Thursday, December 27, 2018

दृष्टीकोन




हल्ली सुमंतला भेटायला जायचं म्हणजे त्याच 'मी, मी' ऐकायच्या तयारीने जावं लागतंय असं  मनात आलं आणि सुहासला हसूच आलं.आणि सुमंतच नेहमीच वाक्य "माझ्या दृष्टीने मला असं वाटतं"एका वाक्यातले दोन 'मी!'
    सुहासच्या मनांत यायचं त्याला सांगावं "त्या तुझ्या दृष्टीला वेगवेगळे कोन लावून बघ काही तरी वेगळं मिळेल" 
     खर म्हणजे कोणीही कौतुक करावं असंच सुमंतच कर्तृत्व! पण यश डोक्यात गेलं की काय होतं ह्याच उत्तम उदाहरण म्हणजे सुमंत! पण सुहासला जवळचा मित्र आणि महत्त्वाचं म्हणजे धाकट्या बहिणीचा नवरा असलेल्या सुमंत कडे महिन्यातून एखादी तरी फेरी मारावीच लागे.
    त्यादिवशी सकाळी आईनी फर्मानच काढलं"सुहास, उद्या सुमंतचा वाढदिवस आहे.म्हणून त्याला आवडणाऱ्या पुरणपोळ्या दुपारी करणार आहे.आॅफिसमधून आलास की तुम्ही दोघं जाऊन देऊन या. 
    "आपण येतोय ते पुर्णिमावन्संना कळवून ठेवा.कारण सुमंतभावजींना कळवल्याशिवाय गेलेलं आवडत नाही लक्षात आहे ना? सुहासच्या बायकोनी आईसमोर  ऐकवायचा चान्स घेतला.
     सुहासला आठवलं सुमंतची आणि आपली ओळख इंजिनिअरिंग कॉलेज मधली.दोघंही सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये! सुमंत सोलापूर जवळच्या गावातून आला होता. तो एका गरीब शेतकऱ्यांचा मुलगा पण त्याची हूशारी बघून एका स्वयंसेवी संस्थेनी त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली होती.शिवाय त्याला गणिताची शिष्यवृत्तीही मिळाली होती. 
       शिकत असताना एका नातेवाईकांकडे तो रहात होता.अतिशय कष्टांनी त्यानी घेतलेलं शिक्षण सुहासने खूप जवळून बघितलं होतं.शिक्षण पूर्ण झाल्यावर सुहासला नशीबाने चांगली सरकारी नोकरी मिळाली. सुमंतच मात्र कुठेच काही जमत नव्हतं.त्या स्ट्रगलच्या काळात तो सुहासच्या घरी खूपवेळा येत असे.आणि तिथेच त्याच आणि सुहासच्या बहिणीचे जुळलं.तसं दोन्ही घरातून विरोध असल्याचं कारण नव्हतच. फक्त सुमंतची करिअर सूरू व्हायची सर्वजण वाट बघत होते.
   बांधकाम व्यवसायातलं पडेल ते काम करत असतानाच दोन अडीच वर्षांनी सुमंतला एक मोठ बिल्डींगच काम मिळालं.ते काम काही कायदेशीर अडचणीत सापडलं होतं.पण सुमंतनी हूशारीने आणि खडतर काळात झालेल्या ओळखींच्या मदतीने तो प्रश्र सोडवला आणि ते काम यशस्वीपणे पूर्ण केल.त्यानंतर जमिनीचे व्यवहार, कायदा, बांधकामाच्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्याने हळूहळू स्वत:चा ह्या व्यवसायात जम बसवला.आणि‌ त्याच्या ह्या वैशिष्ट्यांमुळे आणि जोडीला असलेल्या प्रामाणिकपणामुळे त्याच्याकडे मोठ्या मोठ्या व्यक्तिंची येजा सूरू झाली.ह्या सगळ्याचा मात्र त्याला अभिमान येऊ लागला.
      शिस्तीच्या नावाखाली लोकांना अपमानित करायचं,गरीब,गरजू लोकांना मदत करायची पण त्यांना स्वत:च्या कष्टांबद्दल ऐकवायचं, एकाच क्षेत्रात असल्यामुळे अधूनमधून सुहास सुमंतच्या आॅफिसवर जायचा.तेव्हा सुमंतच्या स्वभावाचे किस्से त्याला लोकांकडून ऐकायला मिळायचे.
    अनेकदा सुहास म्हणायचा"अरे किती बदललास तू?त्यावर पूढे काही बोलू न देता सुमंत म्हणायचा"खूप कष्टाने मी इथे पोचलोय.हे वैभव,यश, कीर्ती मी परिश्रमातून मिळवलंय.उगीच कोणाचं ऐकून नाही घेणार"सुहासला वाटायचं"अरे बाबा तुझ्या यशाला अहंकाराची जोड नको देऊ,नम्रपणाच कोंदण मिळालं तर आम्हाला अभिमान वाटेल"असं सांगावं.
    पण त्याच्या आवेशापुढे न बोलणंच योग्य आहे,अस दरवेळी सुहास ठरवायचा...
      संध्याकाळी पुरणपोळ्या घेऊन सुहास बायकोबरोबर गेला खरा पण सुमंत थोडासा अस्वस्थ वाटला. 
     पुर्णिमा मात्र खूष दिसत होती."उद्या होणा-या ह्यांच्या पंच्चानव्या वाढदिवसासाठी सकाळच्या घरगुती नातेवाईकांसाठी होणार्‍या कार्यक्रमाला तुम्ही सगळे या. संध्याकाळच्या फाईव्ह स्टार हॉटेलमधल्या पार्टीला मात्र तुम्ही दोघेच या.लिमीटेड क्रीम आॅफ सोसायटी आहे ना!" पुर्णिमानी अगदी सुमंतच्या बायको सारखं आमंत्रण दिलं होतं.ती चहा आणायला आंत गेली आणि तिची लेक केतकी सुहास जवळ आली आणि म्हणाली" मामा,मला तुझ्याशी बोलायचंय.अगदी सहज मला आज तुझ्या घरी बोलाव ना रहायला!!.मग मी तुझ्या घरी गेल्यावर तुझ्याशी बोलू शकेन.    
