ईश्वराची अनाकलनीय निर्मिती म्हणजे "माणूस". प्रत्येक माणूस वेगळा, व्यक्ती म्हणून स्वभाव, दिसणं, वागणं सगळंच वेगळं असतं. आपल्या सर्वांनाच आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अनेक माणसं भेटतात.
काही मनात घर करतात, काही अगदी सहज विस्मरणात जातात, तर काही फक्त मनावर कायमचा ओरखडा उमटवून जातात.
मनात घर करून रहाणाऱ्या माणसांबद्दल लिहायचं ठरवलं तर सर्वात पहिले येतात ते नातेवाईक! माझे वडील म्हणजेच दादा लहानाचे मोठे झाले त्यांच्या मामांकडे त्यामुळे त्या पाच मामांच्या कुटुंबातल्या भावंडांनी दादांना मोठ्या भावाचा मान दिला. लहानपणीच्या आठवणी मनात गोंदवल्यासारख्या असतात. माझ्या आठवणी राजाकाका, मनोहर काका, रमणकाका, मोहनकाका,श्रीकांत काका ह्या सर्वांबरोबर सिनेमा बघणं, बिनाका ऐकणं, आईस्क्रीम खाणं ह्यांनी व्यापून राह्यल्या आहेत. काकांच्या पाठोपाठ आलेल्या उषा काकू आणि मीना काकू ह्यांची घरं आईनंतर माझं माहेर आहे.
माझ्या सख्ख्या आत्या इतक्याच माझ्या जवळच्या इंदू आत्या, कुसुम आत्या, सिंधू आत्या, नलू आत्या, यमु आत्या ज्यानी माझे "लल्या" म्हणून खूप लाड केलेत. ह्यातली सिंधू आत्या रहिमतपूरला रहात असल्यामुळे तिचा सहवास कमी मिळाला. पण ती मुंबईला आली की आमच्या घरी यायची आणि ती एकमेव आत्या होती जी दादांशी मोकळेपणानं चर्चा करायची. दादांच्या कडक स्वभावामुळे त्यांच्याशी गप्पा फक्त मनोहरकाका आणि सिंधू आत्या मारायचे ते दोघेच सल्ला घेण्याबरोबरच देतही असत. सिंधू आत्या पत्र सुंदर लिहायची तिची पत्र माझ्या निष्काळजीपणा मुळे गहाळ झाल्याचं मला कायमचं दु:ख राह्यलंय! मला मामा एकच त्याच्या तिन्ही मुलांबरोबरच्या गिरगावातल्या आठवणी खूप गहिर्या आहेत कारण त्या आठवणीत माझी आजी आहे.
मला सख्खी आत्या एकच....तिचे तिन्ही मुलगे आणि दोन्ही मुलीं मामा-मामी म्हणजेच माझ्या आई-वडीलांना खूप मानत होते. खूप प्रेम करायची ती सगळीजणं आम्हा तिघांवर आणि आत्याचा धाकटा लेक श्रीकांत तर माझ्या आई-वडीलांना मुलासारखा होता आणि श्रीकांतनी पण हे नातं मनापासुन जपलंय!
सासरच्या सर्वांनी मला खूप समजून घेतलं पण माझी लाडकी पुतणी मनीषा माझ्यासाठी खास जवळची व्यक्ती..
त्यानंतर येते ती शाळा! शाळेत माझ्या जीवश्र्च कंठस्थ मैत्रिणी म्हणजे जोष्टे, भोसले, मुजुमदार, देवधर आणि जोग... ही मैत्री अजूनही तितकीच टवटवीत आहे. आता तर शाळेतल्या एकाच वर्गातल्या मैत्रिणी स्कुल-रियुनियन मध्ये जवळ जवळ ५० वर्षांनी भेटल्या आहेत आणि what's app मुळे तर मैत्रीचं वेगळंच नातं बहरतय!
