Thursday, May 16, 2019

जाणीव

अंधेरीच्या आमच्या फ्लॅटच्या समोरचे दोन वन बेडरूमचे फ्लॅट बिल्डरने दोन्ही टाॅवरची कामं पूर्ण होईपर्यंत स्वत:साठी ठेवले होते. पहिल्या मजल्यावरच्या ह्या दोन्ही फ्लॅटच्या किल्ल्या कायम आमच्याकडेच असायच्या.कारण आमच्या ह्यांचा समाजसेवी स्वभाव! सोसायटी रजिस्टर होईपर्यंत बिल्डरला मदत करायचं ह्यांनी मनावरच घेतलं होतं."अग, रिटायर्ड झाल्यावर मला किती आवडतं काम मिळालंय ते बघ! ह्यांच उत्तर ठरलेलं होतं.आणि ते खरं पण होतं.
      आम्हा एकंदर आठ बिर्‍हाडांना जागा दिल्यावर बिल्डर दोन टाॅवरच बांधकाम सहज करू शकत होता.आणि तसं त्यांनं ते केलं.आम्हाला प्रत्येकाला टू बेडरूमचे ब्लाॅक दिले होते.आमच्या मजल्यावर आम्ही जुने तीन भाडेकरू वैद्यमामी, सावंत काका, आम्ही आणि बिल्डरचे दोन ब्लाॅक जिथं त्यांचं आॅफिस होतं.त्यामुळे आमच्या मजल्यावर सतत वर्दळ असायची. आणि आम्ही सगळे जुने शेजारीअसल्यामुळे दरवाजे उघडेच असायचे.
      आणि मग वर्षंभरात दोन्ही टाॅवरची सोसायटी रजिस्टर झाली आणि आमचे हे त्या‌ सोसायटीचे सेक्रेटरी झाले. आणि नोकरी पेक्षा जास्त बिझी झाले. शेजारच ऑफिस पण बंद झालं.आणि आमचे बिल्डर प्रतापभाईंनी त्या ब्लाॅकची स्वच्छता, रंगरंगोटी करून किल्ल्या  आमच्याकडे ठेवल्या. कारण आता तो विक्रीसाठी तयार झाला होता.
       पंधरा-वीस दिवसात हे म्हणाले" ऐकलंस का?समोरचे दोन्ही ब्लाॅक विकले गेले. मी पण लगेच विचारलं"अरे व्वा,न बघता दोन्ही फ्लॅट विकत घेणारे कोण आहेत हे टिकोजीराव? 
    हे पण हसत हसत म्हणाले" खरंच टिकोजीराव आहेत! इथे आॅफीस होतं तेव्हा बघून गेले होते म्हणे, आता बुकिंग करताहेत.एक ब्लाॅक मेघना साने आणि दुसरा अखिलेश शर्मा! आहे की नाही गंमत आणि दोघंही एकमेकांचे जवळचे मित्र आहेत."तुम्हाला बरं इतके डिटेल्स कळले. अग, मी जरा कामासाठी  प्रतापभाईंच्या आॅफिसमध्ये गेलो होतो तेव्हा नेमके दोघं तिथं आले होते. उद्या सकाळी येणार आहेत. शर्मा घर बघायला" ह्यांच्या शेवटच्या वाक्याला वैद्यमामी आल्या आणि"अगोबाई, कोणी शर्मा येणार आहे का शेजारी?" कपाळावर हात लावून उद्गारल्या. मग पुन्हा एकदा ह्यांनी त्यांना सगळी गोष्ट  सांगितली.सगळं ऐकल्यावर मामी"काय तरी बाई हल्लीच्या पिढीची तर्‍हा !  पण उद्या ती मंडळी आल्यावर मला बोलवा बरं! असं मला सांगायला विसरल्या नाहीत.
