हल्ली सुमंतला भेटायला जायचं म्हणजे त्याच 'मी, मी' ऐकायच्या तयारीने जावं लागतंय असं मनात आलं आणि सुहासला हसूच आलं.आणि सुमंतच नेहमीच वाक्य "माझ्या दृष्टीने मला असं वाटतं"एका वाक्यातले दोन 'मी!'
सुहासच्या मनांत यायचं त्याला सांगावं "त्या तुझ्या दृष्टीला वेगवेगळे कोन लावून बघ काही तरी वेगळं मिळेल"
खर म्हणजे कोणीही कौतुक करावं असंच सुमंतच कर्तृत्व! पण यश डोक्यात गेलं की काय होतं ह्याच उत्तम उदाहरण म्हणजे सुमंत! पण सुहासला जवळचा मित्र आणि महत्त्वाचं म्हणजे धाकट्या बहिणीचा नवरा असलेल्या सुमंत कडे महिन्यातून एखादी तरी फेरी मारावीच लागे.
त्यादिवशी सकाळी आईनी फर्मानच काढलं"सुहास, उद्या सुमंतचा वाढदिवस आहे.म्हणून त्याला आवडणाऱ्या पुरणपोळ्या दुपारी करणार आहे.आॅफिसमधून आलास की तुम्ही दोघं जाऊन देऊन या.
"आपण येतोय ते पुर्णिमावन्संना कळवून ठेवा.कारण सुमंतभावजींना कळवल्याशिवाय गेलेलं आवडत नाही लक्षात आहे ना? सुहासच्या बायकोनी आईसमोर ऐकवायचा चान्स घेतला.
सुहासला आठवलं सुमंतची आणि आपली ओळख इंजिनिअरिंग कॉलेज मधली.दोघंही सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये! सुमंत सोलापूर जवळच्या गावातून आला होता. तो एका गरीब शेतकऱ्यांचा मुलगा पण त्याची हूशारी बघून एका स्वयंसेवी संस्थेनी त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली होती.शिवाय त्याला गणिताची शिष्यवृत्तीही मिळाली होती.
शिकत असताना एका नातेवाईकांकडे तो रहात होता.अतिशय कष्टांनी त्यानी घेतलेलं शिक्षण सुहासने खूप जवळून बघितलं होतं.शिक्षण पूर्ण झाल्यावर सुहासला नशीबाने चांगली सरकारी नोकरी मिळाली. सुमंतच मात्र कुठेच काही जमत नव्हतं.त्या स्ट्रगलच्या काळात तो सुहासच्या घरी खूपवेळा येत असे.आणि तिथेच त्याच आणि सुहासच्या बहिणीचे जुळलं.तसं दोन्ही घरातून विरोध असल्याचं कारण नव्हतच. फक्त सुमंतची करिअर सूरू व्हायची सर्वजण वाट बघत होते.
बांधकाम व्यवसायातलं पडेल ते काम करत असतानाच दोन अडीच वर्षांनी सुमंतला एक मोठ बिल्डींगच काम मिळालं.ते काम काही कायदेशीर अडचणीत सापडलं होतं.पण सुमंतनी हूशारीने आणि खडतर काळात झालेल्या ओळखींच्या मदतीने तो प्रश्र सोडवला आणि ते काम यशस्वीपणे पूर्ण केल.त्यानंतर जमिनीचे व्यवहार, कायदा, बांधकामाच्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्याने हळूहळू स्वत:चा ह्या व्यवसायात जम बसवला.आणि त्याच्या ह्या वैशिष्ट्यांमुळे आणि जोडीला असलेल्या प्रामाणिकपणामुळे त्याच्याकडे मोठ्या मोठ्या व्यक्तिंची येजा सूरू झाली.ह्या सगळ्याचा मात्र त्याला अभिमान येऊ लागला.
शिस्तीच्या नावाखाली लोकांना अपमानित करायचं,गरीब,गरजू लोकांना मदत करायची पण त्यांना स्वत:च्या कष्टांबद्दल ऐकवायचं, एकाच क्षेत्रात असल्यामुळे अधूनमधून सुहास सुमंतच्या आॅफिसवर जायचा.तेव्हा सुमंतच्या स्वभावाचे किस्से त्याला लोकांकडून ऐकायला मिळायचे.
अनेकदा सुहास म्हणायचा"अरे किती बदललास तू?त्यावर पूढे काही बोलू न देता सुमंत म्हणायचा"खूप कष्टाने मी इथे पोचलोय.हे वैभव,यश, कीर्ती मी परिश्रमातून मिळवलंय.उगीच कोणाचं ऐकून नाही घेणार"सुहासला वाटायचं"अरे बाबा तुझ्या यशाला अहंकाराची जोड नको देऊ,नम्रपणाच कोंदण मिळालं तर आम्हाला अभिमान वाटेल"असं सांगावं.
पण त्याच्या आवेशापुढे न बोलणंच योग्य आहे,अस दरवेळी सुहास ठरवायचा...