     येवढ्यात पुर्णिमा चहा घेऊन आली.आणि सुहास काही बोलायच्या आत केतकी म्हणाली"मामा आज रहायला बोलावतोय, उद्या त्यांच्या बरोबर येईन.चालेल ना? नाहीतर असं करतो, उद्या सकाळी तुझ्या मदतीला मी आणि मामी लवकर येऊ"केतकीनी कोणालाही बोलायची संधी न देता सांगून टाकलं.तेवढ्यात आतून सुमंत फ्रेश होऊन आला.त्याच्याकडे बघून पुर्णिमा म्हणाली"अहो, केतकी आजीकडे आज रात्री रहायला जाऊ का विचारतेय पाठवू ना?सुमंतनी केतकीकडे रोखून बघितलं पण तिनं नजर चुकवली.
       सुहासला जाम टेन्शन आलं.गेल्याच वर्षी केदार, सुमंतचा मुलगा इंजिनिअर झाला आणि फोटोग्राफी शिकायला घर सोडून निघून गेला.आणि जाताना"डॅड, मी तुमच्यासाठी इंजिनिअर झालोय पण माझी आवड फोटोग्राफी तर आहेच त्यात पण खास वाइल्ड लाइफ फोटोग्राफी माझ पॅशन आहे... तेव्हाही सुमंत असाच खूप  अस्वस्थ झाला होता.पण त्याला 'अरे घरी राहून कर काय करायचं ते' असंही नाही म्हणाला.त्याचा इगो आड आला बहुतेक.
       मामी बरोबर केतकी दरवाजात जाऊन उभी राह्यली.सुमंतनी सुहासच्या खांद्यावर हात ठेवला.हाताच्या त्या स्पर्शात हळवा बाप आधार मागतो आहे असं सुहासला उगीचच वाटलं.
     घरी आल्यावर केतकीनी बाॅम्बच टाकला.ती स्वत: एका प्रसिद्ध टी.व्ही.चॅनलवर न्युज रिपोर्टर म्हणून काम करतच होती.आणि‌ तिथेच तिची ओळख नाट्यचित्र क्षेत्रात काम मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या अजिंक्यशी झाली.दोघं प्रेमात पडले.आणि हे सगळं सुमंतला कळलं होतं.केतकी तिच्या निर्णयावर ठाम होती.तिला फक्त दोन वर्षाचा वेळ हवा होता.आणि त्यासाठी तिला मामाची मदत हवी होती.
      वाढदिवसाचा पूर्ण दिवस सुमंत त्याच्या नेहमीच्या रूबाबात वावरला.सुहासनी पण काही विषय काढला नाही.
     पण दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक सुमंत सुहासच्या आॅफिसवर आला.सगळ आॅफिस त्याच्या येण्यानं भारावून गेलं होतं.तो पण ह्या सगळ्या नजरांचे झेले झेलत आॅफिसभर सगळ्यांना भेटत होता.
    सुहासच्या केबिनमध्ये आल्यावर "अरे व्वा तुला केबिन आहे नाही का? छान छान! ही प्रस्तावना सुमंत स्पेशल होती.सुहासला हसू आलं.थोड्याच वेळात माझ्याच केबिनमध्ये ह्याला त्याच्या लाडक्या लेकीचा निर्णय मला ऐकवायचाय.
     "काय म्हणत होती केतकी? सुमंतनी सरळ विषयाला हात घातला.
        "सुमंत तुला सगळं माहीत आहे आणि आज तुला ते शांतपणे स्वीकारायचय"सुहासनी पण आज ठरवलंच होतं सुमंतचा इतरांकडे क्षुल्लक नजरेनी बघायचा दृष्टिकोन बदलायचाच.मेव्हण्यापेक्षा मित्राच्या भूमिकेत जाऊन बोलायचं!
    "तुला काय म्हणायचंय"मी त्या नाटक्याशी माझ्या मुलीचं लग्न लावून देऊ? माझ्या दृष्टीकोनातून त्याची माझ्या मुलीच्या जवळसुध्दा उभ रहायची लायकी नाहीय."सुमंत प्रचंड चिडला होता.
      आता मात्र सुहास ला रहावेना.
    "सुमंत,तो FTII चा पदवीधर आहे. उत्तम लिहीतो.स्पर्धेसाठी त्यानी‌ लिहीलेल्या एकांकिका बक्षिसं मिळवतात.अतिशय चांगल्या घरचा मुलगा आहे.आईवडिलांबरोबर स्वत:च्या घरात रहातो. 
    सुमंत,तू स्वत:चे दिवस विसरलास.गरीब शेतकऱ्याचा मुलगा तू, नातेवाईकांकडे रहात होतास पण सुमंत, माझ्या वडिलांनी एक मिनिट सुध्दा विचार केला नाही कारण तू हूशार आहेस 'लाथ मारशील तिथं पाणी काढशील'अशी क्षमता ठेवतोस हे त्यांनी ओळखलं होतं.आणि तू त्या मुलाला बघितलं सुध्दा नाहीस आणि लायकी काढतोयस! आज सुहासने ठरवलंच होतं की सुमंतच्या डोळ्यावरचा अहंकाराचा चष्मा उतरवायचाच.
     ज्याची बाजू घेतो आहेस त्याला तू तरी किती ‌ओळखतोस? सुमंत गुरगुरला.
       " काल केतकी आली तेंव्हा रात्री तोही आमच्या घरी आला.आणि बोलता बोलता आमच्या आॅफीसमध्येच त्याचे वडील काम करतात हे कळलं.अतिशय चांगलं कुटुंब आहे ते! उलट त्यांनाच त्यांच्या मुलासाठी तुझी मुलगी 'नाकापेक्षा मोती जड'वाटतेय"सुहास शांतपणे बोलला.
    " सुमंत, आपल्या स्वत:च्या आई-वडिलांना भेटायला शेवटच कधी गेला आहेस? आठवतंय?त्यांना तुझ्या घरी उगीचच कधी आणलस? आठवतंय?पैसे खूप पाठवतोस त्यांना, पण त्यांना तुझा सहवास हवाय त्याच काय? तुझ्या अहंकारामुळे तुझा मुलगा तुला सोडून गेलाय.आणि आता तू मुलीला गमवू नये म्हणून मी तुला समजवायचा प्रयत्न करतोय.
    तुझा 'दृष्टीकोन' म्हणजे तुझी विचार करण्याची पद्धत असं जर म्हटलं तर तुझा अहंकार जो परिस्थिती किंवा समोरच्याचा विचार न करता तुझं मत बनवतो असा दृष्टिकोन आणि तो दृष्टीकोन फार कमी वेळा सकारात्मक असतो सुमंत!!