शाळेनंतर काॅलेज, जिथं मला भेटली लता गोठोस्कर जिच्या बरोबर घालवलेल्या पाच वर्षांत असंख्य स्वप्न आणि सिनेमे बघितले. ते दिवस आयुष्यातले सर्वात सुंदर दिवस होते.
त्यानंतर "लग्न" आणि डोंबिवलीत रहायला आलो. डोंबिवलीनी मला असंख्य माणसांनी समृद्ध केलं. पण इथली सर्वात पहिली मैत्रीण म्हणजे "जयश्री" करमरकर जिचं माझ्या मनात घर नाही तर बंगला आहे...कारण गेली पस्तीस वर्षे आम्ही दोघींनी अनेक सुख-दु:खाची वळणं एकेमेकींशी शेअर करत पार केली आहेत. तिला माझ्या सासरची मंडळी "बाजूवाली" म्हणत असत.
डोंबिवलीत आल्यावर माझ्या गुजराथी मैत्रिणी म्हणजे इंदू , लता, आणि मणी...आमच्या चौघींचं खरेदीसाठी भटकणं, गाॅसिपच्या गप्पा, एकमेकींच्या घरी खाणं-पिणं...आम्ही खूप एन्जॉय करतोय. आमच्या ह्या आनंदात आमची मुलं, नवरे पण सहभागी झालेत. नुकतीच आमच्या चौकटीतून एकजण सोडून गेली आहे पण आमच्यासाठी "मणी" आहे. शरीरानी नसली तरी मनाने नक्की...
मला जगण्याचं बळ देणार्या, एकट्यानं आयुष्यातला आनंद शोधणार्या राजश्री कुलकर्णी, प्रज्ञा पोंक्षे, संघमित्रा, वैशाली पागे ह्यांसारख्या अनेकजणींच माझ्या मनाचा कोपऱ्यात नेहमीच स्वागत असतं. खूप उशिरा भेटलेली पण मनातलं "कुछ दिलसे दिलकी बात कही और... इतकी जवळची झालेली आरती मुनिश्र्वर. माझं दिसणं, असणं छान रहावं ह्यासाठी मनानं सतत माझ्या शेजारीच असलेली आरती तन्ना!!
मला ज्ञानदीपशी जोडलं भारतीनं आणि त्या कामाचा आनंद मिळाला वैशाली-मीनाच्या मैत्रीमुळे! त्यातसुद्धा असंख्य अडथळ्यांना पार करून आता मीना आणि माझी मैत्री मनातून बहरलीय. स्मिता तळेकर, उमा आवटे पुजारी, विद्या राळे, सरोज भट्टु, ज्योती पाटकर, अजय पागे ह्यासारख्या असंख्य मित्र-मैत्रिणींनी मला कार्यकर्ती म्हणून समृद्ध केलं. खास उल्लेख करावा लागेल सुप्रसिद्ध कवयित्री, लेखिका गौरी कुलकर्णीं आणि निस्वार्थ कार्यकर्ती परिणीता माविनकुर्वे ह्या दोघींशी असलेल्या मैत्राचा!
मला वेगळ्या वाटेने नेणार्या सुवर्ण मंगल बॅंकेमुळे माझ्या मनाचा कोपरा भाडं न देता न घेता अनुभवांनी व्यापलेला आहे. पण बॅंकेमुळे ग्लॅमरही खूप अनुभवलं!! पेपरात मुलाखती, बातम्या, टि.व्ही. ह्या सगळ्या गोष्टींमुळे माझी स्वतःची ओळख निर्माण झाली. इथं पत्रकार टोळकाकांचा आवर्जून उल्लेख केलाच पाहिजे. मला चांगल्या संधी मिळाव्यात यासाठी धडपडणारे आबासाहेब पटवारी, बॅंकेसारख्या आर्थिक संस्थेत काम करताना माझ्यावर विश्वास ठेवणारे मधुकरराव चक्रदेव, श्रीकांत जोशी, उदय कर्वे, जयंत पित्रे, दादा प्रधान, सरलाताई जोशी अशा अनेक मान्यवरांचा पाठिंबा हा माझ्या मनाला नेहमीच धीर देत असे. मंगलाताईं कुलकर्णींच्या उल्लेखाशिवाय माझा हा बॅंकेचा प्रवास पूर्ण होऊच शकत नाही.
