Sunday, March 14, 2021

उल्हसित फाल्गुन

        आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास!! असं का म्हणत असतील माहित नाही! ह्या म्हणीचा शब्दशः अर्थ म्हणजे "आधीच आळशी आणि त्यात फाल्गुन मास"!

.....तसं बघितलं तर फाल्गुन महिन्यात वसंत ऋतू आमच्या बंगल्याच्या अंगणातच दिसू लागायचा! आवारातल्या आंब्याला आलेला गच्च मोहोर आणि त्यात लपून बसलेल्या कोकिळेची साद....एकीकडे सरती थंडी आणि त्याचसोबत हलकेच जाणवत असलेला उन्हाळा! कदाचित तो येऊ घातलेला उन्हाळा आळशी करत असेल म्हणून ही म्हण प्रचलित झाली असेल....
      फाल्गुन महिन्यातला विशेष दिवस म्हणजे "होळी....आणि होळी म्हणजे "अग्नी" जो सर्व वाईट गोष्टी स्वतः मध्ये सामाऊन घेतो आणि त्याचा नाश करतो, असा एक समज आहे. 
     आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात वाईट अनुभव, मनस्ताप, गैरसमज किंवा ‌जाणूनबुजून केलेले अपमान असं बरंच काही असतं. पण आपण जसं वयानं मोठे होतो आणि आपलं अनुभवविश्व‌समृध्द होतं जातं तसं मग मागे वळून पाहताना जाणवतं की कधी कधी उगीचच आपण ताणून धरलं!!
      माझ्या बाबतीत मात्र मी ज्या संस्थांमध्ये मनापासून काम केलं त्या दोन्ही संस्थांच्या‌ बाबतीत कुठेतरी मनावर न कळत एक ओरखडा उमटला आहे. ज्ञानदीप मंडळं आणि त्याचा संघ अशी रचना असलेल्या ह्या संस्थेच्या डोंबिवलीतल्या अश्र्विनी संघाची ५ वर्ष अध्यक्ष म्हणून काम करताना खूप आनंद मिळाला माझ्या आधीच्या अध्यक्षा देखील माझ्या मैत्रिणींच असल्यामुळे ते सगळे दिवस भारावलेले होते. सगळ्याच जणी एका आत्मीयतेने काम करत होतो. माझ्या नंतर नव्या दमाच्या नव्या विचारांच्या टीमनं सुत्र हातात घेतली. खरं म्हणजे मला दूर राह्यला हवं होतं पण स्वभावाप्रमाणे त्यांना मदत करायला गेले आणि स्वतःचा अपमान करूंन घेतला. प्रत्येक निर्णयाची किंमत जी काही असते ती ज्याची त्यालाच चुकवावी लागते. ती मी चुकवली!! पण त्यावेळी भारती मोरे,परिणीता, गौरी ह्या मैत्रिणींनी मला समजून घेतलं, समजावलं आणि माझी बाजू आकाशानंदांपर्यंत पोचवली! आकाशानंदानी माझी बाजू ऐकून त्या मंडळींना चांगलीच समजही दिली. त्यावेळी भारतीनी दिलेल्या पाठिंब्यामुळे मला सगळं विसरण्यासाठी आणि पुढची वाट सुखकर होण्यासाठी मदतही झाली. त्याशिवाय त्या घटनेकडे तटस्थपणे पाहण्याची मॅच्युरिटी पण आता आलीय.
      इथं एक आठवण....आमच्या ज्ञानदीपच्या जेष्ठ कार्यकर्त्या कालिंदी तुळपुळे ह्यांचे यजमान मी अपमानाने दुखावली आहे‌ हे कळल्यावर आवर्जून माझ्या घरी आले आणि त्यांनी मला खूप समजावले. एखाद्या संस्थेत काम करताना त्या संस्थेच प्रेमानं जोडलेलं कुटुंब कसं बनत त्यांचं उत्तम उदाहरण!!
      ज्ञानदीप संघाशी संबंध संपले तरी माझं उन्मेष ज्ञानदीप मंडळ गेली ३५ वर्ष सुखेनैव सुरू आहे.‌ माझ्यासाठी आणि मंडळातल्या प्रत्येकीसाठी "उन्मेष" हे आमचं छानसं कुटुंब झालेलं आहे. त्याशिवाय ज्ञानदीप स्री‌ जागृती‌ मंचाच्या माध्यमातून एकल महिलांसाठी काम करणाऱ्या भारतीला जमेल तशी मदत करतेय. 