      सुमंत केबिन बाहेर बघू लागला.
     "माझी केबिन साऊंड प्रुफ आहे, बाहेरच्यांना आतलं दिसतही नाही. आठवतं,अशीच तुझी केबिन आहे ज्याचा गर्वानी कितीवेळा उल्लेख केला आहेस तू माझ्या जवळ!" सुहास मिश्कीलपणे म्हणाला.
      अचानक सुमंत उठला.सुहासला वाटलं संपले संबंध बहुतेक!
        "सुहास,तुझ्या आॅफिसमध्ये त्या मुलाचे वडील आहेत ना? उद्या संध्याकाळी आपण त्यांच्या घरी जाऊया का? भेटून पुढचं ठरवूया.त्यांना तसं सांगशील?"सुहासला सुमंतच हे बोलतोय ह्यावर विश्वासच बसत नव्हता.नाही म्हणायचा प्रश्र्नच नव्हता.
          ..............................
       दुसऱ्या दिवशी सकाळीच सुमंत केतकीला घेऊन सुहासच्या घरी आला.त्याला बघून सगळेच चकित झाले.कारण काल जे घडलं ते दोघा मित्रांमध्येच होतं.सुहास घरी काहीच बोलला नव्हता.आणि ती खात्री सुमंतला पण होतीच.
      "थॅंक यू सुहास, आजुबाजुला जे घडत असत ते पाहणं आणि दिसणं यातला तिसरा कोन दृष्टीचा असतो जो मी अहंकारानी दुषित केला होता. माझ्या वागण्याचं थोडस समर्थन नाही,पण खडतर दिवसात आलेल्या वाईट अनुभवांमुळे हा कडवटपणा आला असेल बहुतेक, पण जवळची माणसं आता मला गमवायची नाहीत. मी आई-बाबांना आणायला गाडी पाठवली आहे.म्हणून मी कालच जाऊया असं न म्हणता एक दिवस घेतला.सगळी बोलणी व्यवस्थित झाली तर तुझ्या आणि माझ्या आईला,वहिनींना तिथं बोलावून घेऊ".सुमंत मनापासून बोलत होता.
     केतकी मामाला अंगठा दाखवून हसली आणि लगेच पुढे येऊन त्याच्या पाया पडली.सुहासच्या मनांत आलं"खरंच, आपला दृष्टीकोन म्हणजे आपली जगण्याची सकारात्मक जाण असली पाहिजे!
                                                                            - ललिता छेडा

Thursday, December 20, 2018

चौकट

आपल्या बेडरूमच्या खिडकीतून सुमित्रा खाली तिच्याच साठाव्या वाढदिवसाच्या समारंभाची तयारी बघत होती.सर्वांची चाललेली लगबग बघून तिला वाटलं तिचे दोन्ही मुलगे,सूना,एकूलती एक लेक कोणीही गेल्या कित्येक वर्षांत  आई,कशी आहेस तू?'असं विचारलं नाहीय.आणि आज त्यांच्या बाबांच्या म्हणजेच सुमित्रेच्या यजमानांच्या परिचयातली, राजकारणातली मोठी मोठी मंडळी येणार आहेत म्हटल्यावर तिघही समारंभासाठी धावपळ करत होती. मेन्यू मधल्या ह्या पदार्थाची निवड माझी,ही आयडिया मला सूचली अशी क्रेडिट्स घ्यायला हवीत ना! सुमित्राला हसू आलं.ह्यांना माझा आवडता पदार्थ तरी माहिती आहे की नाही कुणास ठाऊक?
     सुमित्राला आठवलं चाळीस वर्षांपूर्वी महेश तिच्या आयुष्यात आला तेव्हा तो तिच्या बाबांच्या मित्राचा मुलगा येवढीच त्याची ओळख होती.गावाकडचा वडिलांचा दुधाचा धंदा मुंबईत सूरु करण्यासाठी म्हणून सुमित्रा रहात असलेल्या सायन स्टेशनजवळच्या  सोसायटीतून तो भाड्याची खोली शोधत होता.  नशीबानं त्याला तिच्या सोसायटीतच जागा मिळाली.
       वर्षभरात त्याने त्या एरियात ओळखी वाढवून धंध्यात छान जम बसवला.
      सुमित्रा तिच्या नकळत त्याच्या प्रेमात पडली आणि महेशला पण आपणआवडतोय हेही तिला कळलं होतं. एकुलत्या एक लेकीसाठी स्थळ म्हणून नांव ठेवायला काहीच जागाच नसल्यामुळे दोन्ही घरातल्यांच्या संम्मतीने त्यांच लग्न झालं.
    लग्नाच्या वेळी बी.ए.असलेल्या सुमित्राने बी.एड.करून म्युनिसीपाल्टीच्या शाळेत नोकरी धरली होती.तिला शिकवायला फार आवडायचं आणि त्यातपण अशा शाळेत शिकवायचं तिचं स्वप्नच होतं.आणि तिला पाहिजे ते सगळंच मिळत गेल्याने ती खुष होती.
     लग्नानंतरची दहा वर्ष तिन्ही मूलांचा जन्म, नोकरी,महेशचा व्यवसाय ह्यात कुठे गेली कळलंच नाही.जवळच रहाणार्‍या आईची सुमित्राला  खूप मदत होत होती.आणि धंध्यात जम बसेपर्यंत महेशला सुमित्राच्या पगाराची जोड होती.
     सामाजिक कार्याची प्रचंड आवड असलेला महेश व्यवसायाबरोबर आपल्या सार्वजनिक कामातही व्यस्त असायचा. राजकारणाची पण त्याला आवड होतीच त्यामुळे त्याची सामाजिक कामं तो एका पार्टीच्या माध्यमातून करु लागला होता.त्यामुळेच ते रहात असलेल्या विभागापासून थोडशा लांब असलेल्या जागेवरुन महेशला पार्टी कडून नगरसेवक म्हणून निवडणूकीचं तिकीट मिळालं.आणि त्यांच्या आयुष्याला एक वेगळंच वळण लागलं.
   ती निवडणूक जिंकल्यावर महेशने मागे वळून पाहिलेच नाही.त्या एरियात त्याचा बंगला,गाड्या असं साम्राज्य उभं राहिलं.हे सगळं मुलांना त्यांच्या न कळत्या वयात मिळाल्याने त्यांना 'कष्ट' शब्दाची ओळखच राहिली नाही.सुमित्रा तिच्या कडून मुलांवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी प्रयत्न करायची पण तिच्या ह्या विचारानी मूलं तिच्यापासून दूरावत गेली.
