Thursday, June 21, 2018

स्पर्श

मीनल,माझी जवळची मैत्रीण! एका मोठ्या अपघातातून बचावली होती. रस्त्याच्या कडेने चालणा-या
तिला बेदरकारपणे वेगाने जाणाऱ्या कोणीतरी उडवल होत. आणि गेले पंधरा दिवस ती मृत्यूशी अक्षरशः लढत होती. पण डाॅक्टरांची अफाट मेहनत आणि सर्वांच्या शुभेच्छांमुळे धोका टळला होता. आता फक्त काळजी घ्यायची होती. जी आम्ही मैत्रिणी, नातेवाईक आळीपाळीने घेणार होतो. त्यानुसार तीन दिवस मी दिवसभर तिच्या जवळ बसणार होते.
मीनलची खोली खूपच छान, हवेशीर होती. समोर मोठ्या खिडक्यांजवळ एकच पेशंट होती. खिडकी शेजारी मोठा सोफा होता. जिथे बसल्यावर खालचा वाहता रस्ता दिसत होता. मीनलला झोप लागली होती, त्यामुळे मी सोफ्यावर बसून पुस्तक वाचायला लागले. समोरची पेशंट पण वाचत पडली होती मी तिच्याकडे बघून हसले पण तिनी जाणीवपूर्वक लक्ष नाही अस दाखवल.चाळीशीच्या आसपास असलेली ती अजिबात पेशंट वाटत नव्हती. व्यवस्थित बांधलेले केस,रंगवलेली नख,हलकी लिपस्टीक!मला गंमत वाटली.
त्यानंतर सकाळी दहा ते एक भेटण्याची वेळ असल्यामुळे येणाऱ्यांशी बोलण्यात वेळ कुठे गेला कळलच नाही.
जेवण झाल्यावर मीनल झोपली मी पण सोफ्यावर पडले होते तेवढ्यात कण्हल्याचा आवाज आला बघितल तर ती पेशंटच कण्हत होती मी तिच्या जवळ गेले आणि तिच्या डोक्यावर हात ठेवला, तिनी डोळे उघडले! तिला खूप ताप होता,डोळ्यातून पाणी येत होते. मी जरा डोकं दाबल, तळपाय घासले,नर्सला बोलावल, डॉ. पण आले मी हळूच त्या नर्सला विचारल 'काय होतय हिला?अहो असाच खूप ताप येतोय सगळ्या तपासण्या झाल्या पण निदान होत नाहीय रोज रात्री ताप येतोय आज दुपारीच आला. औषधानी ताप उतरला आणि तिला झोप लागली. ती उठल्यावर मी तिच्या साठी काॅफी मागवली तिनी पण निमुटपणे प्यायली.आता माझी घरी जायची वेळ झाली होती. जाताना तिचा हात हातात घेऊन मी म्हटल'काळजी घे,मी आता उद्या येईन.' तिनी हात घट्ट धरून ठेवला. दगडाला पाझर फोडण्यात बहुतेक मी यशस्वी झाले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी आल्याबरोबर ती काॅटवरून उतरून माझ्याकडे आली.माझा हात हातात घेऊन घेऊन म्हणाली"thanks,काकू काल तुम्ही माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि मला माझ्या आईची आठवण झाली.तिचे डोळे भरून आले होते."अग किती ताप होता तुला! मी काळजीने म्हटल.हो काकू कळत का नाही का येतोय! अचानक मला जाणवल काल पासून हिला भेटायला कोणीही आल नाहीय. त्यामुळे स्वभावाप्रमाणे तिला विचारल'घरी कोण आहे'? "कोणी नाही" तिनी शांतपणे उत्तर दिल. पांच वर्ष झाली आई गेली!छोट्याशा कारणांनी भावाशी भांडण झालं तेव्हा पासून त्याच्याशी संबंध नाहीत. ती मोकळेपणाने बोलत होती. मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी करते मी काकू माझी करीअर,माझी नोकरी, माझा पैसा हे सगळ माझ्या एकटेपणावर मात करेल असा मला वाटायचं पण कालचा तुमचा मायेचा स्पर्श मला खूप काही शिकवून गेला. तो स्पर्श नाही मी विकत घेऊ शकणार!
अनोळखी व्यक्तीवर इतक प्रेम करण माझ्या साठी कठीण होत.
इतक्यात मीनलला भेटायला येणा-यांची वर्दळ सुरू झाली. दुपारी जेवण झाल्यावर मी तिला म्हटलं 'तुझ्या भावाचा नंबर दे'तिनी पण खळखळ न करता दिला. भाऊ तर इतका छान बोलला आणि म्हणाला"मी येतो संध्याकाळी!
आम्ही दोघी संध्याकाळची वाट बघू लागलो. मीनल पण आमच्यात सहभागी झाली. त्या छोट्याश्या खोलीत सुंदर बदल घडत होता!
भाऊ आला बरोबर वहिनी आणि अडीच-तीन वर्षाची गोड मुलगी पण होती. आल्याआल्या त्या छोटीनी त्या खोलीचा ताबाच घेतला. भावानी छोटीला सांगितल ही तुझी आतू!त्या चिमुरडीनी तिला 'आतू' म्हणून गालाला हात लावला. आत्या खूष!! मंडळी गेल्यावर थोड्यावेळाने मी पण निघाले. तिच्याकडे बघत मी म्हटलं'आज रात्री ताप येणार नाही अस मनाशी नक्की ठरव. तिनी मला घट्ट मिठी मारली आणि माझा हात तिच्या डोक्यावर ठेवला. विनाकारण स्वतःभोवती विणलेल्या एकटेपणाच्या कोषाला तिच्याच स्पर्शानी तिनी उघडला होता. एका स्पर्शानी केलेली जादू अविश्वसनीय होती.



No comments:

Post a Comment