Thursday, July 26, 2018

एक दिवस


मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरचा प्रवास म्हणजे सुमित्राचा आवडता प्रवास! आणि वर्षातून ७/८वेळा तरी ती तो करायचीच.त्याच एक कारण म्हणजे तिच सासर-..माहेर दोन्ही पुण्यात आणि निवृत्ती नंतर पुण्यालाच स्थायिक व्हायच नक्की असल्याने पुण्यात घेतलेलं स्वत:च घर!
कधी स्वत: ड्राईव्ह करत, कधी खाजगी बसनी जाताना प्रत्येक ॠतूचा वेगळाच आनंद तिला मिळायचा.फुडमाॅलवर अचानक भेटणारी ओळखीची माणसं, कधी होणा-या नवीन ओळखी,कधी कधी एखादा प्रसिद्ध अभिनेता किंवा अभिनेत्री चहा पिताना दिसले की होणारा आनंद लगेच फोटो, मेसेजची धावपळ!
पण आजचा दिवस सुमित्रासाठी वेगळाच अनुभव देणार होता.
गाडी तिची लेक सोनिया चालवत होती आणि शेजारी सुमित्राचे यजमान बसल्यामुळे सुमित्रा मागच्या सीटवर आरामात बसून बाहेरचा निसर्ग पहात होती.बाहेर पाऊस रिमझिमत होता.ह्यावेळी त्यांचा पुण्यातला मुक्काम ज्यास्त दिवसांचा होता.कारण दरवर्षी होणारा त्यांच्या गृपचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम ह्यावर्षी त्यांच्याच घरी होता.तयारीसाठी सुट्टी घेऊन तिघेही लवकर निघाले होते.गाडीतले किशोरीताईंचे स्वर ओल्या हवेत भरुन कानांना सुखावत होते. 
इतक्यात एक खाजगी बस खूप जोरात त्यांच्या गाडीजवळून पुढे गेली.सोनिया म्हणाली सुध्दा "कसली घाई आहे ह्यांना? इतक्या पॅसेंजरांचा जीव का धोक्यात घालतात? 
थोडा वेळ बस पुढेच होती.वेग पण कमी झालेला वाटत होता "सोनिया, तुझ ऐकल बरंका ड्रायव्हरनी! गाडीचा वेग कमी झालेला वाटतोय"सुमित्रा हसत म्हणाली.
इतक्यात डोळ्यासमोर बस उजव्या बाजूला फरफटल्या सारखी झाली आणि डिव्हायडर वर आदळली.काय होताय ते कळेपर्यंत गाडी डिव्हायडरच्या आधारावर कलंडली होती.गाडी पडल्याचा आवाज, बसमधल्या मंडळींचा आरडाओरडा, काचांचा खच कोणालाच काही कळत नव्हतं!सर्वात प्रथम मागच्या ईनोव्हातली तरूण मुलं उतरली, ती मंडळी ट्रेकींगला निघाली होती त्यामुळे त्यांच्याकडे बरच सामान होत. त्या सामानाचा उपयोग करून त्यांच्यातली दोघ बसमध्ये चढली.आता आजूबाजूच्या गाडीतले सर्वजण बस भोवती जमा झाले होते.नशीबानी मागचा आणीबाणीच्या प्रसंगी उघडणारा दरवाजा उघडला गेला.आतली मंडळी सुखरूप होती.सगळ्यांनाच थोडंफार लागलं होतं!पण काळजी करण्यासारख नव्हत.ड्रायव्हरला ज्यास्त लागलं होतं आणि तो घाबरला पण होता. इतक्यात वाहतूक पोलिसांची गाडी आली.ड्रायव्हरच्या बाजूचा टायर फुटल्याने अपघात झाला होता.पोलीसांनी त्यांची गाडी मागच्या दरवाज्याजवळ आडवी लावली आणि आतली मंडळी बाहेर काढायला सुरुवात झाली.उभ्या असलेल्या गाडीतल्यांनी त्या प्रवाशांना पुण्याला सोडायची जबाबदारी आपणहून स्वीकारली. पोलीसांनी सामानासह जवळजवळ सर्व प्रवाश्यांची सोय केली.पावसानी पण थांबून ह्या मदत कार्यात आपला सहभाग दाखवला.ईश्र्वर कृपेमुळे काही वाईट घडल नव्हत!काही मंडळींकडे प्रथमोपचार पेटी होती.त्यांनी किरकोळ जखमांवर उपचार केले.