       त्यानंतरच्या पंचवीस वर्षांत आपल्या स्वभावानी,धडपडीने महेशनी केन्द्रात मंत्रीपद मिळवलं होतं.आणि महेशभाईचा कधी ते 'भाईसाहेब' झाले सुमित्राला कळलंच नाही.त्याचा चुकीच्या मार्गाने येणारा पैसा ही तिला आवडत नव्हता. 
   महेश दिल्लीत गेल्यावर  मुंबईतल आॅफिस, सगळ्या अपाॅंटमेंटस् सांभाळायला सेक्रेटरी म्हणून कांचनला नेमलं गेलं.आणि सुमित्राच्या मनाविरुद्ध अनेक गोष्टी घडू लागल्या.मुंबईच्या कार्यालयासाठी नेमलेली कांचन कधी दिल्लीचं काम सांभाळायला तिकडे राहू लागली कळलंच नाही.
     विचारात हरवलेल्या सुमित्राला खाली बागेत  तिचा जावई  हांका मारुन बोलावत होता.त्याच्या आवाजाने ती भूतकाळातून बाहेर आली.
    खरं म्हणजे तिचा जावई जातीने गुजराती, पण अस्खलित मराठी बोलयचा! तिच्या मनात आलं  "हा कोण आहे माझा,पण ह्याला जेवढी मी कळते माझ्या मुलांना नाही कळत असं का होतं?
    पैसा म्हणावं तर आपल्या जावयाचे वडिल पार्टीचा आर्थिक आधार आहेत, संस्कार म्हणाव तर ह्याच्या घरातलं वातावरण इतकं जुन्या वळणाच आहे पण ह्याचे विचार मात्र अगदी वेगळे आहेत.
      तिला वाटलं पैसा आणि संस्कारा पलिकडे काही तरी असतं ते ह्याच्यात आहे.
         तिच्या अपेक्षेप्रमाणे तो वर आला आणि म्हणाला"आई,तुमचा वाढदिवस आणि तुम्ही अजून तयार पण नाही झालात?
      नाही रे असल्या वाढदिवसाची मला आवड ही नाही आणि असले शो  मला आवडतही नाहीत.पण मी जे ठरवलंय ते सर्वांना सांगायला हा समारंभ योग्य आहे म्हणून मी होकार दिला."सुमित्रा अवघडलेल्या स्वरात बोलली.
    "म्हणजे अजून तुमच्या डोक्यातून तो विचार गेला नाहीय? त्यानं विचारलं.
      ""अरे तो माझा निश्चय आहे, विचार नाही."सुमित्रा ठामपणे म्हणाली.तू बोलला नाहीस ना कोणाला?"
    "नाही"तो थोडा अस्वस्थ झाला होता."तुम्हाला प्राॅमिस केलय मग कसं बोलेन?
      "तू हो पूढे मी येते तयार होऊन! सुमित्रानी विषय संपवला होता.
       ती खाली गेली तोपर्यंत खूपशी मंडळी आलेली होती.दोन्ही सूनांनी तिच्या दोन्ही बाजूला येऊन तिची  छानशी एन्ट्री केली.सर्वांनी टाळ्या वाजवून तिचं स्वागत केलं.
    स्टेजवर आधीपासून भाईसाहेब, तिन्ही मूलं उभीच होती.ती आल्यावर फोटोचे फ्लॅश उडाले.सुवासिनींनी एकसष्ट दिव्यानी ओवाळलं.
    कार्यक्रमाचा सूत्रसंचालक तिचं कौतुक करत होता.तिची साधी राहणी, तिचं म्युनिसीपाल्टीच्या शाळेच पिन्सिपल असणं,तिच पी.एच् डी.पर्यंतच शिक्षण आणि शेवटी "साहेबांच्या मागे खंबीरपणे उभ्या असलेल्या वहिनींना मी त्यांच मनोगत सांगण्याची विनंती करतो असं म्हटलं आणि माईक सुमित्राच्या हातात दिला.
      सुमित्रा शांतपणे उभी‌ राहून बोलू लागली.
      "सर्वप्रथम इतका देखणा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी माझ्या कुटुंबाचे आणि तुम्ही सर्वजण आलात त्याबद्दल सर्वांंचे मनापासून आभार मानते.
     साठावं वर्ष हे निवृत्तीच वय मानलं जातं. आणि नुकतीच मी शाळेच्या नोकरीतून निवृत्त झाले.तशीच आता मी घरातूनही निवृत्ती घेणार आहे.उद्यापासून मी माझ्या वडिलांच्या सायनच्या घरी रहायला जाणार आहे.त्यांच्यानंतर त्यांनी ते घर माझ्या नांवावर केले होते..तिथे मला आर्थिकदृष्ट्या मागास मुलांसाठी मोफत क्लासेस सुरू करायचे आहेत.तेव्हा आता मला भेटायला तुम्हा सर्वांना तिथं यावं लागेल.
      सुमित्राचा हा निर्णय खर म्हणजे सर्वांना अनपेक्षित होता.पण महेश पक्का राजकारणी त्यानं लगेच माईक हातात घेतला आणि म्हणाला"अशीच निवृत्ती मी राजकारणातून घेतली की आम्ही दोघांनी त्या घरी आनंदात रहायचं ठरवलंय!आमचे निर्णय नेहमीच एकत्र येऊन घेतलेले असतात. तेव्हा आपण आता सहभोजनाचा आनंद घेऊया.सर्वांनी टाळ्या वाजवल्या.
      सुमित्रा महेशकडे बघून हसली.
      कार्यक्रम संपण्याआधीच सुमित्रा तिथून निघून गेली.
      दुसऱ्या दिवशी सकाळी चहाच्या टेबलावर सगळेच जण तिची वाट बघत होते.
    तिला बॅग घेऊन आलेली बघून महेश रागानेच म्हणाला"असं घर सोडून जायची काही गरज नाही.घराची चौकट मोडून जाण्याने तुझं हसं मात्र करून घेशील.
