Thursday, April 18, 2019

चमत्कार


समोरच्या चाळीत तळमजल्यावर रहाणार्‍या रमाईंच्या घरीच कबीर, तिचा मुलगा खेळत असणार अशी खात्री असल्यामुळे अरूणानी दार ओढून घेतलं आणि कबीरचे बुट घेऊन ती खाली उतरली.
          रमाई  दारातच बसून कबीरला गोष्ट सांगत होत्या.आणि तो देखील तल्लीन होऊन ऐकत होता.आईला बघून तो लगेच म्हणाला"आई, मी आज रमाईंकडेच रहाणार तुझ्या बरोबर नाही येणार! "अरे कबीर, आपण आजीकडे चाललोय ती तुझी वाट बघतेय." अरुणानी त्यानी बुट घालावेत म्हणून त्याचा पाय पूढे ओढला.पण कबीरनी पटकन मांडी घातली.
      रमाताई पूढे होऊन म्हणाल्या"हे बघ,तू जर आजीकडे गेलास तर परवा तू आल्यावर मी तुला दोन गोष्टी सांगेन"
     "आजच्या सारख्या कृष्णाच्याच दोन गोष्टी सांगायच्या.कबीरला कळलं होतं आता आपल्याला आईबरोबर जावं लागणार आहे.त्यामुळे "आई आज पासून तू मला कृष्ण म्हण.माझ नांव बदलूया"बुट घालत घालत कबीरची बडबड सुरु झाली.तो खळखळ न करता निघालाय ह्याचाच अरूणाला आनंद झाला होता.
     रमाईंकडून निघताना अरूणाच्या मनांत आलं नशीबानीच आपल्याला असा शेजार मिळालाय. नाहीतर कबीरचा जन्म झाला आणि आपल्या नवर्‍याची इथे मुंबईत बदली झाली. आणि सगळं आयुष्य पुण्यात गेलेल्या अरूणाला मुंबईत इतक्या तान्ह्या बाळाला घेऊन रहायचं टेन्शनच आलं होतं. सासर माहेर दोन्ही पूण्यातच होतं.पण नवरा पोलिसात असल्यामुळे बदलीसाठी मनाची तयारी होतीच. सुरवातीला सासुबाई,आई महिना महिना राहून गेल्या.आणि त्या दोघींमुळेच तळमजल्यावर एकट्या रहाणार्‍या रमाताईंशी ओळख झाली. रमाताईंनी कबीरला सांभाळण्याची अगदी सहज जबाबदारी घेतली.अरुणाला पण त्यांचा खूप आधार मिळाला.
     रमाताईंना दोन मुलं एक मुलगी, एक मुलगा! मुलगा अक्षय अमेरिकेत स्थायिक झाला होता आणि मुलगी तन्वी लग्न करून बंगलोरला रहात होती. त्या पंचेचाळीस वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांच्या यजमानांनच अपघाती निधन झालं.नोकरी करून मोठ्या जिद्दीनं त्यांनी एकटीनं मुलांचं शिक्षण, लग्न सगळं केलं होतं.
       रमाताईंना त्यांची मुलं 'रमाई' म्हणायची त्यामुळे परिसरात त्या रमाई म्हणूनच प्रसिद्ध होत्या. 
      त्यांच खास वैशिष्ट्य म्हणजे श्रीकृष्णावरची अपरंपार भक्ती  अर्थात ती भक्तीच त्यांच्या जगण्याची ताकद होती. आणि रमाईंची दुसरी आवड म्हणजे माणसांना घरी बोलवायचं आणि खाऊ घालायचं.त्यांच्या मते सर्व माणसं चांगलीच असतात.अरूणाला त्यांच्या ह्या स्वभावाच कौतुकही होतं आणि काळजीही वाटायची.
      रमाईंच्या घरासमोर एक मैदान होतं.जिथे चालायला सकाळ-संध्याकाळ खूप लोकं यायची.येणारा प्रत्येक माणूस एकदातरी रमाईंकडे काॅफी पिऊन गेलेला असायचाच.अरुणा म्हणायची" रमाई असं सगळ्यांना घरी नका आणत जाऊ.तुम्ही एकट्या रहाता ते कळतं!"एकटी कशानं,हा असतो की माझ्या बरोबर घरात."रमाई हाॅलमधल्या बासरी वाजवणार्‍या कृष्णाच्या मुर्तिकडे बोट दाखवून म्हणायच्या. त्यांच्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात कृष्णाच्या छोट्या-मोठ्या मुर्ति, फोटो होते.कायम स्वच्छ आवरलेल्या घरांत कृष्णा जवळ सकाळ, संध्याकाळ ताजी फुलं ठेवलेली असत.रोज कबीरला शाळेत सोडून आली की अरूणाची रमाईंकडे एक फेरी असायची.थोड्या गप्पा,थोडी मदत असा तासभराचा दोघींचा कार्यक्रम असायचा.अर्थात कबीरच्या बाबांच्या शिफ्ट प्रमाणे ह्या वेळा बदलायच्या.