सुमित्रानी आपल्या बरोबर दोन आजींना गाडीत घेतल. त्यांच्या गाडीत दोघांचीच सोय होत होती आणि महत्त्वाच म्हणजे त्या आजींना जायच ठिकाण सुमित्राच्या घराजवळ होत.दोघींना थोड खरचटलं होतं आणि बसलेल्या धक्क्यामुळे अंग दुखत होतं! सुमित्रा नी दोघींना जवळची पेनकिलर दिली.
गाडीत बसल्यावर त्या दोघी आजींनी श्र्वास सोडला.एका आजींचे तर डोळे भरून आले होते.सुमित्रानी दोघींना धीर दिला आणि गप्पा सुरू व्हाव्यात म्हणून दोघींना त्यांची नावं विचारली.दोघी सख्ख्या चुलत बहीणी सुमन आणि सावित्री!
कोकणात एकत्र कुटुंबात वाढलेल्या दोघीही खडतर आयुष्य जगलेल्या, बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या सावित्रीला मुलगी झाली म्हणून सासरी परत नेलच नाही. सुमित्राच्या शेजारी बसलेल्या आजींनी थोडक्यात दोघींचा परिचय दिला पण सुमित्राला जाणवत होतं की ह्या दोघी आयुष्य नुसतच जगल्या नाहीत तर त्यांनी आयुष्या कडून झगडून काहीतरी मिळवलंय!ते आपल्याला कळलच पाहिजे.
सुमित्राच्या मनातलं जाणल्या सारख तिच्या यजमानांनी सोनियाला गाडी थांबवायला सांगितली. ते मागे वळून म्हणाले"आजी आता तुम्ही आमच्या घरी चला, थोडा आराम करा. दुपारी एकत्र जेवूया, गप्पा मारू, मगाशी तुम्ही गाडीत लावलेल्या गाण्यांबरोबर गुणगुणत होता तो अभंग आम्हाला ऐकवा, मी पेटी छान वाजवतो नक्की चांगली साथ करेन, संध्याकाळी आम्ही दोघे तुम्हाला जिथं जायचं आहे तिथे सोडू! चालेल ना? दोघींनी एकमेकींकडे बघितल आणि ठीक आहे अशी मान डोलावली.लगेच त्यांनी आजींकडून त्यांच्या लेकीचा नंबर घेऊन "आजी आमच्या बरोबर आहेत आणि संध्याकाळी आम्ही त्यांना सोडू "असा निरोप दिला.आजी पण लेकीशी सविस्तर बोलल्या.
मनासारख घडल्यामुळे सुमित्रा खूष झाली होती.तिने शेजारी बसलेल्या सावित्रीआजींना विचारलं"कुठे जाणार संध्याकाळी?"हिच्या लेकीकडे, गुरूपौर्णिमेला तिच्या नवीन घराची वास्तुशांत आहे.म्हणून आलोय! शेजारी बसलेल्या सुमनताईं कडे हात दाखवून सावित्रीआजी म्हणाल्या.