      दुसऱ्या दिवशी सकाळी दहाच्या सुमारास जीन्स,टी शर्ट घातलेल्या दोघंजणानी आमच्या दाराची बेल वाजवली." समोरच्या ब्लाॅकची किल्ली हवी होती! बोलक्या डोळ्याची, गोरीपान, थोडीशी बुटकी पण स्मार्ट मुलगी दारात उभी राहिली होती.तिच्या हातात किल्ल्या ठेवताना मी सहज म्हटलं"आत या, पाणी प्या.मग उघडा दार. त्याबरोबरच त्याला शोभणारा चष्मा लावलेला, गोरापान असलेला तो मुलगा सरळ आतच शिरला."मेघना,तुम जाओ सब अच्छे-से नक्की करलो, मैं यहां काकीजी के घर पे बैठा हूं। ती अर्थात मेघना चिडून म्हणाली" अरे,  अखिलेश,तुझ्या घराचं पण ठरवायचंय ना! त्या इंटिरियरला नंतर वेळ नाहीये."आता हूं बाबा, तुम्हारे रूमसे शुरू करो। तबतक मैं चाय पीके आता हूं। अखिलेश सोफ्यावर येऊन ह्यांच्या शेजारी बसला होता.मला त्याचा मोकळेपणा आवडला होता. त्या दोघांची चाहूल लागताच वैद्यमामी आल्याच होत्या. अखिलेश ह्यांच्या शेजारी छान मांडी घालून बसला होता. "काकी,आपके दो बेटे है ना? गप्पा सुरूच झालेल्या होत्या." हो रे बाबा, एक बंगलोरला रहातो, शादीशुदा है. आणि दुसरा शिकतोय,पुण्याला असतो. त्यामुळे आम्ही इथं एकटेच! मी पण मोकळेपणाने सांगितलं आणि चहा टाकायला आत जाऊ लागले तर म्हणतो कसा "क्यूं मैं आ गया हू ना!"पूढे लगेच"काकी,मुझे बडे मगमें चाय देना,मुझे वो बशी नहीं चाहिए। असं म्हणून हा मोकळा. वैद्यमामी माझ्या बरोबर स्वैपाकघरांतच होत्या." काय बाई हा मुलगा, ओळख ना पाळख. कसा वागतोय घरातल्यासारखा!"वैद्यवहिनी,असतात काही माणसं अशी मनमोकळी, हे बघा आता तुम्ही हा चहा घेऊन बाहेर जा आणि मी त्या मेघनाला चहा देऊन येते.मी दोन कप घेऊन तिथून निघालेच. वहिनींना तेच हवं होतं.
      परत येईपर्यंत मामी आणि अखिलेश भाच्याची गट्टी जमली होती.
        मला बघितल्यावर "अबसे ये हमारी भी मामी बन गयी है" अखिलेश चहाचा कप ठेवत म्हणाला.
     "अरे, तुम्ही शर्मा म्हणजे... वैद्यमामी मुद्यावर आलेल्या होत्या.
    "मामी, हम लोग मारवाड़ी है" अखिलेशच्या बोलण्यानं मामींनी श्र्वास सोडला आणि म्हटलं"म्हणजे"
      "हां,हम लोग पक्के शाकाहारी! अखिलेश एक परीक्षा पास झाला होता. वैसे मामी,शर्मा तो पंजाबी,यु. पी. में भी होते हैं। 
     तुम्ही कुठचे?मामी सुरू झाल्या होत्या.
      "आम्ही,बनारसचे  तिथे माझ्या बाबुजींच मोठं मिठाईचं दुकान आहे.मेरे औरभी दोन भाई है एक सबसे बडी बहन है। मुझे फिल्म लाइन में जाना था तो मैंने दिल्लीकी फिल्म इंन्स्टीट्युडकी पदवी लेकर बम्बई नसीब आजमाने आया हूं। मैं फिल्म एडिटिंग करता हूं, आणि मेघना कुठे भेटली तुला?मामींना सगळ्या प्रश्नांची उत्तरं लगेच हवी होती. पण तेवढ्यात मेघना रिकामे कप घेऊन आली आणि ते टेबलावर ठेवून 'thanks'  म्हणून अखिलेशकडे बघून 'चलो' म्हणून बाहेरचं पडली.अखिलेश तिच्या जाण्याकडे डोळे मिचकावत आम्हा सगळ्यांना "बाय"म्हणून तिच्या मागे पळायची अॅक्शन करत गेला. 
     त्यानंतरच्या अवघ्या दोन महिन्यात खूप धावपळ करून मेघनानी दोन्ही ब्लाॅक सुंदर सजवले. स्वैपाकघर एकच होतं.अखिलेशच्या हाॅलमध्ये खिडकीजवळ छोटा ओटा केला होता आणि खिडकीतच छानशी दोन कपाटं केली होती.ज्यात गरजेपुरती स्वैपाकाची भांडी,सामान ठेवलं होतं.अखिलेश चहा, खिचडी करू शकत होता. मधली भिंत तोडून काचेची खिडकी केली होती. त्यामुळे लग्नानंतर ती खिडकी उघडली की मोठा फ्लॅट तयार!
       रोज सकाळचा नाश्ता आणि रात्रीच जेवण ती दोघं एकत्र घेत असत. मेघनाच बनवत असे. त्या दोघांचं लग्न ठरलेलंच होत.मेघना एम्.एसी करून मोठ्या काॅलेजमध्ये नुकतीच नोकरीला लागली होती.पण सध्या लग्न न करण्याचा निर्णय मेघनाचाच होता.
