Friday, April 24, 2020

वैशाखवैभव अमलताश

खरं म्हणजे अमलताश म्हणजे 'बहावा'.चैत्री पौर्णिमेपासून बहरायला लागणारा हा वृक्ष वैशाखात पिवळ्याजर्द रसरशीत घोसांंनी बहरून जातो. आम्ही बंगल्यात रहायला आल्यावर सर्वात प्रथम दाराशी बहावा लावला.दुसर्‍या बाजूला पिवळा गुलमोहर होताच. पिवळ्या फुलांचा पसरट घेराचा तो गुलमोहर वैशाखात अपार फुलतो.त्यामुळे उन्हाळ्यातल्या  सकाळी त्या दोन्ही झाडांच्या पिवळ्या रंगांवर पडणार्‍या कोवळ्या सोनेरी किरणांमुळे वैशाखवैभवाची चाहूल लागते.
      'अमलताश' हा शब्द मला कळला तो डाॅ. सुप्रिया दीक्षित-संत ह्यांच्या ह्याच नावाचं पुस्तक वाचनात आलं तेव्हा! सुप्रियाताई ह्या प्रकाश संतांच्या सुविद्य पत्नी आणि इंदिरा संतांच्या सुनबाई आहेत.संतांच्या कुटुंबीयांचे अनुभव, प्रकाश संताबरोबरच्या सहजीवनाचं उत्कट वर्णन म्हणजे हे पुस्तक आहे. पुस्तक वाचल्यावर बहाव्यापेक्षा मला 'अमलताश' जवळचा वाटू लागलाय.
      दुर्गाबाई भागवतांनी खूप छान म्हणून ठेवलंय"जे जे म्हणून वसंताच आहे त्याला पूर्णत्व व अखेरीस विराम देण्याचं काम वैशाखाचेच असते. म्हणूनच वैशाखाला त्यांनी 'चैत्रसखा' म्हटले आहे.
      वैशाखी पौर्णिमा म्हणजे बुद्ध पौर्णिमा! गौतम बुद्धांचा जन्म,ज्ञान साक्षात्कार आणि मृत्यू ह्याच पौर्णिमेला झालं असल्यामुळे ही पौर्णिमा त्रिगुणीत महत्त्वाची मानली जाते. 
        ह्या पौर्णिमेच्या शीतलतेला सुगंधाचीही साथ असतेच. कारण ह्याच काळात कुठेतरी रातराणीचा सुगंध,मोगरा, सायली,देखणी गुलबक्षी आणि वैशाखवैभव मदनबाण फुलून सृष्टीला सुगंधित करत असतात.
       मदनबाणाची एक छान आठवण म्हणजे लग्नानंतर डोंबिवलीत आल्यावर उन्हाळ्यात  फडके रोडवर एक गजरेवाला रोज मदनबाणाचे गजरे घेऊन यायचा. मी आणि माझी मैत्रीण जयश्री रोज त्याच्याकडे गजरा घ्यायला जात असू.मुख्य म्हणजे तोदेखील आमची वाट बघायचा.उन्हाळ्यात मदनबाण आणि श्रावणात हिरव्या बांगड्या भरणं आम्हा दोघींचा आवडता कार्यक्रम होता.
       वैशाखातल्या माझ्या लहानपणीच्या आठवणीत आईची वाळवणांची सुरू होणारी गडबड आहे. परळला असताना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात माझी परीक्षा झाली की आई तिच्या भगिनी मंडळातर्फे मंडळाच्या जागेत पापड,लोणच्याचा स्टाॅल लावत असे. त्यामुळे तिची घरासाठी आणि मंडळासाठी चिकवड्या, कुरडया, बटाटा कीस, सांडगी मिरच्या असं बरंच काही बनवण्याची लगबग सुरू होई. तिचा साबुदाणा, गहू विकत घेण्याचा दुकानदार ठराविक....साबुदाणा शिजवायचं पातेलं ठराविक...वर्षभर जपून ठेवलेले प्लास्टिकचे दोन कागद ठराविक... वाळवणं भरुन ठेवायचे पत्र्याचे डबे ठराविक... सगळं कसं नीटनेटकं आणि शिस्तीत असायचं. अनेकदा गिरगावातून आजी तिला मदत करायला यायची.
