Thursday, May 23, 2019

कवडसा

                      

              डॉ.नील  लांज्या जवळच्या गावात आजीच्या घरी पोचले तेव्हा सकाळचे साडेआठ वाजले होते.रात्रभर ड्रायव्हिंग करून ते खूप दमले होते.तरी दोन वेळा धाब्यावर जेवले तेव्हा आणि पहाटे चहा प्यायल्यावर त्यांनी तासभर गाडीतच झोप काढली होती. त्यांना देवळाजवळ गाडी लावताना बघून बयो धावतच बाहेर आली.
      "अरे, नील दादा तुम्ही कसे अचानक? तुम्ही तर जून महिन्यात येणार होतात ना? बयो प्रश्र्न विचारत त्यांचं सामान काढत होती.तिच्या लेकीने डॉक्टरांना तांब्यात पाणी आणून दिलं.पाणी इतकं गार होतं की त्यांच्या शरीरातून एक शिरशिरी येऊन गेली.फ्रीजशिवाय इतका गारवा! त्यांना तसं विचारात बघून बयो हसली"आता  उतारावर पायर्‍या आहेत. काळजी नका करू. नीलला आठवलं त्या उतारावर तो किती वेळा पडला असेल त्याची खिजगणतीच नाही.पण गेल्या वर्षी नंदीनी त्याची बहीण येऊन गेली तिनं सांगितलं होतं की आजीनं उतारावर छान पायर्‍या करून घेतल्या आहेत.
     तो आल्याची वर्दी बयोच्या मुलानं आजीला दिलीच होती.त्यामुळे खाली घरापुढच्या गोठ्याबाहेर येऊन ती डोळ्यांवर तिरपा हात ठेवून वर बघत होती. त्यानं पण हात हलवून आजीला आपण आल्याचं सांगितलं.आणि येतोय अशी खूण केली.
      बयो सामान घेऊन खाली पोचली होती.बाहेरूनच त्यानं  गणपतीला नमस्कार केला.आणि इकडे तिकडे बघत तो पायऱ्या उतरू लागला.आजूबाजूचा निसर्ग बघून सगळा थकवा दूर झाल्यासारखा वाटत होता.गोठ्याजवळ आजी उभी होती. "इंदर,राजा कधी निघालास? रात्रभर गाडी चालवत होतास? आणि एकटाच आलास? आजीचे प्रश्र संपत नव्हते. आणि सगळ्या जगासाठी तो नील होता पण आजी मात्र इंन्द्रनील मधला इंद्र म्हणायची आणि ते इतकं गोड उच्चारायची कि नीलला ते फार आवडायचं. नील पूढे येवून तिच्या पाया पडला.आणि म्हणाला "अग हो हो, मला घरात तर येऊ दे!...
       घराच्या पायऱ्यांजवळच्या डोलग्यात पाणी भरलेलं होतं.नीलनी नेहमीप्रमाणे त्यातून पायावर पाणी घेतलं. आणि पायर्‍या चढून वर आला तर बयो भाकरतुकडा घेऊन उभी होती.आणि तिच्या बरोबर मागे आजोबांचा मोठा फोटो होता.आणि नीलला बयोमध्ये आजोबांचा एकदम खूप भास झाला.आणि त्याला तो आणि नंदिनी सारखी बयोपण डावखूरी आहे हेही जाणवलं. आजोबा डावखूरे असल्याने आपण दोन्ही नातवंडे डावरे आहोत. हे ठीक आहे. पण ही कशी? घरात शिरताना आपण हे काय विचार करतोय? नीलनी सगळं मनातून झटकलं. 
     आजी समोर बसल्यावर त्यांना जाणवलं आपल्याला जाम भूक लागलीय.आणि आजींनी आपला आवडता गुरगुट्या भात केलाय.किती वर्षांनी आपण आजीच्या हातचा असा भात खाणार आहोत.
       खाऊन नीलनी ताणून दिली आणि त्यांना जाग आली तेव्हा चार वाजले होते.