घरी गेल्यावर मात्र दोघीही खूलल्या.सुमनताईंनी स्वैपाकघराचा ताबाच घेतला.सावित्रीआजी सामान उघडून लेकींसाठी आणलेल्या कोकणच्या मेव्यातला थोडा सुमित्रा साठी काढू लागल्या.नको, कशाला! अस सुमित्रानी म्हटल्यावर"अग आम्ही सुमन-सावित्री आणि तू सुमित्रा तेव्हा आपल ह्या सकारामुळे नातंच झाल ना!आता धाकटी बहीण आहेस तू आमची! सावित्रीआजी हसत हसत म्हणाल्या.त्या थोड्या मिश्कील,बडबड्या होत्या आणि सुमनताई गंभीर!" तू दिलेली गोळी देखील छान आहे,बर वाटतय!! केवढा मोठा आवाज झाला होता त्यावेळी आणि जोरात हिसका बसून एकेमेकांवर पडलो.बापरे! आजींना पुन्हा ती आठवण झाली होती. 
गप्पा मारता मारता कळलं की'सुमनताई लग्न होऊन सासरी गेल्या आणि त्यांना कळलं यजमान काहीच करत नाहीत. त्यांना घरकामासाठीच लग्न करून आणल आहे.त्यांनी खूप प्रयत्न केले कि यजमानांनी काही तरी करावे पण सर्व निष्फळ ठरले.
मुलीच्या जन्मानंतर तर जबाबदारी अजूनच वाढली.तेव्हा असं परावलंबी जगण्यापेक्षा शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभ रहायच त्यांनी ठरवलं.निर्णय सासरी आवडला नाहीच! कडाडून विरोध झाला. त्या घर सोडून माहेरी आल्या. आईनी आणि सावित्रीनी त्यांच्या मुलीची जबाबदारी घेतली.सावित्रीच्या दोन लेकी झाल्या! वेगवेगळ्या अनुभवांमुळे एकट्या झालेल्या दोघींनी एकत्रित लढायच ठरवलं.
बाविसाव्या वर्षी मुंबईला भावाकडे येऊन सुमनताईंनी शाळेत तिसरीत प्रवेश घेतला.पुढच शिक्षण जिद्दीने पूर्ण करून रत्नागिरीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत नोकरी धरली.मुंबईत असताना गाण्याच्या परीक्षापण दिल्या. सावित्रीनी आपल्या शिवणकामाच्या आवडीच व्यवसायात रूपांतर केल.सुमनताईंनी घरची आर्थिक जबाबदारी घेतली.सावित्रीआजींनी घर सांभाळल.दोन्ही लेकींच शिक्षण,लग्न सर्व दोघींनी हिमतीने पार पाडल.दोघींच्याहि लेकींना पुण्यात सासर मिळाल. दोघींच्या जीवन संघर्षाला लेकींना मिळालेल्या चांगल्या सासुरवाडीमुळे पूर्णता मिळाली.हे सगळ अर्ध्या तासात ऐकण आणि खराखुरा संघर्ष करणं! सुमित्राचे डोळे भरून आले होते.
दुपारच्या जेवणानंतर भजन, भावगीतांची मैफल रंगली.सुमित्राच्या यजमानांनी तर सर्व गाणी रेकॉर्ड करून घेतली.संध्याकाळी त्या दोघींना निरोप देताना सर्वांनाच जड जात होतं.'एका दिवसात' आयुष्यभराचे ऋणानुबंध जुळले होते.
रात्री झोपताना सुमित्राच्या मनात आल.किती शिकवून गेला हा 'एक दिवस.' त्या तरूण मुलांनी अपघातानंतर दाखवलेल प्रसंगावधान, प्रत्येक गाडीवाल्यांनी प्रवाश्यांना दिलेल सहकार्य, पोलिसांच नियोजन प्रत्येकजण काही तरी देऊन गेला.आणि आजींशी झालेली ओळख तर जगण्याच बळ देऊन गेली. एका दिवसात इतके अनुभव आपल्याला समृद्ध करुन गेले.खरीखुरी गुरुपौर्णिमा आजच साजरी झाल्याचा आनंद सुमित्राला झाला होता.पौर्णीमेच चांदण तिच्या घरभर पसरलं होतं.
ललिता छेडा