संध्याकाळी पुरणपोळ्या घेऊन सुहास बायकोबरोबर गेला खरा पण सुमंत थोडासा अस्वस्थ वाटला.
पुर्णिमा मात्र खूष दिसत होती."उद्या होणा-या ह्यांच्या पंच्चानव्या वाढदिवसासाठी सकाळच्या घरगुती नातेवाईकांसाठी होणार्या कार्यक्रमाला तुम्ही सगळे या. संध्याकाळच्या फाईव्ह स्टार हॉटेलमधल्या पार्टीला मात्र तुम्ही दोघेच या.लिमीटेड क्रीम आॅफ सोसायटी आहे ना!" पुर्णिमानी अगदी सुमंतच्या बायको सारखं आमंत्रण दिलं होतं.ती चहा आणायला आंत गेली आणि तिची लेक केतकी सुहास जवळ आली आणि म्हणाली" मामा,मला तुझ्याशी बोलायचंय.अगदी सहज मला आज तुझ्या घरी बोलाव ना रहायला!!.मग मी तुझ्या घरी गेल्यावर तुझ्याशी बोलू शकेन.
येवढ्यात पुर्णिमा चहा घेऊन आली.आणि सुहास काही बोलायच्या आत केतकी म्हणाली"मामा आज रहायला बोलावतोय, उद्या त्यांच्या बरोबर येईन.चालेल ना? नाहीतर असं करतो, उद्या सकाळी तुझ्या मदतीला मी आणि मामी लवकर येऊ"केतकीनी कोणालाही बोलायची संधी न देता सांगून टाकलं.तेवढ्यात आतून सुमंत फ्रेश होऊन आला.त्याच्याकडे बघून पुर्णिमा म्हणाली"अहो, केतकी आजीकडे आज रात्री रहायला जाऊ का विचारतेय पाठवू ना?सुमंतनी केतकीकडे रोखून बघितलं पण तिनं नजर चुकवली.
सुहासला जाम टेन्शन आलं.गेल्याच वर्षी केदार, सुमंतचा मुलगा इंजिनिअर झाला आणि फोटोग्राफी शिकायला घर सोडून निघून गेला.आणि जाताना"डॅड, मी तुमच्यासाठी इंजिनिअर झालोय पण माझी आवड फोटोग्राफी तर आहेच त्यात पण खास वाइल्ड लाइफ फोटोग्राफी माझ पॅशन आहे... तेव्हाही सुमंत असाच खूप अस्वस्थ झाला होता.पण त्याला 'अरे घरी राहून कर काय करायचं ते' असंही नाही म्हणाला.त्याचा इगो आड आला बहुतेक.
मामी बरोबर केतकी दरवाजात जाऊन उभी राह्यली.सुमंतनी सुहासच्या खांद्यावर हात ठेवला.हाताच्या त्या स्पर्शात हळवा बाप आधार मागतो आहे असं सुहासला उगीचच वाटलं.
घरी आल्यावर केतकीनी बाॅम्बच टाकला.ती स्वत: एका प्रसिद्ध टी.व्ही.चॅनलवर न्युज रिपोर्टर म्हणून काम करतच होती.आणि तिथेच तिची ओळख नाट्यचित्र क्षेत्रात काम मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या अजिंक्यशी झाली.दोघं प्रेमात पडले.आणि हे सगळं सुमंतला कळलं होतं.केतकी तिच्या निर्णयावर ठाम होती.तिला फक्त दोन वर्षाचा वेळ हवा होता.आणि त्यासाठी तिला मामाची मदत हवी होती.
वाढदिवसाचा पूर्ण दिवस सुमंत त्याच्या नेहमीच्या रूबाबात वावरला.सुहासनी पण काही विषय काढला नाही.
पण दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक सुमंत सुहासच्या आॅफिसवर आला.सगळ आॅफिस त्याच्या येण्यानं भारावून गेलं होतं.तो पण ह्या सगळ्या नजरांचे झेले झेलत आॅफिसभर सगळ्यांना भेटत होता.
सुहासच्या केबिनमध्ये आल्यावर "अरे व्वा तुला केबिन आहे नाही का? छान छान! ही प्रस्तावना सुमंत स्पेशल होती.सुहासला हसू आलं.थोड्याच वेळात माझ्याच केबिनमध्ये ह्याला त्याच्या लाडक्या लेकीचा निर्णय मला ऐकवायचाय.
"काय म्हणत होती केतकी? सुमंतनी सरळ विषयाला हात घातला.
"सुमंत तुला सगळं माहीत आहे आणि आज तुला ते शांतपणे स्वीकारायचय"सुहासनी पण आज ठरवलंच होतं सुमंतचा इतरांकडे क्षुल्लक नजरेनी बघायचा दृष्टिकोन बदलायचाच.मेव्हण्यापेक्षा मित्राच्या भूमिकेत जाऊन बोलायचं!
"तुला काय म्हणायचंय"मी त्या नाटक्याशी माझ्या मुलीचं लग्न लावून देऊ? माझ्या दृष्टीकोनातून त्याची माझ्या मुलीच्या जवळसुध्दा उभ रहायची लायकी नाहीय."सुमंत प्रचंड चिडला होता.