      बाहेर आले तर आजी आणि बयो झाडांपाशी काही तरी करत होत्या. त्याला बघून आजीनं हातानेच 'ये खाली' अशी खूण केली. आजोबांच्या त्या घराची रचना उतारावर होती.सर्वात वरती पिढ्यानपिढ्यांच गणपतीचं देऊळ,त्यानंतर उतरल्यावर घर आणि गोठा, आणि खाली उतरलं की हौद आणि आजीची फळं,भाज्यांची बाग! आणि देवळासमोरच्या रस्त्यापलिकडे दीड एकरवर  आंब्याची कलमे आणि भाताची शेती. जे सगळं बयोचा नवरा बघत होता.
      नील  तोंडावर पाणी फिरवून आजीच्या दिशेने खाली उतरून गेला त्याला बघून आजी म्हणाली" झाली का झोप डॉक्टरसाहेब,हाॅस्पिटल बायकोवर टाकून आलात का? आजी बोलल्यावर नीलला रेवतीची त्याच्या बायकोची आठवण झाली, कालपासून आपण रागारागाने निघालो आणि फोनसुध्दा केला नाहीय.आई काळजी करत असेल." विचार नको करू, मी फोन करून तुझ्या आईला कळवलय तू पोचल्याचे! आजीनं नीलचा प्रश्र्न सोडवला होता. नाहीतरी आजीचं तिच्या सुनेशी म्हणजेच त्याच्या आईशी खूप गुळपीट होतं.
         नीलला अचानक जाणवलं की आईनं तर आजीला सगळं सांगितलंच असणार. पण त्यानं ठरवलं की आपणहून काहीच बोलायचं नाही.
       नील मांडी घालून हौदाच्या कट्ट्यावर बसला. पंप सुरू होता त्यामुळे पाणी हौदात पडत होते आणि त्याचे तुषार अंगावर उडत होते. "आजी अग, जून महिन्यात यायचंच होतं, मी विचार केला  थोडं आधी जाऊन तुझ्याशी बोलून घ्यावं आणि पेपर तयार करून घ्यावेत म्हणजे रेवती येईल तेव्हा वेळ जाणार नाही.आणि मला पण चेंज हवाच‌ होता. आजी सुचक हसली. जणू काही म्हणत होती " तू लपव पण मला सगळं कळलाय!
     वरून चहा घेऊन बयो आली आणि पुन्हा एकदा नीलला आजोबांची आठवण झाली. तिनं चहाचा कप नीलच्या हातात ठेवला आणि म्हणाली" रात्री जेवायला काय करू? "काहीही चालेल, मी थोडा गावांत फेरी मारून येतो" नील चहाचा कप ठेवून हौदावरुन उतरत म्हणाला.
      आधी वरती देवळात जायचं त्यानं ठरवलंच होतं. देवळात बयोची मुलगी गाभाऱ्यात काही तरी करत  होती.तिला बघून नीलच्या मनांत आलं की ही बयो आपल्यापेक्षा जवळजवळ वर्षभरानी लहान पण हिची मुलं किती मोठी आणि आपला पार्थ तर अवघा आठ वर्षांचा आहे.
     पार्थची आठवण झाली आणि तो हरवल्यासारखा देवळातल्या मंडपात बसला.
      त्याला रेवतीशी आपलं झालेलं भांडण आठवून वाटलं किती छोट्या गोष्टी वरुन आपण आरडाओरडा केला. 
       त्यादिवशी सकाळी हाॅस्पिटलमध्ये कोणत्यातरी पेशंटला भेटायला आलेला श्रीराम त्यांच्या केबिनमध्ये आला आणि  रेवतीला बघून अगदी सहजपणे म्हणाला" कशी आहेस रेवती? किती वर्षांनी भेटतेयस! मग रेवतीनी ओळख करून दिली"हा श्रीराम, आमचा जुना शेजारी, आमच्या दोन्ही घरांत खूप जिव्हाळ्याचं नातं होतं."इतकं की आमच्या दोघांचं लग्न जवळजवळ ठरलेलंच होतं."श्रीराम हसतहसत म्हणाला.