     सुमित्रानी हातातली बॅग खाली ठेवली आणि म्हणाली"कोणती चौकट?घरात एकत्र राहून ह्या माझ्या मोठ्या मुलाला, सुनेला गेले महिनाभर मी माझी पुस्तके, सामान घेऊन जातेय हे कळलं नाही.ह्याना माझ्या प्रकाशित दहा पुस्तकांपैकी दोन पुस्तकांची नांव तरी माहीत आहेत असली तरी बस्! तुमचा विरोध असतानाही ह्याला वकील व्हायचं होतं म्हणून मी त्याच्या पाठीशी उभी राहिले.आणि आज हा तुमच्या केसेस मॅनेज करतोय!ह्याच्यासाठी मी घरात कोणत्या नात्यानं राहू?
   ही तुमची लाडकी लेक प्रेमात पडली हे तिने प्रथम कांचनला सांगितलं.कोणत्या नात्यानं? आणि तिचा नवरा ना माझ्या नात्याचा,रक्ताचा तो कांचनशी बोलत देखील नाही.कांचनमुळे आपल्या आईला होणारा त्रास हिला कळत नाही?
       हा धाकटा मुलगा तो तुमचा दुधाचा धंदा स्वत:च्या नांवावर करून घेतो.मला सांगत सुध्दा नाही.वेगळा रहायला जातो.मला विचारत देखील नाही, तर सरप्राईज च्या नावानं अचानक नवीन घराच्या वास्तुशांतीला घर दाखवतो.
       आणि ह्या सगळ्याला जबाबदार महेश, तुम्ही आहात!माझी जागा तुम्ही घराच्या चौकटीच्या आत ठरवलीत.त्यामुळे मुलांना पण माझी दखल घ्यावी असं वाटलं नाही अगदी चौकटीच्या आतसुध्दा.त्यातसुध्दा कांचन बरोबर तुम्ही राजरोसपणे सेक्रेटरी म्हणून दिल्लीत रहाता आणि ह्या घरातल्या कोणत्या चौकटीबद्दल बोलताय?
      वाढदिवस साजरा करून मन नाही जिंकतायेत!
   ‌ "मी तिथे एकटीच रहाणार आहे."सुमित्रा बोलत होती.मी‌ चौकट मोडली नाही तर मोठी केलीय! माझ्या ह्या कृतीने एकीला जरी स्वत:ची घुसमट संपवायला प्रेरणा मिळाली तरी मी घराबाहेर टाकलेलं हे पाऊल यशस्वी झालंअसं समजेन.
    मागे वळून न पाहण्याच्या निश्र्चयानी सुमित्रानी ताठ मानेने बॅग उचलली आणि घराची चौकट ओलांडली!!!
            ललिता छेडा

Thursday, December 13, 2018

श्रद्धा

सुधाचा दिवस खरं म्हणजे पहाटे पाच वाजताच सूरू व्हायचा पण आज मार्गशीर्षातला पहिला गुरुवार आणि ह्यावर्षी भजनी मंडळाच्या बायकांनी सगळ्यांनी त्यांचा घरातल्या देवीच्या मूर्तीची एकत्र पुजा करण्याचं ठरवलं होतं.त्यामुळे त्या अंमळ लवकरच उठल्या.हाॅल मधल त्यांच देवीच मंदिर स्वच्छ कराव लागेल,हाॅलपण आवरावा लागेल ह्या विचारांनीच त्यांना जाग आली होती.
          देवीच्या मूर्ती समोर उभ्या राहिल्यावर सुधाला आठवलं ती गांवच्या घरातून मुंबईला जायला निघाली तेव्हा सासुबाईंनी किती प्रेमानी विचारलं होतं की"तुला काय हवंय ह्या घराची आठवण म्हणून?"तिनी क्षणाचाही विचार न करता म्हटलं होतं"कमळात बसलेली देवघरातली संगमरवरी देवीची मूर्ती! आणि सासूबाईंनी पण आनंदाने मूर्ती न्यायला परवानगी दिली.
     कारण ती सदाशिवशी लग्न करून कोल्हापूरजवळच्या त्या छोट्याश्या गावात आली तेव्हापासून तिची देवघरातल्या त्या मुर्तिशी
जवळीक निर्माण झाली होती.तिला ती मूर्ती अतिशय आवडली होती. आणि सासूबाईंपण तिची त्या मुर्तिवरची श्रद्धा जाणून होत्या.
     आणि  तिची ह्या घरातली दुसरी आवडती गोष्ट म्हणजे दागिने बनवण्याच्या घरच्या व्यवसायातले दागिने!           
       सुधाचे दोन्ही मोठे दिर दागिने बनविणारे कारागीर होते.आणि घरातल्या दोन खोल्यात त्यांचे ते काम सुरू असे.बनलेला प्रत्येक दागिना मनातल्या मनात घालून बघायचा सुधाला नादच होता.  
   सगळे दागिने घालून फोटो काढायचं तिचं एक स्वप्न होत.
     मोठमोठ्या सराफांची त्यांच्या घरी उठबस असे. 
     तिच्या नवर्‍याला सदाशिवला मात्र ह्या गोष्टीची आवड नव्हती.त्यामुळे तो शिकला आणि मुंबईत चांगल्या नोकरीला लागला.
      भांडूपमधल्या सोसायटीत घर घेतल्यावर सदाशिवनी जवळजवळ दोन वर्षानी सुधाला मुंबईला बोलावलं.सुरवातीला सुधानी ती मुर्ति स्वैपाकघरात ठेवली.काही वर्षांनी घराला रंग द्यायच्या निमित्ताने सुधानी छानसं मखर करून मूर्ती बाहेर आणून ठेवली.आणि घर गेटजवळ पहिलंच असल्याने येणार्‍याजाणार्‍यांच्या नजरेस पडू लागली.नकळत मंडळी हात जोडू लागली.
    त्या एरियातल्या भजनी मंडळाच्या बायकांनी देवीसमोर भजनाची प्रॅक्टिस सूरू केली.
    एक दिवस हसत हसत सदाशिवनी सुधाला म्हटलंसुद्धा"घराचं मंदिर नको व्हायला येवढं लक्षात असू दे.
     त्यावर सुधा हळव्या स्वरात म्हणाली"आपल्याला नाही मुलंबाळं, मला एकटीला कंटाळा येतो तुम्ही पण नसता दिवसभर, ह्या बायकांच्या येण्यानी,भजनांनी माझा वेळ छान जातो.
    सुधा हातानं कामं करत होती,पण विचारात गढली होती.
    अचानक सोसायटीतल्या इराची हांक आली"सुधामामी,उठलीस का? आणि तिच्या आवाजानी सुधा विचारांतून बाहेर आली. 
