Thursday, May 2, 2019

घड्याळ


 नाना यायच्या आधी त्यांच्या देवपुजेसाठी फुलं काढून ठेवायची,त्यांना सकाळी फिरून आल्यावर प्यायला गरम पाणी, चहा द्यायचाय.ननी पेपर वाचायच्या  विचारात होत्या पण घड्याळाकडे लक्ष गेल्यावर ननीनी पेपर वाचायचा विचार बाजूला ठेवला. कारण आज जाताजाता चार गरम तिखटमीठाच्या पुर्‍या नाश्त्याला करून ठेव हे सांगायला नाना विसरले नव्हते.
      खरं म्हणजे आज सुनेने कामावर जायच्या आधी बाईकडून वेगवेगळ्या भाज्यांचे परोठे करून ठेवले होते.पण "मी ते जेवताना खाईन, सकाळचा नाश्ता जरा गरमच हवा"असं नानांच स्पष्ट मत होतं.
       ननींच सकाळचं आवरता आवरता साडेबारा कधी वाजले कळलंच नाही.नातू शाळेतून यायची वेळ झाली होती.तो आला की नाना त्याच्याबरोबर जेवतात.ही रोजचीच त्यांची जेवायची ठरलेली वेळ होती. मागचं आवरेपर्यंत नात काॅलेजातून येत असे.
      त्यांचं ननींना नेहमीच म्हणणं असे"मी कसा प्रत्येक गोष्ट शिस्तीत,वेळेत करत असतो म्हणूनच मला डायबिटीस वगैरे काही नाही.ननींच्या मनांत यायचं"सगळ्यांच्या  वेळा सांभाळताना मला कसा स्वत:साठी वेळ काढता येईल ते सांगा.खरं म्हणजे, आपल्याला पण हे सगळं करायला आवडतं त्यामुळे नाना म्हणतात तसा होतो डायबिटीस तर होऊ दे, हरकत नाही. ह्या विचारांनी नेहमी त्या मनातल्या मनात हसायच्या.
      एकंदरच ननी तश्या हसतमुख, समाधानी! पण नानांचा इगो आणि घड्याळ सांभाळताना मात्र त्या थकून जायच्या.
      माझ्या येवढी जबाबदारीची,वेळेची जाणीव घरात‌ कोणालाच नाही असं नानांच ठाम मत होतं.
      संध्याकाळी नाना क्लबवर गेले की ननींना हूश्श व्हायचं कारण ते साडेपाचला  गेले की आठ वाजता परत यायचे.मग साडेआठ वाजता जेवण! मधले अडीच तास मात्र ननींचे असायचे!त्या जवळच्या बागेत जायच्या.तिथे त्यांच्या वयाच्या मैत्रीणी वाट बघत असायच्या.गप्पा,भजनं, विणकामाचे टाके असं बरंच काही तिथे घडायचं आणि ननी ताज्यातव्यान्या होऊन घरी परतायच्या.सुदैवानी त्यांची सुनही समजूतदार होती.संध्याकाळी कामावरून आल्यावर शक्यतो तीच सर्व बघायची.
       मध्ये एकदा ननींचा मोठा मुलगा अभय त्यांना म्हणाला" ननी आज रात्री तू घड्याळ्याबरोबर नको जेवूस, कारण नानांच जेवण झाल्यावर आम्ही भजी करणार आहोत.तुला तर माहित आहे नानांची भजी खायची वेळ आणि ऋतु फिक्स आहेत.त्यामुळे त्यांचं जेवण झालं आणि ते झोपायला गेले की भजी कार्यक्रम आहे.
    "करा हो तुम्हाला हवं ते, माझं म्हणशील तर मी लग्नच घड्याळ बरोबर केलंय.तू जेवणाचं काय घेऊन बसलास"ननी हसत हसत म्हणाल्या.
      ननींचा दुसरा मुलगा अजय अमेरिकेत रहात होता.तो बोलावून थकला पण नानांचा आपलं तेच म्हणणं "तिथे जाणं येणं म्हणजे नुस्ता वेळेचा अपव्यय"
      ननींची लग्न झालेली धाकटी लेक 'मीता' मात्र नानांच लाडकं शेंडेफळ! आणि नानांच्या अगदी विरुद्ध, पण उत्साहाचा झरा! ती आली की नानांच वेळापत्रक जरासं तरी हलवून जायची.नाना हसत म्हणायचे"अग,मीता जरा तरी वेळ पाळायला शीक.पण तिचं उत्तर ठरलेलं" मला वेळ द्यायला आवडतो.नाना, वेळ पाळणं सोपं आहे पण आपल्या वेळातला वेळ काढून आपल्या माणसाला देणं खूप गरजेचं आहे"
     त्यावर नाना म्हणायचे"अग,वेळ पाळणं म्हणजेच वेळ देणं आहे.
      हा संवाद महिन्या दोन महिन्यात व्हायचाच.अभय म्हणायचा "ही बोलू तरी शकते आम्ही बोलायचा विचार सुध्दा करु शकत नाही"
     खरं म्हणजे नाना अत्यंत हुशार सायंटिस्ट त्यामुळे instituteच्या चेंबूरच्या सोसायटीत ते नोकरी करेपर्यंत राह्यले.तेव्हा ननींनी पण जवळच्याच शाळेत प्रायमरीत शिक्षक म्हणून नोकरी केली.
     नोकरी करत असतानाच्या काळातच घराजवळ म्हणजेच वाशीला स्वत:च्या कष्टांनी, कर्तृत्त्वानी नानांनी बंगला बांधला होता.त्या बंगल्याचा त्यांना प्रचंड अभिमान होता.नव्या मुंबई जवळ असलेल्या त्या बंगल्याला आता भरपूर किंमत मिळत होती.त्यामुळे" मी योग्य वेळी जबाबदारीने गुंतवणूक केल्यामुळेच हा फायदा दिसतोय हे पण त्यांचं नेहमीच ‌सांगणं असायचं.