      ज्ञानदीप संघाच्या ह्या अनुभवातून जाताना मी सुवर्ण मंगल महिला सहकारी बँकेची संचालिका म्हणून काम करत होते. सहकारी बॅंक असल्यामुळे कामाचा व्याप भरपूर होता. ही बॅंक काढण्यासाठी धडपड करणाऱ्या मंगलाताई कुलकर्णी, सरलाताई जोशी कान्तवहिनी ह्यांच्या बरोबर काम करणाऱ्या अनेक महिलांमध्ये मी देखील होते. महत्‌प्रयत्नानी महिला बॅंकेला परवानगी मिळाली. ९२ साली बॅक सुरू झाली आणि पहिल्या संचालक मंडळात मी होते. पहिल्या दिवसांपासून "माझी बॅंक" अशा भावनेनं काम सुरू केलं. खरं म्हणजे गणित हा माझा‌ नावडता विषय पण जबाबदारी घ्यावी लागल्यावर मी मनापासून अभ्यास सुरू केला. १८ वर्ष बॅंकेच्या विविध पदांवर काम केलं.‌ एक निवडणूक लढायचा अनुभव पण घेतला आणि स्वतःला स्वतः साठी सिध्द केलं. चांगले-वाईट खूप अनुभव घेतले. माणसांच्या वेगवेगळ्या स्वभावाचे, रंग बदलण्याचे अगणित अनुभव घेतले. बॅंकेच कामं करताना स्त्रीयांची दु:ख जवळून पाहता आली. स्वतःच्या घरासाठी घडपड, मुलांची शिक्षणं, संसाराला हातभार, नवऱ्याच्या व्यसनांमुळे विस्कटलेले संसार असे असंख्य प्रश्न ह्या माध्यमातून सहकारी संचालिकांच्या मदतीनं सोडवायचा प्रयत्न केला. पण काही मंडळींच आयुष्य कब्बडीच्या खेळासारखं असतं" यशाच्या लाईनला हात लागतो‌ न् लागतो कोणीतरी पाय खेचतो! "आऊट" 
      ३ जानेवारी २०१० ला परिस्थितीनी पाय खेचले आणि बॅंक मर्ज करावी लागली. महिलांसाठी काम करण्याची संधी गमावली हा आयुष्यातला असह्य पराभव!!
      ह्यानंतर नक्की ठरवलं कोणत्याही संस्थेचं जबाबदारीचं पद घ्यायचं नाही. जे करायचं ते जमेल तेवढं एकट्यानं करायचं. ह्या परिस्थितीतुन बाहेर पडायला माझ्या नातवंडांच्या धमाल गमती-जमतींचा खूप उपयोग झाला. रिया आणि आदित्य दोघेही त्यावेळी ६/८ वर्षाचे होते त्यांची शाळा, मित्र-मैत्रिणी हे सगळं दोघेही माझ्याशी मोकळेपणानं शेअर करत असत त्यांना आजी हल्ली सतत घरात असते तेच खूप होतं.
      दु:खात पण समाधान शोधता आलं की जगणं कळलं असं म्हणायला हरकत नाही. 
      २०१२ मध्ये लोकप्रभेच्या कथा स्पर्धेत भाग घेतला आणि पहिला क्रमांक मिळाला. एकट्याने चालायचा रस्ता मिळाला होता. लिहू शकते हे कळल्यावर लिहीती झाले आणि गेल्याच वर्षी ५२ कथांचं पुस्तक प्रकाशित झालं!! 
     गेल्या वर्षी कोरोनामुळे आणि आयुष्यातल्या एका वेगळ्याच अनुभवाच्या वळणानंतर होळीच्या पवित्र अग्नीत मनातली दु:ख, पराभव, अपमान ह्या वर्षी टाकून द्यायचं ठरवलंय...आणि प्रत्येकानं असंच करावं म्हणून बहुतेक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात ही होळी येत असावी. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मनातली जळमटं झटकून वसंतोत्सव साजरा करा असंच हा फाल्गुन महिना सांगत असावा...
         कोरोनामुळे आयुष्य जसं थांबून मोठ्या सुट्टीवर गेलं
          सगळ्यांबरोबर राहून एकान्ताचा शोध घेत राह्यलं.
                                   तेव्हा
          आलेला फाल्गुन, पंचमीचे रंग, विसरवतील सारं
                                  आणि
           उन्हाचा केशरी-पिवळा,चांदण्याचा शुभ्र- धवल...
          पानगळीचा तपकिरी-करडा, फुललेलं वसंतवैभव...
                                  म्हणूनच
      रंगाच्या उधळणीला ऋतुचक्रातील शिशीराच्या शेवटाकडून चैत्राच्या आरंभाकडे नेणार्‍या फाल्गूनाचं सगळंच स्वागतार्ह आणि न्यारं!!
   

 


                                फाल्गुन शुद्ध प्रतिपदा
                                    ता. १४.३.२०२१
                                      ललिता छेडा

1 comment:

  1. Wah apratim.Verses are sublime and beautiful💝
    CA Jayshree Karve

    ReplyDelete