        दरवर्षी साधारण डिसेंबरमध्ये रमाईंचा लेक अमेरिकेतून यायचा आणि बहूतेक मेच्या सुट्टीत तन्वी रहायला यायची.त्या दिवसात रमाईंची लगबग काही वेगळीच असायची. आणि त्यांची मुलं देखील आल्यावर संपूर्ण वेळ आईसाठी द्यायची.अक्षय अरूणाला म्हणायचा देखील "तुम्हा सर्वांमुळे मी तिकडे निश्र्चिंत असतो.लगेच रमाई म्हणायच्या"अरे कान्हा पण असतोच की माझ्या सोबतीला" "हो ग बाई,तो तर खास!तन्वी तर त्यांना कृष्ण भक्तीवरून नेहमीच चिडवायची.पण त्यांना ओळखणार्‍या सगळ्यांनाच त्या भक्तीतला खरेपणा माहीत होता.
      रविवारी संध्याकाळी कबीर आणि अरूणा आले, आणि त्यांना आणायला कबीरचे बाबा गाडी घेऊन पुण्याला गेले होते.रात्रीच त्यांच जेवण नेहमीप्रमाणे रमाईंच्या घरीच होत.जेवताना कबीरची अखंड बडबड सुरु होती."मी उद्या शाळेतून आल्यावर मला कृष्णाची गोष्ट सांगायची नक्की, दोन गोष्टी सांगायची प्राॅमिस आहे.लक्षात आहे ना? 
       मध्येच  "ह्या जुलैमध्ये मी अमेरिकेला यावं असं अक्षय म्हणतोय.तुम्हा मंडळींना पण बोलावलंय, येणार का?रमाई अचानक म्हणाल्या.
    "छे हो रमाई, तुम्ही मात्र नक्की जा"अरूणा पटकन म्हणाली. मी देईन सगळी तयारी करून! अरूणा मनापासून बोलत होती.
      नंतरचे दोन महिने तयारीत कसे गेले कळलंच नाही.अरूणा रमाईंच्या सतत बरोबरच होती.
     रमाईंनी थोडेसे दागिने नव्या सुनेला अमेरिकेला जातोय तर देवूया असं ठरवलं. लाॅकर मधून दागिने आणल्यावर अरुणा रमाईंना सारखी बजावत होती की कोणाला सांगू नका की तुम्ही दागिने घेऊन चालला आहात.पण रमाईंच्या भरभरून बोलण्याच्या स्वभावानुसार भेटायला येणार्‍या प्रत्येकाला तयारी काय-काय केलीय हे सांगताना दागिने मात्र मी पर्समधूनच नेणार आहे.हे सांगत होत्या.
      बघता बघता जायचा दिवस उजाडला.फ्लाईट रात्रीची होती.रमाई लवकर उठून समोर मैदानात गेल्या.सर्वांचा निरोप घेऊन घरी येईपर्यंत उशीर झाला होता.त्यांनी वर बघितलं आणि त्यांच्या मनात आलं कबीर शाळेत गेला असेल.
    घर सगळं आवरलेलं,रिकाम पाहून त्यांना थोडं वाईट वाटलं.पण लेकाकडे जायच्या आठवणींनी पुन्हा त्या खूष झाल्या.बॅग,पर्स सर्व दाराजवळच्या सोफ्यावर आणून ठेवले होते.आज दिवसभर अरूणाकडेच जेवण खाणं होतं.संध्याकाळी एअरपोर्ट वर सोडायला तिच दोघं येणार होती.
   अचानक दरवाजाची बेल वाजली आणि मैत्रिणीचा फोनही आला.त्यामुळे मोबाईलवर बोलत रमाईंनी दार उघडलं.जाळीच्या दाराबाहेर दोन अनोळखी माणसं उभी होती."आजी,तुमची लॅण्डलाईन बंद आहे.आम्ही लाईनमन आहोत तपासायला आलों आहे.रमाई दारावर उभ्या राहून त्यांना 'थांबा'अशी खूण करत फोनवर बोलत होत्या.
        इतक्यात त्यांना दाराजवळच्या कट्ट्यावर कबीर कंबरेवर हात ठेवून उभा असलेला दिसला.फोनवर हात ठेवून त्या दरवाजामागून अरे,तू शाळेत नाही गेलास?असं‌ म्हणून दार उघडू लागल्या.नेहमीप्रमाणे दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला उडी मारून मी आधी घरात जाणार म्हणून दरवाजा अडवून उभा राहिला.त्याची ही नेहमीची सवय होती.तो घरात पहिला जाणार आणि बाहेर पण पहिला पडणार."अंकल, तुम्ही मागे व्हा.मी फर्स्ट! 