      एकदा सहज बोलता बोलता बोलता नाना मीताला म्हणाले" मी त्या काळात हिम्मत करून जबाबदारीनी जो बंगला बांधला त्याची किंमत सध्या करोडो झालेय.
        मीतानी लगेच उत्तर दिलं"नाना, तुम्ही हिमतीनं बंगला बांधलाय पण जबाबदारी मात्र ननींनी घेतली होती.  प्राथमिक शाळेत ननी शिकवायची म्हणून चेष्टा करणारे तुम्ही विसरलात की त्यादिवसात तुम्ही तुमचा पगार, सेव्हींग बंगला बांधण्यासाठी ओतत होतात आणि तेव्हा ननी तिच्या तुटपुंज्या पगारावर घर चालवत होती.आणि ती आम्हा तिघांना समजवायची."नाना आपल्यासाठी बंगला बांधताहेत  की नाही! त्यामुळे आपण थोडे दिवस काटकसरीने राहूया.
        का कुणास ठाऊक नाना थोडे विचारात पडलेले ननींना वाटले.त्यांना नाना आता चिडतील अशी थोडीशी भीती देखील वाटली.पण तो विषय तिथेच थांबला.
     त्यानंतर महिनाभरानंतर रात्री जेवताना नानांना अचानक अस्वस्थ वाटू लागल.त्यांना आलेला घाम आणि उलटी होतेय असं वाटणं! अभयनी क्षणाचाही विचार न करता त्यांना गाडीत घालून हाॅस्पिटलमध्ये नेलं.नानांना massive heart attack आला होता.
     दोन दिवसांनी डॉक्टरांनी धोका टळलाय असं सांगितलं.तोपर्यंत अजय पण अमेरिकेहून यायला निघाला होता.
     हाॅस्पिटलचे पंधरा वीस दिवस तपासण्या, उपचार ह्यातच गेले.ननी सतत तिथे नानांबरोबर होत्या.उगीच वेळा चुकायला नको.पण नाना मात्र खूप बदललेले जाणवत होते.
       महिन्याभरानी नाना घरी आल्यावर अजय परत जायला निघाला.तर ते त्याला म्हणाले" तीन महिन्यानंतर अमेरिकेला यायला सीझन चांगला असतो का रे? मी आणि ननी यायचं म्हणतोय.
     अजय एक मिनिट आश्र्चर्यचकीत होऊन बघतच राह्यला आणि आनंदाने म्हणाला"नाना, मस्त सीझन असतो. अहो तुमची सुन येईल तुम्हाला न्यायला! मी बिझनेस क्लासची तिकीटं पाठवतो.
      ननी विश्र्वास न बसून हळूच म्हणाल्या" अहो, पोराला उगीच आशा नका लावू.अठरा तासाचा प्रवास आहे.येण्या-जाण्यात फार वेळ जाईल.आणि तुमचं इथलं वेळापत्रक बदलेल.ननींच्या शब्दात प्रामाणिकपणा होता.
   "नलिनी,वेळापेक्षा माणसं महत्वाची आहेत,हे मी ह्या आजारपणात अगदी चांगलं समजलोय. हाॅस्पिटलमधला प्रत्येकजण सहजगत्या वेळ पाळत होता त्यात कोणताही अभिनिवेश नव्हता. 
      माझ्या ह्या वेळ पाळण्याच्या नादात घरात, बाहेर मी एकटा पडत गेलो आणि आयुष्यातल्या कितीतरी आनंदाला मुकलोय. आता माझ्यासाठी घड्याळ असेल.घड्याळासाठी मी नाही हे मात्र नक्की!नाना हसत हसत मीता कडे बघून म्हणाले.
      नाना बरेच वर्षांनी नलिनी म्हणाले म्हणून ननी खूष झाल्या होत्या. 
     कितीतरी वर्षांनी त्या घरात मोकळ्या हसण्याचा मोठा आवाज आला.तो आवाज ऐकून घड्याळाचे काटे पण जरासे थरथरले. जणू त्या घरातल्या  हसण्यात घड्याळही सामील झाले होते.
                              ललिता छेडा.

5 comments:

  1. सातत्याने वेळ पाळणे योग्य असले तरी काही वेळा त्यामुळे दुसर्याला ही त्रास होतो. या कथेत न नी गुंतुन पडल्या ने त्यांना स्वातंत्र्य मिळाले नाही. पण आजारात ही काही चांगली गोष्ट नानांना कळली हेच कथेचे मर्म आहे. छान

    ReplyDelete
  2. असे नाना-ननी आपल्या प्रत्येक घरात आहेत....खरं तर नानांना आपलं सर्व वेळापत्रक असतं...पण ते वेळापत्रक राखते ती त्यांची ननीच, म्हणजे बायकोच...तेव्हा प्रत्येक घरात महिलांचीही वेळ, त्यांची आवड राखली गेली पाहिजे...आपण कितीही सुधारलो तरी याबाबतीत वैचारिक सुधारणा होणे गरजेचे आहे...ललिताताई तुम्ही हा धागा अचूक पकडला आहे....

    ReplyDelete
  3. मनापासून आभार सई

    ReplyDelete
  4. मनापासून आभार सई

    ReplyDelete
  5. Complying to principles at the cost of compassion , seen bowing down to the eternal sublime winner love and affection .😊👍👍

    ReplyDelete