    "मग कुठे माशी शिंकली? आपण थोडं कुत्सित स्वरात विचारलं.आणि रेवतीनं चमकून आपल्याकडे बघितलं."अरे डॉक्टरसाहेब,तुम्ही सिरीयसली घेतलं! झालं असं की  मीच एका मुलीच्या प्रेमात पडलो आणि रेवती तुमची झाली."श्रीरामच्या बोलण्यातला उपरोध नीलला प्रचंड संताप देऊन गेला.रेवतीनी श्रीरामकडे फारसं लक्ष न देता त्याच्यासाठी काॅफी मागवली आणि त्याच्याशी संबंधित पेशंट बद्दल बोलणं सूरू केल.काॅफी आणि बोलणं संपल्यावर "चल श्री,आम्ही दोघेही जरा बिझी आहोत तेव्हा नंतर भेटूया"असं बोलून रेवतीनं त्याला अक्षरशः केबिन बाहेर काढलं.नंतर दुपारच्या जेवणापर्यंत आपण उगीचच चिडचिड करत होतो.आठवून नीलला हसू आलं. देवळात तो एकटाच बसला होता. ती शांतता, समोरची सुंदर मुर्ती त्याला खूप रिलॅक्स वाटलं. त्याला आठवलं, आपण घरी आल्यावर किती भांडलो रेवतीशी की तिनं लग्नाआधी, लग्नानंतर कधीच श्रीरामविषयी का नाही सांगितलं. तिचं त्याच्यावर प्रेम होतं का?जर होतं तर तिनं माझ्याशी प्रेमविवाह कसा केला.असं काहीही आपण बडबडलो. आणि हे सगळं आपण वेड्यासारख आईसमोर बोललो. नीलला रेवतीची खूप आठवण आली. ती सारखी म्हणत राह्यली "अरे, इतकं काही सिरीयसली आमच्या घरातून बोललं जात नव्हत. मी तर कधी त्याच्या बद्दल असा काही विचारदेखील केला नव्हता.नीलला वाटलं आपण येवढा आरडाओरडा का केला? आपण हल्ली रेवतीच्या होणार्‍या कौतुकामुळे जरा जेलस होतोय का? का पेशंट पण रेवतीच हवी असा आग्रह धरतात म्हणून आपली चिडचिड होतेय, विचारांनी नील एकदम दचकला. 
       आपण दोघंही गायनॅक, रेवतीनी दोन्ही घरातल्या मंडळींना समजावून लग्न थाटामाटात न करता कोर्ट मॅरेज करून खर्च वाचवला आणि त्या पैशातून आपण हाॅस्पिटल काढलं. 
      रेवती आहेच तशी विचारांनी स्पष्ट, गोड बोलून माणसांना जोडणारी!! नीलला वाटलं फोन करून तिची माफी मागावी. पण पुन्हा त्याच्या मनात आलं की तिनं इतकं महत्त्वाचं माझ्या पासून लपवलं आणि मी कशाला माफी मागू..... डोळे बंद करून बसलेल्या नीलला कसलीतरी चाहूल लागली. त्यानं डोळे उघडले तर समोर आजी उभी होती. "अरे,तू वर चढून आलीस! 
नील उठून उभा राहिला.
      "इंदर, अरे तू गावात जाणार होतास ना? पण मला बयो म्हणाली तू इथेच बसलायस! चल आता मी वरती चढून आलेच आहे तर गांवात जावून भागवत वकीलाला उद्या संध्याकाळी बोलवून येऊ" आजी ठरवूनच आली होती.
"चल जाऊया, भागवत म्हणजे विनायक ना? नीलनी विचारलं.
     अरे व्वा, आठवतोय का विनायक? लहान असताना तू आणि विनायक किती खेळायचात! तो वकील झाला पण त्यानं गावातच वकीली करायचं ठरवलं! शिवाय त्यांची शेती पण आहे ना! एकुलता एक असल्याने सगळं त्यालाच बघावं लागतं.बोलताबोलता विनायकच घर आलं होतं.
विनायक पडवीतल्या झोपाळ्यावर बसलेला होता,त्या दोघांना बघून विनायक उठून दाराशी आला"अरे, डॉक्टरसाहेब तुम्ही जून मध्ये येणार असं आजी म्हणाली होती.लवकर आलात? विनायकनी नीलशी हात मिळवून हसत हसत विचारलं.
