"उगीच लाडात येऊन मस्का नको मारु" नलुताई हळूच म्हणाल्या"आणि इतक्या लवकर कशी उठलीस! का झोपच नाही आली?
आई, मीराताईला बाबांनी बोलावलय ना आज?राधानी विचारल. पण येवढ्यात मागून आत्याचा आवाज आला"इतक्या सकाळी मायलेकीची काय कुजबुज चाललीय?काम नाहीत का,चहा टाका सगळ्यांचा!आत्याच्या आवाजातली जरब ऐकून नलूताई ओट्याशी गेल्या.
‌. आईला भेदरलेली बघून राधाला वाटल आज वेळेवर बोलेलना ही! कि अशीच घाबरून जाईल?राधानी थोडस रागानी आत्याकडे बघितल.
नलुताईंची रोजची कामं सुरू झाली पण मन मात्र भूतकाळात गेलं.आज तीस वर्षं होतील आपल्या लग्नाला! किती आनंदात होतो आपण असा मोठा वाडा, दोन दिर, दोन नणंदा ,सासू सासरे,अस भरलेल पुण्यातल घर आपल्याला मिळाल म्हणून! कोकणातल्या छोट्या गावात मामाकडे लहानाची मोठी झालेल्या नलूला पुण्यात स्वतःच साड्यांच दुकान असलेल्या मांडक्यांच स्थळ आल आणि मामीनी लगेच लग्न उरकून घेतल.
लग्नानंतर चार दिवसांतच नलूला कळल कि संतापी नवरा आणि करड्या शिस्तीच्या सासूबाईंनी आपल्याला घरकाम करण्यासाठीच आणल आहे.त्यात तिला दोन्ही मुलीच झाल्या त्यामुळे मुलींच्या बाबांना रागाला अजून एक कारण मिळाल.
घरातली लग्नकार्य, सणवार करता करता नलूताईंना स्वतःच आयुष्यच उरल नाही.त्यात पुन्हा मोठी नणंद लग्नानंतर वर्षभरातच माहेरी परतली. तिच्या येण्यानी सासुबाईंनी सगळी जबाबदारी लेकीवरच टाकली आणि इतक्या मोठ्या भरलेल्या घरात नलूताई एकट्या होऊन गेल्या.पण मुली जशा मोठ्या होऊ लागल्या त्यांना आईची घुसमट समजू लागली.त्यातही मोठी मीरा त्यांच्या सारखी बाबांना घाबरत होती पण राधा मात्र पहिल्यापासून बंडखोर!
मुली मोठ्या होऊ लागल्या आणि नलुताईंची काळजी वाढू लागली. मीरानी घरातल्यांनी जिथं ठरवल तिथे लग्न केल.सुदैवानी तिला सासरही चांगल मिळाल.
‌. राधानी मात्र आपल लग्न आपणच ठरवल्याच बाबांना सांगितल आणि घरात वादळच उठलं.
बाबांनी सर्वांना एकत्र बोलावून घेतलं आणि मीराला पण यायला सांगितलं ती आपल्या सासूबाईंना घेऊन आली.
विषयाच्या सुरवातीलाच बाबांनी"हे बघ राधा आम्ही ठरवू तिथेच तू लग्न करायच आहे . तुझी मनमानी चालणार नाही..'अस म्हटलं. राधानी आईकडं बघितल 
हे बघा राधानी ठरवलेल्या मुलाशीच तिच लग्न व्हाव अशी माझी इच्छा आहे"तीस वर्षांनी संपूर्ण घरापूढे धाडसानी बोलायची हिंमत आपल्यात कुठून आली अस नलूताईंना वाटल, त्यांना हेही माहित होतं कि आजची संधी घेतली नाही तर मुली आपल्या पासून दुरावतील.त्यामुळे राधाचा हात घट्ट धरून त्या म्हणाल्या"राधानी पसंत केलेल्या मुलाला मी भेटले आहे मुलगा चांगला, उच्चशिक्षित, कर्तृत्ववान आहे जातीपातीचा मी विचार करत नाही.
राधाचे बाबा संतापाने थरथरत उभे राहिले आणि म्हणाले"तू मुलाला कुठे भेटलीस?
माझ्या घरी!मीरा शांतपणे म्हणाली.बाबा,मीच राधाच लग्न माझ्या घरी लावून देणार आहे.आई त्या लग्नाला येणार आहे.तुमच्या स्वभावाला अनुसरून तुम्ही जर 'लग्नाला गेलीस तर घरात घेणार नाही'अस म्हणालात तर मी आईला आयुष्यभर सांभाळीन, आणि हे मी माझ्या सासूबाईं समोर बोलतेय तेव्हा माझ सासर माझ्या पाठीशी उभ आहे हे तुम्हाला कळलंच असेल! किंबहुना आईला ही हिंमत त्यांनीच दिली आहे.एकट्या पडलेल्या बाबांकडे बघवत नव्हत 
नलूताईंना मात्र अश्रु आवरत नव्हते.आपल्यातुनच उमललेल्या ह्या दोन कळ्यांनी आपल्या घुसमटीची दखल घेतल्याने मिळालेल्या मोकळ्या श्र्वासाचे ते आनंदाश्रु होते.   

No comments:

Post a Comment