Wednesday, September 30, 2020

अनुभवातून आयुष्याचा.....प्रवास

       आपण आयुष्यभर केलेल्या प्रवासाकडे २७ सप्टेंबरला असणार्‍या जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने जाणीवपूर्वक बघायचं ठरवलं. नुसतं प्रवासवर्णन न लिहिता प्रवासात आलेले समृद्ध अनुभव, नद्या, डोंगर ह्यांच्यामुळे नव्यानं उलगडणारा निसर्ग ह्याबद्दल लिहावंस वाटलं!    

      प्रत्येक जागेचं आपलं स्वत:च आगळंच सौंदर्य असतं. कन्याकुमारीचा बीच आणि विवेकानंद मेमोरियल म्हणजे भारून टाकणारी जागा! तिथला सुर्योदय एका ठराविक जागेवरून बघितला तर 'सुर्य' विवेकानंद राॅक आणि तिरूवल्लुवर‌ स्टॅच्यु या दोन्ही प्रेरणादायी वास्तुंच्या मधून उगवतो. आम्ही मुद्दाम त्याजागी जावून तो सूर्योदय बघितला. तीन समुद्रांचा संगम समोर वाळूवर पसरलेला पिवळा रंग, आकाशात उधळलेला केशरी रंग! अचानक मनांत आलं ते दृश्य जणू सांगतंय की" उठा, जागे व्हा आणि लक्ष्य प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका" खूप वर्ष झाली कन्याकुमारीला जावून पण तो उर्जा देणारा सुर्योदय अजूनही विसरता येत नाहीये...तसाच दुसरा हिमालयाला सोनेरी मुकुट घालणारा सुर्योदय म्हणजे दार्जिलिंगचा....आपण उभं असलेल्या जागेसमोर निळसर आभाळ डाव्या बाजूला नुसता अंधार आणि मध्ये फक्त जाणवणारी खोल दरी, अचानक समोर आभाळाचे रंग बदलू लागतात लाल, नारंगी अशा अनेक रंगांची उधळण सुरू होते आणि तो दिमाखात हळूहळू दृष्य क्षितीज रेषेखालून वर येऊ लागतो आणि डावीकडे एक चमत्कार घडतो...आपण हिमालयासमोर उभे आहोत हे कळतं आणि जसाजसा तो उगवतो तशी तशी हिमालयाची उत्तुंग शिखरं सोनेरी होऊ लागतात. तो क्षण फक्त डोळ्यांच्या कॅमेऱ्यातून ह्रदयात निशब्द होऊन साठवून ठेवलाय. कोणत्याही उदास क्षणी क्षितीज रेषेखालून येऊन हिमालयाला सोनेरी करणारं ते दृश्य पुन्हा एकदा प्रेरणा देऊन जातं....

        नदी...मला तरी प्रवासात अनेकदा अनेक रूपात भेटलेय. 