    "हे बघ आधी अहोजाहो करू नकोस. आणि किती वजन वाढवलयस! नील पण मोकळेपणाने बोलत होता.
     त्या दोघांना तसं बोलताना बघून आजी आत गेली.
     " आजी,ग्रेट आहे ना! चौर्‍याएंशी वर्षाला पण किती अॅक्टीव आहे नाही.विनायक पाठमोऱ्या आजीकडे बघून म्हणाला.
       कामाचं ठरवायला उद्या संध्याकाळी विनायकनी आजीच्या घरी यायचं ठरलं. तेवढ्यात नीलला रेवतीचा फोन आला.तिनी दोन दिवसाचं सर्व पेशंटस् चे अपडेट दिले.तिचं तसं औपचारिक बोलणं नीलला जाणवत होतं.पण त्यानंही तिला तशीच उत्तरं दिली. 
       रात्रीची जेवणं झाली आणि नील बाहेर अंगणात आला.पाठोपाठ आजी पण आली.
        "आजी,ही बयो इतकी कशी आजोबांसारखी दिसते" न राहवून नीलने आजीला विचारलं.
       आजीनं मोठा सुस्कारा सोडला आणि म्हटलं"तू  डाॅक्टर आहेस ना?मग समजलं नाही ती तुझ्या आजोबांचीच मुलगी आहे.
       "अग पण ती माझ्यापेक्षा वयाने लहान आहे. असं कसं होईल?नीलला कळत होतं पण मनाला पटत नव्हतं.
      "हे सर्वांना माहीत असलेलं गुपित आहे. फक्त तू पहिलाच आहेस ज्यानं मला विचारलं.आजी थोडी अस्वस्थ झालेली जाणवली. "जाऊ दे आजी, तुला त्रास होत असेल तर नको बोलूया हा विषय! नीलला वाटलं आपण किती घाई करतो बोलायची!
       नाही आता ऐक, तुझ्या वेळेस तुझ्या आईचं बाळंतपण करायला मी मुंबईला राह्यले होते. तेव्हा बयोचे आई-वडील शेती, देऊळ सर्व बघायचे.त्यांना मुलबाळ नव्हतं. ती दोघं इथेच देवळातल्या खोलीत रहायचे. मी तीन महिने त्यांच्याच जीवावर पहिल्यांदा हे घर सोडून इतके दिवस मुंबईला राह्यले होते.
      "पूढे काही बोलू नकोस! नील आजीकडे न बघता म्हणाला.
     "ऐक रे राजा, पहिल्यांदाच मी हा विषय कोणाशी तरी बोलतेय".आजीचे शब्द रात्रीच्या शांततेला चिरत जात होते." मी अनाथ होते, मामांकडे लहानाची मोठी झाले सोळाव्या वर्षी माझं लग्न तुझ्या आजोबांशी झालं. आजोबांनी मला खरंच खूप प्रेम दिलं. त्यामुळे बयोच्या जन्माआधी तिच्या आईनं आणि तुझ्या आजोबांनी त्यांची चुक कबूल केली.माझ्यावर तर आभाळ कोसळलं होतं.पण कुठे जायचं हे घर सोडून काहीच कळत नव्हतं. बयोच्या जन्मानंतर दोन दिवसांत तिची आई गेली.आणि मी पुढे होऊन बयोची जबाबदारी घेतली.तिला लहानाचं मोठं केलं, लग्न करून दिलं, दहा वर्षापूर्वी तुझे आजोबा गेले. बयोच्या दिसण्यामुळे सर्वांना कळतं पण मला कोणी काही विचारत नाही.
       "इंदर बेटा आपल्याला दुखवणार्‍याला माफ करणं खूप कठीण असतं त्यापेक्षा जास्त कठीण असतं आपलं  दुःख आपण विसरलोय असं लोकांना दाखवणं. 
     आजी कमरेवर हात ठेवून उठली आणि घराकडे जड पावलांनी जाऊ लागली.नीलला रेवती ची खूप आठवण झाली त्यानं घड्याळ बघितलं एक वाजून गेला होता.
