Tuesday, December 15, 2020

कृतज्ञ मार्गशीर्ष

      'मासानां मार्गशीर्षोऽहम्' असं म्हटलं जाणाऱ्या ह्या महिन्यांपासून हेमंत ऋतूची सुरुवात होते. ह्या महिन्यात जरी कोणतेही सण नसले तरी दत्त जयंती ह्याच महिन्यातल्या पौर्णिमेला असते. मी स्वत: दत्तभक्त असल्यामुळे माझ्यासाठी हा महिना भक्तीचा आहे. मार्गशीर्ष महिना डिसेंबर महिन्यात येत असतो त्यामुळे वर्षभर घडलेल्या चांगल्या घटनांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीही हा महिना योग्य आहे असं मला मनापासून वाटतं. 

       त्यात ह्या वर्षी तर सगळेच महिने प्रत्येकासाठी परीक्षेचे गेले. एका जीवघेण्या आजारानं संपूर्ण जगाला हादरवून टाकलं. पण सगळ्या अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणारे 'कोविडयोध्दे' सरळ सरळ त्या महामारीशी जाऊन भिडले. त्या सर्वांनी अतिशय समर्पित भावनेने काम केले. म्हणूनच वर्षाच्या शेवटच्या दिवसात त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणं आवश्यक वाटतंय.

       माझ्यासाठी ह्या वर्षी घर बदलणं, लेकीच्या घरी रहायला जावं लागणं हे अचानक बदल घडले आणि घर म्हटलं की आठवते चिऊ-काऊची गोष्ट! वाहून गेलेल्या घरामुळे चिऊताईच्या दारात आलेल्या काऊची‌ गोष्ट सांगताना माझ्या नातवानं‌ मला विचारलं होतं "उन्हात मेणाचं घर वितळले असेल ना मोठी मम्मी? मग चिऊताई कावळ्याच्या घरट्यात रहायला गेली ना? लहान मुलं कधी कधी निरागसपणे शिकवून जाणारं बोलून जातात. असो, हा सगळा घर बदलण्याचा अनुभव मला पण खूप काही शिकवून गेला आणि म्हणूनच‌ ह्यावर्षी माझ्यात झालेल्या बदलासाठी माझ्या मैत्रिणी, जवळचे सुह्रद ह्यांच्यामुळे परिस्थितीत सकारात्मक मनस्थिती ठेवायला मदत झाली त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटतेय!!
        ह्याच काळात सुधा मूर्ती यांचे विचार वाचण्यात आले. "Attachment in Detachment" कोणत्याही नात्यातल्या ओढीपासून अलिप्तपणापर्यंतचा प्रवास!! सुधाताई म्हणतात "मुलं आपापल्या सोडून गेली की आपण मानसिक दृष्ट्या मॅच्युअर होतो आणि वयामुळे आलेली इमोशनस् ची पोकळी सहज टॅकल करू शकतो. कारण त्यांना हवं तसं जगू दिलं तर मी पण ते जसे आहेत तसे स्वीकारायला तयार होईन! त्याचबरोबर आपण स्वत:च्या आवडीनिवडी जपाव्यात आणि आपण करतो त्याच्यावर प्रेम करण्यापेक्षा आपलं ज्या गोष्टींवर प्रेम आहे त्या कराव्यात" त्यांच्या या विचारानं माझ्यातला बदल हा वाचण्याच्या सवयीने झालाय हे कळलं आणि वाचण्याची सवय लावणाऱ्या वडिलांची आठवण झाली. अर्थात ह्या निमित्तानं त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटली.
       वाचण्यावरून नुकतीच एका पुस्तक-विक्रेत्यानी टाकलेली पोस्ट वाचली त्याची आठवण झाली. विषय होता मार्गशीर्ष महिन्यातील 'गुरवारी करायच्या लक्ष्मीव्रतासंबंधी!' शेवटच्या गुरवारी अनेक महिला हळदीकुंकू समारंभ करून पोथ्या वाटतात आणि पुस्तकविक्रेत्यांची अक्षरशः शेकड्यांनी पोथ्यांची विक्री होते. खरोखर अशा पोथ्या वाटून लक्ष्मी प्रसन्न होईल? असा प्रश्न त्यांनी स्वत: विक्रेता असूनही उपस्थित केलाय. नफा होत असूनही त्यांच्या मनात जे आलंय त्याचा आपणही विचार करायला हवा ना? त्याऐवजी त्या पैशातून एखाद्या गरजू महिलेला भाजी, धान्य द्यावं. त्या‌ महिलेचे आशिर्वाद मात्र नक्कीच मिळतील तरच खर्‍या अर्थानं मार्गशीर्षातली भक्ती कृतज्ञतेची होईल असं वाटतं.
        दुर्गाबाई भागवतांनी मार्गशीर्षाबद्दल‌ लिहीताना म्हटलं आहे" छायेची शांती, छायेचा स्पर्श, छायेचे सौंदर्य मार्गशीर्षातल्या लांबच लांब रात्रीत जसे भासते तसे इतर वेळी भासत नाही. ह्या दिवसातली उन्ह तर हवीहवीशी वाटतातच पण छायेचे खेळही गमतीचे असतात"
       अगदी तसेच मार्गशीर्ष महिन्या निमित्ताने कृतज्ञतेचे माझे हे विचार सर्वांना शांती, आनंद, सौंदर्यपूर्ण व्हावेत हीच दत्तात्रया चरणी प्रार्थना!!

                           मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा
                              ता. १५.१२.२०२०
                                ललिता छेडा





2 comments:

  1. खुप छान लिहिलंय.. वाचताना मन शांत झालं. श्री गुरुदेव दत्त!!

    ReplyDelete