     अग, ये ना आणि उठलीस का काय विचारतेस? घर आवरतेय आज पूजा आहे ना घरी!सुधानी दार उघडलं आणि इराला घरांत घेतलं.
       "त्या पूजेचच मला शूटिंग करायचंय! आमच्या चॅनलला मार्गशीर्ष महिन्याचा इव्हेंट दाखवायचाय"इरा कॅमेर्‍यासकटच आली होती.
      इरांनी सुधाची छोटीशी मुलाखतच घेतली.मार्गशीर्ष महिन्याच महत्व,मुर्तिचा इतिहास सुधा खूप छान बोलली."अग मामी, तू कॅमर्‍यात काय मस्त दिसतेयस!बोललीस पण किती छान!
         दुसऱ्या दिवशी टी.व्ही.वर साग्रसंगीत पूजा बघताना सगळ्यांनाच खूप गंमत वाटली.
       तिसऱ्या-चौथ्या दिवशी सुधाला एका मोठ्या दागिन्यांच्या कंपनीच्या जाहिरातीसाठी तुम्ही काम कराल का?अस विचारणारा फोन आला.सुधाला काहीच कळेचना तिनं इराला बोलावलं.इरानी त्या कंपनीला परत फोन केला.आणि तिला कळलं की त्या कंपनीला तीन पिढ्या त्यांच्याकडे दागिने घेतात अशी जाहिरात करायची आहे.आणि मधली पिढी म्हणून सुधामामींना निवडलाय.त्यांना टी.व्ही.वर बघून त्यांनी तो फोन केला होता."अग पण फोटो काढायला येवढे दागिने कुठे आहेत माझ्याकडे?सुधाचा भाबडा प्रश्न ऐकून इरा हसली आणि म्हणाली"मामी, दागिने ते देणार!तुम्ही फक्त ते घालायचे सांगतील तस बसायचं आणि फोटो काढून घ्यायचा.! तुम्हाला त्याचे पैसे पण मिळतील."
      सुधा अवाक् होऊन ऐकत राह्यली.तिच स्वप्न देवीनं पूर्ण केलं होतं.मार्गशीर्षातल्या गुरवारची पूजा तिला फळली होती.
  बघता बघता सोसायटीत ही बातमी पसरली आणि सगळेजण मामींच्या घरी जमा झाले.सुधाला तर काय करावं काही सुचत नव्हतं.तिच्या स्वप्नाबद्दल ऐकल्याबरोबर कोणीतरी असंच माझं स्वप्न पूर्ण होऊदे 'माझ्या मुलाला नोकरी लागू दे' असं म्हणून देवीला हळदकुंकू वाह्यलं आणि बघता बघता एक छोटीशी लाईनच देवीपूढे लागली.
    हे सगळं बघून सदाशिवला मात्र"हे सगळं श्रद्धेकडून अंधश्रद्धेकडे जाताय की काय अशी शंका आली.आणि ह्यासाठी काही तरी करायला हव असं पण जाणवलं.
   जाहिरातीच्या शूटिंगसाठी सुधाबरोबर इरा आणि सदाशिव दोघेही आले होते.सुधाला सुंदर साडी आणि गळ्यात, हातात घालायला दागिने दिले आणि ती अक्षरशः मोहरून गेली.
    कंपनीने जमलं तर टी.व्ही.मधली मूर्ती पण आणा असं म्हटल्यामुळे मूर्ती पण बरोबर होतीच.मूर्तीजवळच एका झोपाळ्यावर तीनही पिढ्यांच्या स्त्रीयांना बसवून शुटिंग सुरू होत.सुधाला आपल्या अंगावर इतके  दागिने आहेत ह्यावर विश्वासच बसत नव्हता.ती सारखी आरशात जाऊन बघत होती.आयुष्यभराचं स्वप्न असं पूर्ण होईल ह्याचा आनंद काही औरच होता.
   मूर्तिला थोड्या वेळात खूप सुंदर स्वच्छ करून आणि छान रंगवल होतं.मुर्तिला तिच्या मापाचे दागिने घातले होते.मूर्ति खूप तेजस्वी दिसत होती.
       सगळ्यांनी दिवसभराच शुटिंग एन्जाॅय केलं होतं.
      घरी परताना बघितलं तर मूर्ती एका फुलांनी सजवलेल्या मखरात प्रवेशद्वारावर ठेवली होती.  अगोदरच तिथे एक गणपतीची मूर्ती होती तिच्या शेजारी देवीची मूर्ती छान वाटत होती. राहू दे थोडे दिवस इथेच अशी त्या मंडळीनी विनंती केली. 
    आणि सदाशिवला हळूच कंपनीच्या मालकांनी "तुम्ही परवानगी दिलीत तर आयुष्यभर इथेच छान मखरात ठेवू" असं म्हटलं.सदाशिवनी हसून सुधाकडे हात दाखवला.सुधा मूर्ती समोर डोळे मिटून उभी राह्यली होती.
        सोसायटीत सगळेजण वाटच बघत होते.नवस बोलणार्‍या काकूंच्या लेकाला इंटरव्ह्यूचा काॅल आला होता.त्यामुळे सर्वजण दारातच मूर्तीची चौकशी करू लागले.
   कोणीतरी म्हणालं सुध्दा"आता आपण गेटवर त्या देवीच मंदिरच बनवूया"
     सदाशिवला मंदीर बनवण्यापेक्षा मूर्तीला छान स्थान मिळालय असं वाटत होतं.पण म्हणजे देवीला आपल्या घरातून आपण बाहेर काढतोय का? त्याला काहीच कळत नव्हतं.का इतकी वर्ष आहे तशी आपल्या घरातच ठेवावी.सदाशिवला वाटलं आपण फार विचार करतोय.ठरवू दे सुधाला काय करायचं ते! कारण ती मूर्ती तिनीच आणली होती.
   त्याच्या मनातलं ओळखल्या सारख सुधा म्हणाली"हे बघा सध्या तरी आम्ही मूर्ती तिथेच ठेऊन आलोय त्या मंडळींनी मूर्ती शोभून दिसेल अशा जागेवर ठेवलीय.आम्हाला ते आवडलय.
     सदाशिवला बरं वाटलं की सुधाची परमेश्वरावरची श्रध्दा खरी आहे.त्यासाठी‌ तिला मूर्तीची गरज नाही.

                                                                              -ललिता छेडा.