      सकाळी  उठल्यावर नील बाहेर आला.अंगणातल्या डोलग्यातल्या पाण्यावर कवडसा पडला होता. आणि नीलला आठवलं'आपण पाण्यात हात घातला की तळ वरती आलेला दिसायचा आणि हात मात्र खूप आत बुडून जायचा. त्याच्या मनात आलं'असाच कवडसा आपल्या मनावर पडलाय ज्यानं आपल्या  खोल असलेल्या मनाचा तळ उंचावलाय! सहन करणारे,त्याग करणारे  विचारांनी किती खोल असतात.
       त्यानं रेवतीला फोन लावला" साॅरी, रेवती मी खूप चुकीचं वागलो. रेवतीला काय ‌बोलावं कळत नव्हतं, तिच्या डोळ्यातलं पाणी बघून नीलच्या आईनं ‌ तिच्या हातातून फोन घेवून"या आता घरी आणि बोला काय बोलायचं ते, दोन दिवस पोर येवढस तोंड करून आहे.आधी इथे येऊन तिची समजूत काढ आणि मग पुढच्या आठवड्यात सगळेच जाऊया आजीकडे! असं म्हटलं. नीलला कळलं तिथे काय घडलं असेल ते!!!
     संध्याकाळी विनायक आला आणि नीलनं बोलायला सुरुवात केली " आजीला हे सगळं माझ्या नावांवर करायचंय आणि त्यासाठी ती गेली चार पाच वर्षे मागे लागली होती. त्याबद्दल मी माझं मत आजी समोर सांगू इच्छितो.
       नीलनी बयोला पण बोलावून तिथे थांबायला सांगितलं.
      देवळाचं आपण ट्रस्ट करूया. त्यात मी,नंदीनी दोन्ही आत्यांची मुलं असतील.
      हे घर आणि परिसर रेवतीच्या नावांवर करावं असं मी सुचवतो.
        आणि महत्वाचं म्हणजे रस्त्यापलिकडची दीड एकर जमीन बयोच्या नावांवर करायची.कारण इथलं सगळं आणि आजीला तिच सांभाळणार आहे. नील बोलायचा थांबला आणि आजीनं त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला.जणू ती त्याच्याशी सहमत असल्याचं सुचवत होती. 
          तिला कळलं होतं की आपल्या नातवाच्या मनात पडलेल्या कवडशांनी त्याच्या मनाचा तळ उंचावलाय.
  विनायक उठून उभा राहिला आणि नील जवळ येऊन म्हणाला"मित्रा, खूप छान वाटणी केलीस. मी तुझ्या मनाप्रमाणे सर्व कागदपत्रं तयार करून ठेवतो. फक्त एक इच्छा आहे, इतका मोठा डाॅक्टर आहेस त्याचा ह्या गावाला उपयोग होईल असं काही तरी कर."
      नील उठून आजीच्या पाया पडला आणि म्हणाला"आजी, उद्या जातोय,सगळ्यांना घेऊन जुनच्या पहिल्या आठवड्यात येईन.विनायक तुझी सुचना मी नक्की लक्षात ठेवेन. हे सगळं ऐकत असलेल्या बयोला अश्रू आवरत नव्हते.तिच्याजवळ येऊन नीलनी "ऐ,वेडाबाई रडतेस काय तू पण आता  आमच्या घरातलीच आहेस, चल सर्वांसाठी चहा कर. असं म्हटलं.
     घरात जाताना नीलनं डोलग्यात हात घालून ते पाणी स्वत:वर उडवलं. कवडसा आपलं काम करून नाहीसा  झाला होता.
                                                                             -ल़लिता छेडा



                             गेलं वर्षभर 'एकटेपणाशी मैत्री' ह्या विषयावर दर गुरुवारी संध्याकाळी मी छोट्या कथा ह्या ब्लाॅगवर लिहिल्या. त्यातली ही शेवटची बावन्नावी कथा. ह्या कथांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार!! 
                                                        

2 comments:

  1. Magnificient and glorious finale to a beautiful series 😍💝

    ReplyDelete
  2. कथानक चांगले आहे.आजी व नातू यांच्या संवादातून बर्याच प्रश्नांची उकल झाली. आणि कुटुंब आनंदी झाले.

    ReplyDelete