       सकाळी खूप लवकर उठून आम्ही दोघी गच्चीवर चिकवड्या घालायला जायचो. आईच्या सुचना सुरू असायच्या ' एकसारखी घाल, एका ओळीत घाल.ती‌ म्हणायची " कोणी बघितलं तर  एखाद्या रांगोळी सारखं दिसलं पाहिजे.माझं लक्ष मात्र शेवटी उरलेला चीक खाण्याकडे असायचं. मला त्याच्यात साईचं दही घालून खायला आवडायचं.आई रात्री ‌छोट्याशा वाटीत माझ्यासाठी दही विरजून ठेवायची.जवळजवळ उन्हाळाभर तिची‌ कामं सुरूच असायची.चिकवड्या तर किती रंगांच्या बनवायची. 
       सतत कामात राहायला आईला फार आवडायचं त्यामुळे डोंबिवलीला रहायला आल्यावर ती उन्हाळ्यात गव्हाच्या कुरडया आणि सांडगी मिरच्या करून विकत होती.त्यात पैसे मिळवण्यापेक्षा नात्यातल्या, ओळखीच्या मंडळींना काही बनवून देण्याचा आनंद जास्त असायचा. आणि ‌महत्वाचं म्हणजे दादा( माझे वडील) तिला ह्या सगळ्यात खूप मदत करायचे. आईला ऑर्डर देणारी मंडळी वाळवणं न्यायला यायची आणि बहूतेक आईकडे, गप्पा मारून जेवूनच जायची.हे सगळं व्यवहाराच्या पलिकडचं असायचं.  
       माझं लग्न झाल्यावर माझ्या नणंदेचा, हरकवंतींचा उत्साह देखील आईसारखाच होता. ती दरवर्षी चुंदा करायला उन्हाळ्यात आमच्या घरी यायची आणि आईकडून महाराष्ट्रीयन पदार्थ शिकून जायची.दोघींच गुजराती लोणची, मराठी पन्हं अशी शिकवणी चालायची.आईची त्याकाळातली खास विद्यार्थी आणि मदतनीस म्हणजे रजनी उर्फ रजी सरदेसाई. आता मागे वळून बघताना एक गोष्ट जाणवतं की ' ही मंडळी कोणतंही काम टेन्शन न घेता आनंदाने, आवडीने करत असत.त्यामुळे त्यांना थकवाही जाणवत नसे.
       असा हा आठवणीतला वैशाख! माझ्या जिभेवर  गव्हाचा चीक, सायीच्या दह्यातल्या चिकवड्या,ताज्या तांदळाच्या फेण्या ह्यांची चव रेंगाळवणारा उन्हाळा! 
      सध्या मात्र अनोळखी व्हायरसवर ए.सी.मध्ये बसून टी.व्ही वरची चर्चा, बातम्या ऐकताना,ह्या लेखाच्या निमित्ताने जुन्या साध्या जगण्यातल्या आठवणींची ही हलकीशी झुळूक सध्याच्या लाॅकडाऊनच्या परिस्थितीत नक्कीच सुखावणारी ठरतेय.
             वैशाख शुद्ध प्रतिपदा
             २४ एप्रिल २०२०
                ललिता छेडा.
        
         

5 comments:

  1. लग्न झाल्यानंतर दोनच वर्षे पापड,फेण्या सासूबाईंच्या देखरेखीखाली केल्या. लोणची अनेक वर्षे केली. 😀😀

    ReplyDelete
  2. वैशाखवैभव वाचल्यावर सर्व जुन्या आठवणी जाग्या झाल्या. सर्व पदार्थाची नावे वाचल्यावर त्या हव्या वाटतात तो काळ खूप चांगला गेला एकंदरीत लेखन अभ्यास पुर्ण वाटले धन्यवा

    ReplyDelete
  3. धन्यवाद रागिणी

    ReplyDelete
  4. धन्यवाद ललिताताई माझे नाव रागिणी

    ReplyDelete