       ऋषिकेशच्या लक्ष्मणझुल्या खाली खळाळत वाहणारी गंगा, हरिद्वारच्या हर की पौडीला रात्रीच्या वेळी होणार्‍या तिच्या आरतीच्या वेळी दिसणारं अखंड गतिमान चिरंतन गंगेचं रूप, रुद्रप्रयागला अलकनंदा आणि ‌मंदाकिनी ह्यांच्या संगमानंतर एक देखणं रुप घेऊन गंगा‌ म्हणून वाहतानाच सोज्वळ रूप! अशी ही गंगा जी एका काठावर स्मशान आणि दुसर्‍या काठावर बहरलेली संस्कृती ह्यांचा समतोल साधत एका लयीत वाहत जातेय. कुलु ते मनालीच्या प्रवासात बियास नदी आपल्या खळाळणार्‍या आवाजांनी आपल्याला संगीतमय सोबत करते. मनालीची‌ आठवण म्हणजे कानात रूंजी घालणारा‌ बियासचा आवाज!!
       पिठापूरला जाताना राजमुंद्रीला विस्तीर्ण पात्र असलेली‌ स्वच्छ, संथ वाहणारी गोदावरी मन मोहून टाकते. तिचा पुतळा ह्या स्टेशनवर एकमेव नदीचा पुतळा म्हणून आपलं स्वागत करतो. लेह-लडाखला‌ अचानक सिंधू नदी भेटते. तिच्या पात्रात पाय सोडून बसल्याचा आनंद अवर्णनीय असतो. जबलपूरच्या भेडाघाटात नर्मदा जलप्रपातच्या रौद्र रूपात भेटते. बद्रीकेदारला आदिबद्री जवळ उगमाशीच लुप्त झालेली सरस्वती! गुजरातमध्ये फिरताना साबरमतीच्या किनार्‍यावर असलेल्या म. गांधींजींच्या आश्रमांमुळे साबरमती संतांच्या रूपात भेटते. अशा ह्या नद्या, पाण्याशी निगडित असलेल्या संस्कृतीतल्या बदलांना स्वीकारताना त्यांच्या धारांचा, प्रवाहाचा अनाहत नाद आपल्याला त्या‌ क्षणापुरता तरी मुक्ती देत असावा.
       लग्नाच्या आधीचे प्रवास खूप वेगळे होते. एस्. टी, ट्रेन ह्यांचे प्रवास अतिशय नियोजित आणि आर्थिकदृष्ट्या काटकसरीचे असायचे तरीसुध्दा मजेत व्हायचे. 
       लग्नानंतर मुलांसाठी त्यांच्या सुट्टीत त्यांच्याबरोबर केलेले प्रवास वेगळ्याच आठवणी मनात ठेवून गेलेत.
       साठीनंतर युरोप-अमेरिकेच्या परदेशच्या टूर! हे प्रवास ट्रॅव्हल कंपन्यांबरोबर केल्यामुळे वेगवेगळ्या विचारांची, विविध संस्कृतींची माणसं भेटली. काहीजणांशी तर घट्ट मैत्री देखील झाली. भूतानचा‌ प्रवास निसर्ग बघताना करावा लागणारा बस प्रवास थकवून ‌टाकतो. तर अंदमानला जाणं म्हणजे देशभक्तीचा अंगार फुलवून येणं असा अनुभव देऊन जातो.
        युरोप अप्रतिम निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी जावं तर टेक्नाॅलाॅजीसाठी अमेरिका अनुभवावी. युरोप मधल्या आॅस्ट्रीयाच्या मी तरी प्रेमातच पडले. व्हॅटिकन सिटी ह्या छोट्याश्या देशात चालताना पाय दमतात पण तिथल्या वास्तुशास्त्र आणि कला ह्याचं दर्शन मनाला भुरळ घालतं! भित्तिचित्रं आणि छतावरच्या कलाकृती 'लास्ट जजमेंट'च्या निर्मात्याला जागोजागी भेटवतात.
       अमेरिका म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न 'नायगरा...जो तिथं गेल्यावर पूर्ण स्वप्नपूर्तीचा आनंद देतो आणि ट्वीन् टाॅवरचं स्मारक म्हणजे अमेरिकेला पडलेलं दु:स्वप्न!!
        हे सगळे प्रवास कोणाबरोबर तरी केलेले आहेत पण लेह लडाखचा प्रवास मात्र अनोळखी गृपबरोबर एकटीने केला. तो माझ्यासाठी लक्षात रहाणारा ठरलाय. तो नुसता अप्रतिम              निसर्गसौंदर्य असणारा प्रदेश नाहीये तर ती एक संस्कृती आहे. तिथले अनेक रंगांचे पर्वत आणि पेन्गाॅन लेक फक्त अविस्मरणीय!
       धबधबे खूप बघितले पण तामिळनाडूतल्या कुडतालम् चे 5 falls, म्हणजे जंगलात पाण्याचे पाच अखंड स्त्रोत्र ज्यांचा नुसता स्पर्श आपलं शरीरच नाही तर मन पण निर्मळ करून जातात!!
       असे हे माझे आठवणीतले काही प्रवास ज्यांचं अनपेक्षित वळण खूप छान अनुभव देऊन गेले आहेत.
       एखाद्या कलाकाराचा संघर्षाचा प्रवास, भविष्यकाळ शोधणारा ज्योतिषांचा प्रवास, अडचणी, अडथळ्यातून केलेला जगण्याचा प्रवास आपण सर्वचजण करतोय!
       पण निवांत, निसर्गरम्य ठिकाणी जगण्याला एक सुंदर सुर असतो जो आपल्याला निसर्गाच्या लयीत मिसळून टाकतो आणि तोच खरा अनुभवातून आयुष्याचा प्रवास...


                      अधिक अश्र्विन पौर्णिमा
                          ता. ३०-९- २०२०
                              ललिता छेडा

3 comments:

  1. प्रवास वर्णन खूप छान त्यातून निसर्गाच्या जवळ गेल्याचा आनंद मिळाला एकदम सुंदर

    ReplyDelete
  2. Hues and colours and inspirations of different rivers well captured.
    CA Jayshree Karve

    ReplyDelete
  3. खूप सुरेख लिहलंय् !!

    ReplyDelete