        आणि अचानक कबीरनी बाबा-बाबा अशी खूप  जोरात हांक मारली.तेव्हाच रमाई फोन बंद करून दार उघडत होत्या.त्या दोघांनी दोन्ही हातानी दार धरून उभ्या असलेल्या कबीरला थोडंसं ओढूनच बाजूला केलं.पण कबीरचा हाक मारलेला आवाज ऐकून त्याचे बाबा तर बाहेर आलेच होते त्याबरोबर आजूबाजूच्या घरातली मंडळी पण बाहेर आली होती...
    ती दोघं झटक्यात आत शिरली‌ .त्यांच तस आत घुसणं कबीरच्या बाबांच्या पोलिसीनी नजरेनी टिपल‌ होतं.ते वीजेच्या वेगाने रमाईंच्या घराकडे धावले.तोपर्यंत त्या दोघांनी रमाईंना ढकलून सोफ्यावरची पर्स आणि बॅग उचलून घराबाहेर धाव ठोकली होती.कबीरमुळे रमाईंना धमकावून निवांत चोरी करण्याचा त्यांचा प्लान फसला होता.
      जीवाच्या आकांतानी ते दोघे बाहेर त्यांच्या साठी उभ्या असलेल्या रिक्शाच्या दिशेने धावले.पण चित्त्याच्या चपळाईने कबीरच्या बाबांनी त्यांना पकडलं  आणि बाहेर आलेल्या इतर मंडळींनी पण त्यांना  मदत केली.
    चोरांना पकडल्यावर सगळ्यांना रमाईंची आठवण झाली.त्या घाबरून सोफ्यावर बसल्या होत्या."रमाई काही झालं नाही ना!"अरूणानी त्यांना पाणी देत विचारलं. कृष्णाला काळजी, मला काही झालं नाही.अग पण कबीर कुठे आहे?तो ओरडला म्हणून बरं झालं,सगळेजण धावून आले"रमाई थकलेल्या आवाजात बोलल्या.
      "कबीर, कुठे रमाई!तो तर शाळेत गेलाय".अरुणा अचंबित होऊन म्हणाली.
      "असं कसं होईल!अग त्याने तर हांक मारली बाबांना!रमाई दोन्ही हात तोंडावर ठेवून म्हणाल्या.
      तोपर्यंत सर्वजण रमाईंच्या घरात आले होते.'बाबा' ही हांक सर्वांनीच ऐकली होती.पण कबीर कोणालाच दिसला नव्हता.रमाईं सर्वांना घडलं ते सर्व सांगत होत्या.त्या घटनेत कबीरच कट्ट्यावर असणं,दार अडवणं सगळ होतं पण अरूणा म्हणत होती "शक्यच नाही"तो शाळेत आहे.
    सगळेजण विचारात पडले होते.हे नक्की काय घडलंय! "रमाई, तासाभरात कबीरची शाळा सुटेल आणि तुम्हीच विचारा त्याला तो शाळेतून घरी आला होता का?
     तासाभरानंतर कबीर शाळेच्या बसमधून सोसायटीच्या दाराशी उतरला.रमाई तर जशा वाटच बघत होत्या.
       अरे, शाळेतुन तुला कोणी घरी आणलं होतं का रे?रमाईंनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं.कबीरच्या शाळेच्या अवतारा वरुन त्यांना समजत होतं की आपला प्रश्र फोल आहे.
      नाही ग,रमाई, आज आम्ही शाळेत खूप धमाल केली.आम्हाला मैदानावर नेलं होतं" कबीर खूषीत होता.
      "अरूणा,अग माझा कृष्ण आला मला संकटातून सोडवायला" रमाई आनंदित झाल्या होत्या.लगबगीनं देवघरातल्या कृष्णाच्या मुर्तिसमोर दिवा लावायला गेल्या.
    "अरुणा, पटकन गोडाचा शिरा करते सगळ्यांसाठी, नेवैद्य दाखवून आणते पटकन! रमाईंच्या भक्ति पुढे अरूणाला काय बोलावं कळत नव्हतं.तिनं पटकन सामान आणून दिलं.
      पण तिच्या सारखं मनात येत होतं,आज वाचल्या असं दरवेळी नाही होणार!
     सर्वजण गेल्यावर रमाई हळूच अरूणाला म्हणाल्या"चमत्कार करून कृष्णानी मला चागलाच धडा शिकवला हो!आता नाही मी ज्याला त्याला सगळं सांगणार! आता नको काळजी करू, नेईल तो मला सुखरूप.
     अरूणाला वाटलं त्यांना म्हणावं"तुमच्या देवाच ऐकून जरी भाबडेपणा सोडलात तरी तो आमच्यासाठी चमत्कार असेल.पण काहीच न बोलता ती त्यांच्याकडे प्रेमाने बघून हसली.
                         ललिता छेडा

1 comment:

  1. कथा बोधप्रद वाटते. अति मनाचा मोकळेपणा काहीवेळा घातक ठरतो. पण परमेश्वर भक्ती ही श्रेष्ठ आहे.

    ReplyDelete