Thursday, July 19, 2018

अशी पाखरे येती


अभिजितच्या आठवणींचा पसारा घरभर पसरला होता.त्याच्याकडे उदास नजरेने पहाणा-या उमाताईंना वाटल'कुठुन सुरवात करु हा पसारा आवरायला.'दर २/३वर्षानी अमेरिकेहून येणारा त्यांचा लाडका लेक ह्यावेळी बायको-मुलांसह आला होता आणि जवळ जवळ दोन महिने राह्यला होता.त्या आधी महिनाभर तो येणार म्हणून तयारी! तीन महिने कसे गेले कळलेच नाही आणि आता हे रिकाम घर आणि वाटणारं एकटेपण!उमाताईंचे डोळे भरून आले पण लगेचच त्यांना त्यांच्या यजमानांनी अभिला सोडायला जाताना म्हटलेल आठवल"हे बघ उमा तुझे पाय दुखताहेत म्हणून तू आमच्या बरोबर येत नाहीयस.उगीच घरात बसून रडू नकोस.तुझ्या राहिलेल्या सिरीयल बघ, मैत्रीणींना फोन कर! सगळे महिनाभराचे बॅकलॉग भरून काढ!काहीच नाही तर तुझ्या लेकीला अस्मिताला फोन कर.

अस्मिताची आठवण आल्यावर उमाताईंना चार दिवसांपूर्वी अभिजितच त्याच्या बाबांशी झालेल बोलण आठवलं! त्यादिवशी रात्री जेवताना अचानक अभीनी ह्यांना विचारलं"बाबा सोसायटीत आपल्या घराचा नाॅमिनी फाॅर्म भरायचाय ना?काल सोसायटीचे सेक्रेटरी विचारत होते.प्रश्न अचानक विचारला गेला होता पण ह्यांनी शांतपणे त्याच्याकडे बघितलं आणि म्हटलं'हे बघ मी काहीतरी ठरवलय , अजून मी उमाशी सुध्दा बोललो नाहीय,पण आता आपण सगळेच एकत्र बसलोय तर सांगतो'मी नाॅमिनी अस्मिताला करणार आहे.'आणि दिवाळीनंतर तिच्या सासरच्या मंडळींशी बोलून जावईबापूंना इथेच आमच्या बरोबर रहायला येण्याची विनंती करणार आहे.आपली जागा भरपूर मोठी आहे, त्यांच्या घरापासून जवळ आहे आणि त्यांच्या एकत्र कुटुंबासाठी त्यांची जागा मात्र खरंच खूप लहान आहे! पण ती सगळी मंडळी इतकी चांगली आहेत कि त्या जागेत आनंदाने रहातात.आणि महत्वाच म्हणजे आमचा पण स्वार्थ आहेच! आता आमची वय झाली आम्हालाही सोबत हवीच आहे.त्यात पुन्हा आमच्यापैकी एकजण पुढच्या प्रवासाला जाईल, मागे रहाणा-याच्या एकटेपणाचा ही विचार करायला हवा. अर्थात हे सर्व जावईबापूंशी मोकळेपणाने बोलून मग तुमच्याशी बोलणार होतो.पण ठीक आहे झाल ते चांगलच झाल!चला उमाबाई झोपायला जाऊया!" ह्यांनी समारोप केला होता.अभिजीत आणि सुनबाई शब्दही न बोलता त्यांच्या खोलीत गेले.उमाताईंना तर अगदी कानकोंड झाल.पण स्पष्ट बोलले तरी खर बोलले होते मुलांचे बाबा!हे मात्र त्यांना पटलं होतं.
नंतर जाईपर्यंत अभिजीत गप्प गप्पच होता.त्याच्या मनात काय चाललंय ते कळत नव्हत त्यामुळे उमाताई पण अस्वस्थ होत्या.
इतक्यात फोनची रिंग वाजली.फोन अभिजीतचाच होता."आई आम्हीं व्यवस्थित पोचलो.सामान चेक इन करून बाहेर बाबांना भेटायला आलोय.आई, बाबा समोरच उभे आहेत तुम्हा दोघांना मला साॅरी म्हणायचंय.जो विचार मी करायला हवा होता तो बाबांना करावा लागला!जी जबाबदारी मी घ्यायला हवी ती अस्मिताला घ्यावी लागेल.हे सगळं मला घरीच सांगायच होत पण धीर नाही झाला.पण न सांगता गेलो असतो तर मन खात राह्यल असत! आतापासून माझ्या जबाबदारीची जाणीव मी नक्कीच ठेवेन.आई मी अस्मिताची नेहमी काळजी घेईन.फक्त तुम्हां दोघांचे आशिर्वाद असु देत! अभिजीतने फोन बाबांना दिला."चल उमा येतो तासाभरात घरी"ह्यांनी फोन ठेवला होता.
‌. उमाताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण त्यानी ते तसेच वाहू दिले 'त्यांच आकाशात उंच भरारी घेणाऱ पाखरू घरट्याशी असलेलं नातं विसरल नव्हत'.कारण त्यांना नक्की माहित होतं त्यांच्या घरट्याची वीण संस्काराच्या धाग्यांनी विणली होती.