आता मात्र सुहास ला रहावेना.
"सुमंत,तो FTII चा पदवीधर आहे. उत्तम लिहीतो.स्पर्धेसाठी त्यानी लिहीलेल्या एकांकिका बक्षिसं मिळवतात.अतिशय चांगल्या घरचा मुलगा आहे.आईवडिलांबरोबर स्वत:च्या घरात रहातो.
सुमंत,तू स्वत:चे दिवस विसरलास.गरीब शेतकऱ्याचा मुलगा तू, नातेवाईकांकडे रहात होतास पण सुमंत, माझ्या वडिलांनी एक मिनिट सुध्दा विचार केला नाही कारण तू हूशार आहेस 'लाथ मारशील तिथं पाणी काढशील'अशी क्षमता ठेवतोस हे त्यांनी ओळखलं होतं.आणि तू त्या मुलाला बघितलं सुध्दा नाहीस आणि लायकी काढतोयस! आज सुहासने ठरवलंच होतं की सुमंतच्या डोळ्यावरचा अहंकाराचा चष्मा उतरवायचाच.
ज्याची बाजू घेतो आहेस त्याला तू तरी किती ओळखतोस? सुमंत गुरगुरला.
" काल केतकी आली तेंव्हा रात्री तोही आमच्या घरी आला.आणि बोलता बोलता आमच्या आॅफीसमध्येच त्याचे वडील काम करतात हे कळलं.अतिशय चांगलं कुटुंब आहे ते! उलट त्यांनाच त्यांच्या मुलासाठी तुझी मुलगी 'नाकापेक्षा मोती जड'वाटतेय"सुहास शांतपणे बोलला.
" सुमंत, आपल्या स्वत:च्या आई-वडिलांना भेटायला शेवटच कधी गेला आहेस? आठवतंय?त्यांना तुझ्या घरी उगीचच कधी आणलस? आठवतंय?पैसे खूप पाठवतोस त्यांना, पण त्यांना तुझा सहवास हवाय त्याच काय? तुझ्या अहंकारामुळे तुझा मुलगा तुला सोडून गेलाय.आणि आता तू मुलीला गमवू नये म्हणून मी तुला समजवायचा प्रयत्न करतोय.
तुझा 'दृष्टीकोन' म्हणजे तुझी विचार करण्याची पद्धत असं जर म्हटलं तर तुझा अहंकार जो परिस्थिती किंवा समोरच्याचा विचार न करता तुझं मत बनवतो असा दृष्टिकोन आणि तो दृष्टीकोन फार कमी वेळा सकारात्मक असतो सुमंत!!
सुमंत केबिन बाहेर बघू लागला.
"माझी केबिन साऊंड प्रुफ आहे, बाहेरच्यांना आतलं दिसतही नाही. आठवतं,अशीच तुझी केबिन आहे ज्याचा गर्वानी कितीवेळा उल्लेख केला आहेस तू माझ्या जवळ!" सुहास मिश्कीलपणे म्हणाला.
अचानक सुमंत उठला.सुहासला वाटलं संपले संबंध बहुतेक!
"सुहास,तुझ्या आॅफिसमध्ये त्या मुलाचे वडील आहेत ना? उद्या संध्याकाळी आपण त्यांच्या घरी जाऊया का? भेटून पुढचं ठरवूया.त्यांना तसं सांगशील?"सुहासला सुमंतच हे बोलतोय ह्यावर विश्वासच बसत नव्हता.नाही म्हणायचा प्रश्र्नच नव्हता.
..............................
दुसऱ्या दिवशी सकाळीच सुमंत केतकीला घेऊन सुहासच्या घरी आला.त्याला बघून सगळेच चकित झाले.कारण काल जे घडलं ते दोघा मित्रांमध्येच होतं.सुहास घरी काहीच बोलला नव्हता.आणि ती खात्री सुमंतला पण होतीच.
"थॅंक यू सुहास, आजुबाजुला जे घडत असत ते पाहणं आणि दिसणं यातला तिसरा कोन दृष्टीचा असतो जो मी अहंकारानी दुषित केला होता. माझ्या वागण्याचं थोडस समर्थन नाही,पण खडतर दिवसात आलेल्या वाईट अनुभवांमुळे हा कडवटपणा आला असेल बहुतेक, पण जवळची माणसं आता मला गमवायची नाहीत. मी आई-बाबांना आणायला गाडी पाठवली आहे.म्हणून मी कालच जाऊया असं न म्हणता एक दिवस घेतला.सगळी बोलणी व्यवस्थित झाली तर तुझ्या आणि माझ्या आईला,वहिनींना तिथं बोलावून घेऊ".सुमंत मनापासून बोलत होता.
केतकी मामाला अंगठा दाखवून हसली आणि लगेच पुढे येऊन त्याच्या पाया पडली.सुहासच्या मनांत आलं"खरंच, आपला दृष्टीकोन म्हणजे आपली जगण्याची सकारात्मक जाण असली पाहिजे!
- ललिता छेडा