Thursday, December 6, 2018

पम्मीआन्टी


पंचेचाळीस वर्षांपूर्वी खारच आमचं घर म्हणजे एका मोठ्या बंगल्याच्या आवारातल मागच्या बाजूला असलेल्या आऊट हाऊसमधल्या तीन खोल्यांचं भाड्याच घर होतं.आणि आमच्या खोल्यांसमोर बंगल्याला लागून तीन खोल्यांची गेस्ट रूम होती.तिथे शर्माअंकल रहायचे.माझे सासरे आणि शर्मा दोघेही एकाच कंपनीत कामाला होते.आणि चांगले मित्रही होते. जागेच्या शोधात असताना पंजाबी घरमालक असलेल्या ह्या बंगल्यात शर्मांच्या ओळखीनं ह्या दोघांना मनासारख्या जागा मिळाल्या.
         मी लग्न करून आले तेंव्हा खार इतकं गजबजलेलं नव्हतं. काही नटनट्यांचे बंगले, छोट्या छोट्या चाळी आजूबाजूला होत्या पण आमच्या पुढचा बंगला आणि त्याच्या भोवतालची बाग, झोपाळा, छोटासा हौद हे सगळं इतकं सुंदर होतं की मी त्या घराच्या प्रेमातच पडले. आम्हाला घर लावून दिल्यावर  माझे सासुसासरे गिरगावात धाकट्या दिराकडे रहायला गेले.
    आमच्या सारखे शर्मा अंकल,आंन्टी आणि त्यांचा नुकताच डाॅक्टर झालेला मुलगा अजय असे दुसरे भाडेकरू! 
       सर्वजण ज्यांना बडेपापा म्हणून ओळखत होते असे आमच्या बंगल्याचे मालक! 
      आणि त्यांच मुलाबाळांनी भरलेलं घर! मला छानसा पंजाबी मनमोकळा शेजार मिळाला होता.
     वर्षभरात माझ्या लेकीचा जन्म झाला आणि त्यानंतर थोड्याच दिवसांत डॉ.अजयच लग्न ठरलं.मुलगी दिल्लीची होती.लग्नही दिल्लीला होणार होतं.शर्माअंकलनी आम्हां सर्वांना खूप आग्रहानी दिल्लीला नेलं.आणि तिथे छान बडदास्तही ठेवली.
      नवी नवरी खूपच सुंदर होती.पंजाबी लालसर गोरेपण,नितळ त्वचा, लांबसडक केस, तिच्याकडे बघितलं की नजर दुसरीकडे जातच नव्हती.तिचं नांव पमिला का कायसं होतं पण सर्वजण तिला 'पम्मी' म्हणत होते.
    अजय तर अगदी वेडावला होता.पम्मी पण खूष दिसत होती.मुंबईला परताना त्या दोघांना कुपे होता पण अजय रात्री झोपण्यापूर्वी आम्हा सर्वांना भेटायला पम्मीला घेऊन आमच्या डब्यात आला.माझ्या जवळ बसून पम्मी हळूच म्हणाली" हमारे घर के बाजु में कोई पिक्चरका स्टुडियो है क्या? मुझे सिनेमामें काम करना है! मी अवाक झाले काय बोलावं कळेना.पण लगेच सावरून म्हणाले"पहले घर चलो,फिर ढुंढलेना।
      आमच्या सर्वांच स्वागत बडेपापानी जोरदार केलं.बंगल्यावर सगळ्यांना जेवायला बोलावलं.आणि जेवताना सहज म्हणाले"अरे अजय तेरी बीबी तो सिनेमाकी हिराॅईन लगती है! झालं,पम्मीनी ते उचलून धरलं."सचमुच मुझे पिक्चर में काम करना है,आप परमिशन दोगे। तिने लाडात येऊन अजयला विचारलं.आणि त्या माहौलमध्ये तो देखील "ठीक है"म्हणून गेला.
   दुसर्‍याच दिवशी छानशी तयार होऊन पम्मी मला सांगून स्टुडिओच्या शोधात बाहेर पडली.वर्षभरानी तिला एक सिनेमा पण मिळाला.आम्ही सर्व बघायला गेलो.ती फक्त दोन सीनमध्ये ओझरती दिसली.पण तेवढ्यावर ती जाम खुश झाली होती.
    घरी आल्यावर मी अजय समोरच तिला म्हटलं"अग,येवढ्याशा कामासाठी किती धावपळ करतेयस?"भाभीजी,बडे पडदेपर दिखना मेरा सपना है।वो कैसे पुरा हो रहा है वो मैं नहीं सोचती। मुझे कोई भी गलत कदम उठाके आगे नहीं बढ़ना।"ती इतका विचार करतेय हे ऐकून बरं वाटलं.तिला तसे हळूहळू छोटे रोल मिळू लागले होते.
  त्यानंतर तिला दिवस गेले.मुलगी झाली.अजयला वाटलं ही विसरेल पण पम्मीनी मुलीला सांभाळायला बाई ठेवली.आणि पुन्हा जोरात फिरु लागली. अजय पण त्याच्या प्रॅक्टिस मध्ये गुंतला. लवकर रिटायरमेंट घेऊन सासरे दिल्लीला निघून गेले.
    प्रत्येक नटांबरोबर स्वत:चे वेगवेगळ्या सिनेमांच्या सेटवर फोटो काढायचे हा तिचा आवडता छंद होता.त्या फोटोंचे पम्मीने अल्बम बनवले होते.नट्यांबरोबर राहून तिनं मेकअपच तंत्र शिकुन घेतलं.ती सतत घरात सुध्दा मेकअप केलेलीच असायची.आणि गडद रंगाचे कपडे घालायची.
     एका छोट्या जाहिरातीत एकटीच झळकल्यावर तर तिला आभाळ ठेंगणं झालं.
     तिला थोडं यश मिळत असतानाच अचानक दोन घटना तिच्या मनाविरुद्ध घडल्या.
     जवळजवळ दहा वर्षांनी तिला दिवस गेले, आणि बडेपापानी प्राॅपर्टी डेव्हलपमेंटला दिली. 
      बडेपापांची दोन्ही मुले अमेरिकेत स्थायिक झाली..त्यामुळे त्यांनी तिकडेच  जायचं ठरवलं.पण जाताना त्यांनी आम्हा दोन्ही भाडेकरूंना तिथेच उत्तम जागा मिळाली पाहिजे अशी बिल्डरला अट घातली.आणि आमच्यावर आयुष्यभराचे उपकार केले.