Thursday, July 12, 2018

पाऊस




मैत्रिणीकडून निघाले तेव्हा दुपारचे अडीच वाजले होते. आभाळ भरुन आले होते.मैत्रिण सारखी म्हणत होती "थोडीशी थांब!पण कालपासून आम्ही शाळेपासूनच्या मैत्रिणी तिच्या घरी जमलो होतो.सकाळी लवकर उठून पुण्या-नाशिकच्या निघून गेल्या होत्या.मी गावातलीच असल्याने दुपारच्या जेवणापर्यंत थांबले आणि तिला आवरायला मदत केली पण आता निघायला हवं होतं.रवीवार असल्याने घरचे सर्वजण वाट बघत असतील अस जाणवत होत.निघताना ह्यांना फोन करून निघालेय ते कळवल! तिच घर स्टेशनपासून लांब असल्याने तासभर लागेल हेही सांगितले.
मैत्रिण गेटपर्यंत सोडायला आली. तिनी"सरळ जा थोडेसे चालल्यावर रिक्षा स्टॅण्ड आहे"असं म्हटल.कदाचित रस्त्यातही मिळेल रिक्शा आणि स्टॅण्डच्या मागच्या बाजूला ४ बिल्डींगची सोसायटी आहे.मैत्रिणीच्या सुचना संपत नव्हत्या.
तिच्या गेटमधून बाहेर पडले आणि पाऊस सुरू झाला.समोर रिक्षा दिसत होती पण जवळ जाईपर्यंत गेली.मी खूप हात दाखवला पण भरलेली असावी बहुतेक!!



आता संपूर्ण रस्त्यावर मी एकटीच होते.आणि पावसाने जोर पकडला.स्टॅंडच्या मागे थोड्या अंतरावर एक बिल्डींग होती आणि तिच्या मागे चार बिल्डींग होत्या ज्यांच बांधकाम सुरू होत.
सुदैवाने स्टॅण्डच्या मागे एक मोठं झाड होतं त्याखाली उभं राहिल्यावर थोडं सुरक्षित वाटलं.अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस पडायला लागला.समोर विजा चमकू लागल्या आणि त्या प्रकाशात रस्त्यावरून पाणी वाहत असल्याच दिसत होत.मागे बिल्डींगमध्ये जाव अस मनात येत होत पण काळोख आणि पाऊस इतका होता की हिम्मत होत नव्हती.त्या बिल्डिंगच्या तळमजल्यावर एका खिडकीतून लाईट येत होती आणि कोणाचीतरी हालचाल जाणवत होती.
मनात आल अजून कोणाचाच फोन कसा नाही आला? इतक्या पावसात आपली कोणाला काळजीच नाही म्हणून पर्स मधून मोबाईल काढून बघितला! मोबाईल बंद झाला होता बापरे! कालपासून चार्जिंगच नव्हत केलं! ओढवलेल्या परिस्थितीची कल्पना आली.कमालीचा एकटेपणा जाणवत होता तो डोळ्यातून वाहू लागला.आईची आठवण आली.ती म्हणायची"कोणत्याही परिस्थितीत स्वतःला एकटं नाही समजायच परमेश्वर कोणत्यातरी रूपात मदतीला येतो! खूप दमले होते,बसायला जागा शोधायचा प्रयत्न केला मागच्या बाजूला एक काळा-पिवळा रस्त्यावर असतो तसला कट्टा दिसला.छत्री उघडून त्यावर बसले.आजुबाजुला चाललेल्या जलसोहळ्याची मी एकटी साक्षीदार होते.समोरची खिडकी आता थोडी जवळ आली होती.फ्रेंच विंडोमुळे टी.व्ही.चा उजेड दिसत होता आणि तिथून कोणी तरी मला बघताय असं मला वाटत होतं.पावसाचा जोर थोडा कमी झाला होता.