बॅंकेच्या १८ वर्षाच्या प्रवासात सुनिती रायकर, जयश्री कर्वे ह्या दोघींनी धरलेला मैत्रीचा हात इतका घट्ट झालाय की मनातलं शेअरिंग करायची माझी ही मैत्री म्हणजे हक्काची जागा झालीय! नेत्रा फडके, स्मिता नाख्ये ह्यांच्याबरोबर बॅंकेत काम करताना त्या कधी जवळच्या मैत्रिणी झाल्या कळलंच नाही.
बॅंक मर्ज झाल्यावर निव्वळ मन रमावायला फ्रेन्डस् लायब्ररीच्या कट्ट्यावर जायला सुरुवात केली. पै फ्रेन्डस् लायब्ररीची मेंबरशीप तर घेतलीच होती. कट्ट्यावर रवीप्रकाश कुलकर्णींचे अनुभव ऐकणं खूप आनंददायी अनुभव होता. अचानक त्यांना यायला जमत नव्हतं म्हणून मला पै काकांनी कट्टा सांभाळायची जबाबदारी दिली आणि मला मनासारखं काम करायची संधी मिळाली. ग्रंथाली प्रकाशनाचे संचालक असलेले प्रभाकर भिडे यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे मला कट्ट्यावरचे कार्यक्रम ठरवताना मदत करायला सुरुवात केली. माझं पहिल पुस्तक प्रकाशित व्हावं म्हणून ही भिडे काकांनी मनापासून मदत केली. रागिणी उपासनी, धनश्री साने, दीपाली काळे,प्राची किल्लेकर अगदी जवळच्या मैत्रिणी झाल्या. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पै काका___ ज्यांच्यामुळे, ज्यांच्या माणसं जोडण्याच्या स्वभावामुळे, कष्टाळू वृत्तीमुळे मी पै फ्रेन्डस् लायब्ररीच्या कट्ट्याशी जोडले गेले आणि कट्ट्यावरच्या कार्यक्रमांनी माझ्या मनाला स्वतःला शोधायची सवय लावली.
डोंबिवलीत रहात असल्यामुळे शं.ना.नवरे मला ओळखत होते ही जाणीव मला नेहमी सुखावत असते! जेष्ठ लेखिका विनीता ऐनापुरे ज्यांनी माझ्या पहिल्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली, आकाशवाणीवर मला संधी देणारी उमा दिक्षित, ज्ञानदीपचे प्रेरणास्थान आकाशानंद ही माझ्या मनाच्या गाभाऱ्यातली मंडळी...
अशी माझ्या आयुष्याच्या विविध टप्प्यांवर भेटलेली, मला सकारात्मक उर्जा देणारी, माझ्या मनातल्या घरातली माणसं! बरेच उल्लेख, बरीच नावं, नक्की राहून गेली असतील मनाचं दार उघडंच असतं ना तेव्हा ती सगळी जण माझ्या बरोबर आहेतच.
अहंकार बाजूला ठेवून सर्वांची मने जिंकण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला....
कधीही हरल्यावर पुन्हा उठण्याची ताकद तुम्ही दिलीत म्हणूनच हा पाऊलवाटेवरचा शेवटचा लेख तुम्हा सर्वांना समर्पित!
फाल्गुन पौर्णिमा
ता. २८.३.२०२१
ललिता छेडा
खूप छान लिहिलेत ललिता ताई ! अगदी मनाच्या गाभाऱ्यातून ! ����������☺️��
ReplyDeleteललिता,तुझं विशाल मन आणि त्यात सामावलेल्या सर्वांच्या शाब्दिक भेटीने खूप आनंद मिळाला
ReplyDeleteखूप छान आता ह्यचे पण पुस्तक प्रकाशित करणार का?
ReplyDelete