     विक्रमचा,पम्मीच्या मुलाचा जन्म आणि जागांसाठी अदलाबदल ह्यात पम्मी सिनेसृष्टीपासून दूर गेली.त्या दोन वर्षांत  बदलीची जागा दूर मिळाल्यामुळे आम्ही पण लांब रहायला गेलो होतो. नाहीतर माझ्या दोन मुली एक मुलगा असलेल्या कुटुंबात तिची मुलगी सहज मिसळून जायची.
      आपल्या दोन्ही मुलांचे जन्म चुकीच्या वेळी झाल्याने आपल्याला सिनेमात करिअर करता आली नाही अस पम्मीच ठाम मत होतं. . तशी तिची बडबड सुरु पण असायची! कदाचित त्याचा परिणाम असेल तिच्यात आणि मुलांमध्ये जिव्हाळ्याचे संबंध कधी निर्माणच झाले नाहीत.विकीला तर तिचा मेकअप अजिबात आवडत नसे.
       नवर्‍यावर मात्र पम्मीच खरंखुरं प्रेम होतं.अजय पण तसाच खराखुरा पंजाबी होता. Happy Go Lucky! प्रत्येक गोष्ट पाॅझिटीव्हली स्वीकारणारा,आनंदी!पम्मीला त्यानं गाडी पण घेऊन दिली होती.ती चालवायची पण छान.आम्हा दोघांना, मुलांना ती नेहमी कुठेही सोडायला तयार असायची.पण माझ्या सासूबाई आणि हे दोघेही तिच्या सततच्या मेकअपनी चिडचिड करायचे.
     मला बाई आवडायचं तिच असं नटणं! आणि तिचं म्हणणं"नेहमी छान तयार रहावं काय माहित कोण कधी फोटो मागेल आणि पिक्चरची आॅफर मिळेल." मला ही निरागसता पण आवडायची.
       पम्मीची मुलं मात्र त्यांच्या वडिलांच्या खूप जवळ होती.अजयनी सांगितलेलं ऐकायची.पम्मीच्या ह्या सिनेमा वेडानी अजयनी विकीला हाॅस्टेलला ठेवायचं ठरवलं आणि मला थोडं वाईट वाटल.
     आमच्या जुन्या जागेवर दोन टाॅवर आणि सहा राॅ हाऊसची मोठी सोसायटी बनली होती.आम्हाला दोघांना बिल्डरनी शेजारी शेजारी राॅ हाऊस दिली होती.खूप छान घरं होती.
   हळूहळू आमची मुलं मोठी होत होती.माझ्या दोन्ही मुलींची लग्न झाली.आणि मुलगा वडिलांच्या सारखाच वकील झाला होता.
      पम्मीची मुलगी पण एम.बी.ए.करून नोकरी करत होती.मुलगा विकी दहावीला होता.
   पम्मीला सोसायटीतली मुलं 'पम्मीआन्टी' म्हणायला लागली होती.तिला ते अजिबात आवडत नव्हतं. कारण ती अजून भुतकाळातच रमलेली होती.प्रत्येकाला अल्बम दाखवणं, डायलॉग बोलून दाखवणं तिचा आवडता टाइमपास होता.आणि पम्मीची इंडस्ट्री मात्र  झपाट्याने बदलत होती.नवीन चेहरे, नवीन टेक्नॉलॉजी,त्यात तिला स्थान मिळत नव्हतं.ती मात्र न हरता परत परत प्रयत्न करत होती.
      आणि अचानक डॉ.अजयच हार्ट अॅटकनी दु:खद निधन झालं.पम्मीचा आधारच गेला.नंतरच्या दिवसात दोन्ही मुलं तिच्याशी थोडी फटकूनच वागत होती.पंधरा दिवसांनी विकीनी त्याच सर्व सामान आवरून दादाजीं बरोबर दिल्ली जात असल्याच जाहीर केलं आणि थोरल्या मुलीनी  एका परधर्मिय मुलाबरोबर "मी लग्न ठरवल" असून ती त्याच्या बरोबर लग्नानंतर दुबई जाणार असल्याचं जाहीर केलं.पम्मी प्रचंड दुखावली.सिनेमाच्या वेडात आपण मुलं गमावल्याच दारुण सत्य तिला कळत नव्हतं उलट तिला मुलांना आपलं कौतुक नाही ह्याचच दु:ख झाल होतं.
      येवढ्या मोठ्या घरात पम्मी आन्टी एकटी झाली . हातात सतत देवानंद, दिलीपकुमार, शाहरुख चे फोटो असलेले आल्बम, चेह-यावर मेकअप केलेली पम्मी केविलवाणी दिसायची.सोसायटीच्या बागेत, किंवा कोणाच्याही घरी गेली की "पम्मी आन्टी सिनेमाकी बाते बताओ ना" मुलंअशी चेष्टा करत!
    तिची दिवसात एखादी तरी फेरी माझ्या घरी होत असे. सुरवातीला मी तिला समजवायचा प्रयत्न केला पण तिची ओळख भुतकाळात जगणारी एक अपयशी सिनेनटी अशी उरली होती.
      त्यादिवशी सकाळीच पम्मी आमच्याकडे आली."भाभीजी, दोपहर को खाना खाने आऊ क्या? जरा तबियत ठीक नहीं है। पीठमे दर्द है!आप घरपे हो ना? तिने मला विचारलं. मी आनंदाने"अग ये की, विचारतेस काय?अस म्हटलं.
    दुपारी दीड वाजला तरी आली नाही म्हणून मी तिला बघायला गेले.खूप दरवाजा ठोठावला पण ती उघडेना.सोसायटीतल्या मंडळींनी पोलीसांना बोलावून दरवाजा तोडून उघडला.
     समोर सोफ्यावर छान ड्रेस घातलेली, मेकअप केलेली, उराशी आल्बम धरून ठेवलेली पम्मी शांतपणे झोपलेली होती.जवळ जाऊन बघितल्यावर जाणवलं"ती गेलेय"
      माझे अश्रू अनावर झाले होते पण "तिच्या हातातले आल्बम तिच्या हातातच राहू देत" येवढच बोलून मी तिथून निघाले.
      आयुष्यभर सिनेमावर प्रेम करणारी,भुतकाळात रमणारी पम्मी आता भुतकाळ झाली होती.


                                                                                      -ललिता छेडा