इतक्यात रस्त्यावर एक स्कुटर येताना दिसली जीवाच्या आकांताने मी धावले.ठरवल की त्या स्कुटरसमोर पाण्यात बसायच आणि सांगायच"मला इथून घेऊन चल."पण ती स्कुटर तर माझ्याच दिशेने येत होती.त्यावर बसलेली मुलगी माझ्याजवळ येऊन थांबली आणि म्हणाली"बसा मागे! माझ्यासाठी साक्षात परमेश्वर आलेला होता. कोणताही विचार न करता मी स्कुटरवर बसले... कमालीच सुरक्षित वाटत होतं.
स्कुटर त्या बिल्डींगच्या गेटमधून आत जाऊन थांबली."आन्टी, मी सानिका ह्या बिल्डींगमध्येच रहाते, तळमजल्यावरच्या दादाजींनी मला फोन करुन तुम्ही पावसात अडकलाय ते सांगितलं आणि आता आपण त्यांच्या घरी जाऊया"ती बोलत होती पण मला शब्दच सुचत नव्हते.घराच दार उघडच होतं.दारात आमची वाट बघणारे दादाजी उभे होते.उंचेपूरे, पांढ-या रंगाचा झब्बा घातलेले ते वाॅकर घेऊन उभे होते." घरात याना, आणि सानिका ह्यांना बदलायला कपडे घेऊन ये, अहो गेले दोन तास मी तुमची परिस्थिती बघतोय पण पायानी अधू असल्यामुळे काही करू शकत नव्हतो! त्यांना मध्येच थांबवून मी म्हटलं"मोबाईल चार्जिंगला लावू!"अरे नक्कीच"त्यांनी चार्जर आणलाआणि सुदैवानं तो लागला! इतक्यात सानिका टी शर्ट आणि ट्रॅक पॅण्ट घेऊन आली.हे कपडे!मी कपाळाला हात लावला."पर्याय नाही माझ्याकडे हेच आहेत"सानिका हसत म्हणाली.चिंब भिजलेल्या मला पण ते कपडे घालण्याशिवाय पर्याय नव्हता.
मी कपडे बदलून येईपर्यंत घरचा फोन येऊन गेला होता सानिकानी ह्यांना घडलेलं सर्व सांगितलं होतं.पुन्हा फोन लावताना सानिकानी ह्विडीओ काॅल लावला जेणेकरून घरची मंडळी मला बघू शकतील.माझा अवतार बघून सुनबाईंनी हसत "वा स्मार्ट,दिसताय"कमेंट केलीच.मी सुटकेचा निःश्वास टाकला.बोलताबोलता कळल की सानिका मुळची बनारसची, इथे मीडियामध्ये काम करते आणि दोन्ही मुल परदेशात असणा-या दादांजींची खास मैत्रीण!
सानिकानी चहा करून आणला आणि मनात आल "किती अविस्मरणीय अनुभव आहे हा माझ्यासाठी"तीन तासांपूर्वी अनोळखी असलेल्या ह्या दोघांशी आत्ता माझ जवळच नातं निर्माण झालं आहे! पावसाचा जोर पुन्हा वाढला होता आणि मी हातात चहाचा कप घेऊन त्याच्याकडे स्थितप्रज्ञ नजरेनी बघत होते.
‌ पाऊस नेहमी तोच असतो पण आपल्या परिस्थती, मनस्थिती प्रमाणे तो आपण अनुभवतो.