    अखिलेशशी गप्पा मारताना कळलं होतं की मेघनाचे वडील रेल्वेत नोकरीला होते.त्यांची बनारसला बदली झाली आणि अखिलेशच्या बाबूजींच्या वाड्यात ओळखीने त्यांना जागा मिळाली.तेव्हाच अखिलेशचा जन्म झाला होता.त्यानंतर त्या दोघांची इतकी घट्ट मैत्री झाली की मेघनाच्या बाबांच्या सर्व नातेवाईकांनी बाबूजींच्या वाड्यावर राहून काशीयात्रा केली.आणि बाबूजींच्या कितीतरी नातेवाईकांनी मेघनाच्या घरी राहून मुंबई बघितली. दोन्ही घरांत एक आपुलकीचं नातं निर्माण झालं होतं.आणि त्यात अखिलेशनी मेघनाशी लग्न करायची इच्छा प्रगट केली आणि दोन्ही घरांनी आनंदाने परवानगी दिली होती.
       अचानक मेघनाच्या बाबांचं हार्ट अॅटॅकनी दु:खद निधन झालं.आणि एकुलत्या एक मेघनावर आईची जबाबदारी आली.  मेघनाच्या आईचं रहात घर पागडीच होतं.त्यामुळे स्वत:च घरं घेऊन आईला तिथं आणायचं हे तिचं ठरलेलंच होतं.
    एक दिवस अचानक वैद्यमामींनी अखिलेशला विचारलं" तुमची प्रेमाची गाडी अडलेय कुठे?तुझे आईवडिल येऊन गेले किती छान मंडळी आहेत ती,मेघनावर तर किती प्रेम करतात.आता तर डोंबिवलीचं घर बंद करून मेघनाच्या आई पण इथं पावसाळ्यानंतर रहायला येतील.पण तुमचं ठरत का नाहीये?
      "सच बोलू मामी, उसका कहना है कि उसको मेरे प्यारका 'एहसास' नहीं हो रहा है उसे मुझसे प्यार है कि नहीं मालूम नहीं हो रहा है। 
     उसके पिताजी के अचानक जाने से वो confused है।अखिलेश खरं मनातलं बोलला होता.
  ‌   अरे हा 'एहसास' असतो तरी काय? मामींचा भाबडा प्रश्न!
       'जाणीव' मी थोडंसं विचार करून दिलेलं उत्तर.
        अजून कसला एहसास हवाय तिला?तुला तर आता कामं पण मिळायला लागली आहेत.?मामींना अजूनही एहसास कळला नव्हता.विषय तिथेच अर्धवट राह्यला.
     पण मामींनी मात्र अर्थ विचारून शोध लावला असावा.
        थोड्याच दिवसात मामींच्या कोकणात रहाणाऱ्या भावाची मुलगी वीणा,  मामींकडे रहायला आली. मुलबाळ नसल्याने मामा मामी वीणाच्या येण्यानं खूप खूष झाले होते. मामीच्या स्वैपाक करण्याला एक चांगलं कारण मिळालं.कोकणातच लहानाची मोठी झालेली वीणा थोडी शहरांत रूळावी.म्हणून आणि तिच्या लग्नाचं मामींनी बघावं ह्या इच्छेनं तिला इथं मामींच्या भावानं पाठवलं होतं.आल्याआल्या तिची अखिलेशशी छान गट्टी जमली आणि सावंतकाकांच्या सुनेनंपण तिच्याशी मैत्री केली.त्यामुळे आमचा मजला धमाल मस्तीची एक जागा झाली.सगळ्यांच्या सल्ल्याप्रमाणे तिनं अखिलेश ज्या कम्प्युटर क्लासमध्ये वेळ जावा आणि पैसा मिळावा ह्यासाठी शिकवत होता.तिथेच वीणाने आणि सावंत काकांच्या सुनेने देखील कम्पुटर शिकायला अॅडमिशन घेतली होती.रोज तिघं सकाळी बहूतेक एकत्रच निघत असत.संध्याकाळी आमच्या घरी पत्ते,कॅरम,गाणी अशी धमाल चालायची.अनेकदा तिन्ही घरातले आम्ही एकत्रच जेवायचो.
      ह्यात मेघना खास इंन्व्हाॅल्व्ह नसायची.अखिलेश मात्र दोन्ही  बिल्डींगचा हीरो होता.