Thursday, July 5, 2018

शहर

बस दादरला पोचली तेव्हा दुपार झाली होती. बस मधून बाहेर पाऊल ठेवताना दीपाच्या मनात विचार आला'स्वप्ननगरीतल आपल हे पहिल पाऊल'तिच्या मागून उतरणा-या दिलीपनी तिच्या हातात बॅग दिली आणि म्हटलं" मी समोर जाऊन ज्या एजन्सीत काम करतो त्या मालकांना भेटून येतो.तू त्या समोरच्या कट्ट्यावर बैस.आलो पटकन!अस म्हणून दादांनी रस्ता क्राॅस केला.आपल्या भावाबरोबर दीपा पहिल्यांदाच मुंबईत आली होती.
आजूबाजूला इतक्या दुपारी पण वाहत्या रस्त्यावरची माणस,वाहन बघून दीपा भांबावून गेली होती.
इतक्यात एक माणूस जवळ येऊन म्हणाला'किधर जाना है'तिने मानेनीच नकार दिला आणि दोन्ही बॅगा जवळ ओढून घेतल्या."डरो मत तुमको कहां जाना है मै छोडता हू,ऐसा ही सब लोग बम्बई में खो जाते हैं।दीपाला प्रचंड एकटेपणा जाणवला आणि तिचे डोळे भरून आले.तो माणूस जवळ आला आणि मागून दादाचा आवाज आला "क्या है। त्याबरोबर तो माणूस इतका झटकन नाहीसा झाला की दीपाला वाटल खरच काही घडल कि मला भास झाला! "काय म्हणत होता तो? दादानी विचारल. "जाऊ दे आता लवकर घरी चल" दीपाची अस्वस्थता लपत नव्हती . शहरातल्या अनुभवांची सुरवात झाली होती."हे बघ दीपा इथ अस काहीही घडलं तरी घाबरून जाऊ नकोस."दादा समजावत होता पण दीपाला कधी एकदा घरी जाते अस झाल होत."चल आज आपण टॅक्सीनी जाऊ,नंतर मात्र तुला बसचे नंबर लक्षात ठेवावे लागतील.आपण आत्ता कुठे आहोत? दीपानी भीतभीतच विचारल.अग हे दादर टी.टी.आहे आणि आपली चाळ आहे लोअर परेलला! दादा टॅक्सीत बॅग टाकत म्हणाला.
एका मोठ्या पुलाच्या बाजूला टॅक्सी उभी राहिली.उजव्या हाताच्या तीन मजली चाळीकडे हात दाखवून दादा म्हणाला"ही आपली चाळ आणि त्या कोपऱ्यात जी गॅलरी दिसतेय ते आपलं घर!दीपाला ती गॅलरी खूप आवडली.
B.sc.नंतर हाॅस्पिटल मॅनेजमेंट करायला ती शहरात आली होती. नवी मुंबईत पार्ट टाईम क्लासमध्ये अॅडमिशनसुध्दा दादाच्या ओळखीनी मिळाली होती.पण शहरातल्या प्रचंड गर्दीच तिला दडपण आल होत.दादाच घर मात्र तिला बघताच क्षणी आवडल, दोन दिवाण,टी.व्ही.,मोजक फर्निचर असलेली बाहेरची खोली आणि आत स्वैपाकघर त्याला लागून ती गॅलरी!
शहरातल्या धावपळीच्या जगात दीपा हळूहळू रुळू लागली.पण शहरात फिरताना,रेल्वेनी प्रवास करताना, तिची अस्वस्थता वाढतच होती तिला सारख वाटत होत की लोंढेच्या लोंढे सामावून घेणार हे शहर खूप एकट होत चाललय!
धावणा-या ह्या सर्वांचा एकेमेकांशी संवाद संपत चाललाय! समोर दिसणारे टाॅवर आणि पुलाखाली असणा-या झोपड्या दोन्ही जगातल अंतर वाढतय! इथे शिकून मी माझ्या गावांसाठी काही करू शकते का?तर त्याच उत्तर नाही येतय तिथेही ओसाड पडणारी गाव एकट्या वृध्दांना सांभाळतायत.
त्यातच एल्फिन्स्टनच्या पुलाची दुर्घटना घडली आणि ज्यावेळी ते सर्व घडत होतं ती पुलावर होती.इतक भयानक घडत होतं आणि आपण काहीच करू शकत नसल्याची असहाय्यता! तिला बसलेल्या शाॅक मधून बाहेर यायला तिला महिना लागला!
‌. त्या दिवसात ती सतत गॅलरीत बसुन रहायची दादानी तिला समजावल पण तिला कुठे जाव अस वाटत नव्हत.
‌. एका संध्याकाळी ती खाली उतरली आणि चाळीसमोरचा चहाच्या टपरीवरचा छोटू तिच्या जवळ आला. रोज येताजाता त्याच्याशी ओळख झाली होती."ताई हल्ली बाहेर नाही पडत ना!"छोटू विचारत होता पण दीपाला कळेना काय बोलाव.ती नुसती हसली. ताई पुलावर झालेल विसरता येत नाहीय ना?एकट वाटतय ना!पण खरं सांगू ताई जे घडून गेलय त्यावर विचार करण्यापेक्षा ते पुन्हा घडू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.ताई मी दिवसभर काम करून शिकतोय! मला रस्त्यावरच्या मुलांसाठी काम करायचय! ह्या शहराचे प्रश्न खूप आहेत म्हणून हातपाय गाळून चालणार नाही ताई! तुम्ही तर हाॅस्पिटल मॅनेजमेंट करताय ना?दीपा त्याच्याकडे बघतच राहिली."घाबरू नका ताई आपल्या एरियातल्या माणसांकडे आमच लक्ष असतं"छोटू हसतहसत म्हणाला.दीपाला पण न कळत हसू फुटलं!आता उद्या पासून क्लासला जायला लागा.तुमची मदत तर आम्हा सर्वांना नेहमीच लागणार आहे.तुमच्या गावच्या हाॅस्पिटलसाठी पण आपण काम करूया!
दीपाला समोरच्या अजस्त्र पूलावर इंद्रधनुष्य दिसूं लागल जे ह्या शहराला गावाशी जोडत होत!त्या इंद्रधनूच्या पुलावरून ती छोटू सारख्यांचा हात धरून चालणार होती.