     त्यादिवशी मेघना कामावर जाताना काही तरी विसरली आणि तिनं अखिलेश, वीणाला अखिलेशच्या बाईक वरून जाताना बघितलं.आणि पहिल्यांदाच आपणहून माझ्या घरी येऊन विचारल " ती शेजारची पण जाते ना वीणा बरोबर शिकायला?
    "अग,सावंतांकडे आज सकाळी जेवायला पाहूणे येणार आहेत त्यामुळे ती नाही गेली.का ग?"मी विचारलं पण ती गुळमुळीत 'सहजच' असं म्हणून गेली.
     त्यादिवशी संध्याकाळी कॅरम खेळताना अचानक मेघना आली आणि अखिलेशच्या जवळ जाऊन बसली.तो पण थोडा गडबडला पण खूष ही झाला होता."वीणा कुठे दिसत नाही?" मेघनानी इकडे तिकडे बघत मला विचारलं. लगेच अखिलेश म्हणाला"अरे, वो तो कुछ अपने गांव की स्पेशल डिश बना रही है। आज उसकी तरफ से ट्रीट है। वो क्लासमें फर्स्ट आयी है ना।
       मेघनानी काही तरी विचार केला आणि म्हणाली" तोपर्यंत मी काॅफी करून आणते.....ती आत गेल्यावर मामी लगेच म्हणाल्या"क्या रे बाबा,  लगता है,तुझा तो एहसास की फैसास होतोय की काय? 
      अखिलेश थोडासा आश्र्चर्यचकीत होऊन म्हणाला "बदलाव तो है, लेकीन आपको कैसे पता चला?
       मामी आणि मी दोघी एकमेकींकडे बघून फक्त हसलो."एकटं पडलं आणि असुरक्षित वाटलं की असंच काहीसं होतं."मामी हळूच म्हणाल्या.
     काॅफी आणल्यावर मेघना अखिलेशकडे बघून म्हणाली " मी शुक्रवारी आईला चार दिवसांसाठी इथे आणते.आपल्या घरी आपल्या ह्या गृपला रविवारी दुपारी जेवायला बोलवू या.
      त्यादिवशी वीणाने केलेले कोळाचे पोहे सर्वांनाच खूप आवडले.वीणाचं खूप कौतुक झालं. मेघना पण सगळ्यांच्यात मिसळून अखिलेशच्या जोडीनं वावरत होती.
        रविवारची मेघनाची पार्टीपण खूप छान झाली. मेघनाच्या आईला मेघनाचं हे बदलेले रूप आवडलं होतं. त्यामुळे त्यांनी पण मनापासून स्वैपाक केला होता. 
      जेवणं झाल्यावर सावंत काका अगदी सहजपणे म्हणाले" मामी, तुमच्या वीणाचा, आता लग्नाचा काय विचार? अखिलेश.... त्यांचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत मेघना अखिलेशच्या जवळ उभी राहून त्याच्या दंडाला धरून म्हणाली"अखिलच तर माझ्याशी लग्न ठरलय ना, तिनं हे सगळं इतकं अचानक आणि तिच्याही न कळत केलं की अखिलेशसह सर्वचजण स्तब्ध होऊन गेले.
      शांतता भंग करून सावंत काका म्हणाले" अग मेघना ते तर जगजाहीर आहे. तुझ्या आईसकट आम्ही फक्त तुम्ही कधी जाहीर करताय त्याची वाट पहातोय! मेघनाला आपण केलेली घाई कळली होती.ती लाजली आणि त्याबरोबर अखिलेशनी चक्क सर्वांसमोर तिला मिठीच मारली.
       "जाणीव नव्हे नव्हे 'एहसास' झाला बरं एकदाचा! मामींनी अखिलेशला चिडवायची संधी मिळवली होती.
     "अरे बाबांनो माझं बोलणं तर ऐका, सावंत काका हसत हसत म्हणाले."मी ह्या निमित्ताने माझ्या धाकट्या लेकासाठी वीणाला मामींकडे मागणी घालतोय.आणि ती दोघं एकमेकांना पसंत करतात हे मला अखिलेशनीच सांगितलंय. पण माझं बोलणं पूर्ण व्हायच्या आत मेघनानी तिच्याच प्यारका इजहार कर दिया। त्याबरोबर सगळेजण इतकं हसायला लागले की...
      हसण्याच्या त्या आवाजांच्या आवर्तात आमची चारही कुटुंबे जाणीवेच्या एका वेगळ्या पुलानी जोडली गेली होती.


                                                               -  ललिता छेडा.

3 comments:

  1. खूप छान. दोघात संवाद साधल्याने जिव्हाळा निर्माण झाला. आदरभाव वाढला हिच जाणीव.

    ReplyDelete