Wednesday, September 30, 2020

अनुभवातून आयुष्याचा.....प्रवास

       आपण आयुष्यभर केलेल्या प्रवासाकडे २७ सप्टेंबरला असणार्‍या जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने जाणीवपूर्वक बघायचं ठरवलं. नुसतं प्रवासवर्णन न लिहिता प्रवासात आलेले समृद्ध अनुभव, नद्या, डोंगर ह्यांच्यामुळे नव्यानं उलगडणारा निसर्ग ह्याबद्दल लिहावंस वाटलं!    

      प्रत्येक जागेचं आपलं स्वत:च आगळंच सौंदर्य असतं. कन्याकुमारीचा बीच आणि विवेकानंद मेमोरियल म्हणजे भारून टाकणारी जागा! तिथला सुर्योदय एका ठराविक जागेवरून बघितला तर 'सुर्य' विवेकानंद राॅक आणि तिरूवल्लुवर‌ स्टॅच्यु या दोन्ही प्रेरणादायी वास्तुंच्या मधून उगवतो. आम्ही मुद्दाम त्याजागी जावून तो सूर्योदय बघितला. तीन समुद्रांचा संगम समोर वाळूवर पसरलेला पिवळा रंग, आकाशात उधळलेला केशरी रंग! अचानक मनांत आलं ते दृश्य जणू सांगतंय की" उठा, जागे व्हा आणि लक्ष्य प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका" खूप वर्ष झाली कन्याकुमारीला जावून पण तो उर्जा देणारा सुर्योदय अजूनही विसरता येत नाहीये...तसाच दुसरा हिमालयाला सोनेरी मुकुट घालणारा सुर्योदय म्हणजे दार्जिलिंगचा....आपण उभं असलेल्या जागेसमोर निळसर आभाळ डाव्या बाजूला नुसता अंधार आणि मध्ये फक्त जाणवणारी खोल दरी, अचानक समोर आभाळाचे रंग बदलू लागतात लाल, नारंगी अशा अनेक रंगांची उधळण सुरू होते आणि तो दिमाखात हळूहळू दृष्य क्षितीज रेषेखालून वर येऊ लागतो आणि डावीकडे एक चमत्कार घडतो...आपण हिमालयासमोर उभे आहोत हे कळतं आणि जसाजसा तो उगवतो तशी तशी हिमालयाची उत्तुंग शिखरं सोनेरी होऊ लागतात. तो क्षण फक्त डोळ्यांच्या कॅमेऱ्यातून ह्रदयात निशब्द होऊन साठवून ठेवलाय. कोणत्याही उदास क्षणी क्षितीज रेषेखालून येऊन हिमालयाला सोनेरी करणारं ते दृश्य पुन्हा एकदा प्रेरणा देऊन जातं....

        नदी...मला तरी प्रवासात अनेकदा अनेक रूपात भेटलेय. 

       ऋषिकेशच्या लक्ष्मणझुल्या खाली खळाळत वाहणारी गंगा, हरिद्वारच्या हर की पौडीला रात्रीच्या वेळी होणार्‍या तिच्या आरतीच्या वेळी दिसणारं अखंड गतिमान चिरंतन गंगेचं रूप, रुद्रप्रयागला अलकनंदा आणि ‌मंदाकिनी ह्यांच्या संगमानंतर एक देखणं रुप घेऊन गंगा‌ म्हणून वाहतानाच सोज्वळ रूप! अशी ही गंगा जी एका काठावर स्मशान आणि दुसर्‍या काठावर बहरलेली संस्कृती ह्यांचा समतोल साधत एका लयीत वाहत जातेय. कुलु ते मनालीच्या प्रवासात बियास नदी आपल्या खळाळणार्‍या आवाजांनी आपल्याला संगीतमय सोबत करते. मनालीची‌ आठवण म्हणजे कानात रूंजी घालणारा‌ बियासचा आवाज!!
       पिठापूरला जाताना राजमुंद्रीला विस्तीर्ण पात्र असलेली‌ स्वच्छ, संथ वाहणारी गोदावरी मन मोहून टाकते. तिचा पुतळा ह्या स्टेशनवर एकमेव नदीचा पुतळा म्हणून आपलं स्वागत करतो. लेह-लडाखला‌ अचानक सिंधू नदी भेटते. तिच्या पात्रात पाय सोडून बसल्याचा आनंद अवर्णनीय असतो. जबलपूरच्या भेडाघाटात नर्मदा जलप्रपातच्या रौद्र रूपात भेटते. बद्रीकेदारला आदिबद्री जवळ उगमाशीच लुप्त झालेली सरस्वती! गुजरातमध्ये फिरताना साबरमतीच्या किनार्‍यावर असलेल्या म. गांधींजींच्या आश्रमांमुळे साबरमती संतांच्या रूपात भेटते. अशा ह्या नद्या, पाण्याशी निगडित असलेल्या संस्कृतीतल्या बदलांना स्वीकारताना त्यांच्या धारांचा, प्रवाहाचा अनाहत नाद आपल्याला त्या‌ क्षणापुरता तरी मुक्ती देत असावा.
       लग्नाच्या आधीचे प्रवास खूप वेगळे होते. एस्. टी, ट्रेन ह्यांचे प्रवास अतिशय नियोजित आणि आर्थिकदृष्ट्या काटकसरीचे असायचे तरीसुध्दा मजेत व्हायचे. 
       लग्नानंतर मुलांसाठी त्यांच्या सुट्टीत त्यांच्याबरोबर केलेले प्रवास वेगळ्याच आठवणी मनात ठेवून गेलेत.
       साठीनंतर युरोप-अमेरिकेच्या परदेशच्या टूर! हे प्रवास ट्रॅव्हल कंपन्यांबरोबर केल्यामुळे वेगवेगळ्या विचारांची, विविध संस्कृतींची माणसं भेटली. काहीजणांशी तर घट्ट मैत्री देखील झाली. भूतानचा‌ प्रवास निसर्ग बघताना करावा लागणारा बस प्रवास थकवून ‌टाकतो. तर अंदमानला जाणं म्हणजे देशभक्तीचा अंगार फुलवून येणं असा अनुभव देऊन जातो.
        युरोप अप्रतिम निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी जावं तर टेक्नाॅलाॅजीसाठी अमेरिका अनुभवावी. युरोप मधल्या आॅस्ट्रीयाच्या मी तरी प्रेमातच पडले. व्हॅटिकन सिटी ह्या छोट्याश्या देशात चालताना पाय दमतात पण तिथल्या वास्तुशास्त्र आणि कला ह्याचं दर्शन मनाला भुरळ घालतं! भित्तिचित्रं आणि छतावरच्या कलाकृती 'लास्ट जजमेंट'च्या निर्मात्याला जागोजागी भेटवतात.
       अमेरिका म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न 'नायगरा...जो तिथं गेल्यावर पूर्ण स्वप्नपूर्तीचा आनंद देतो आणि ट्वीन् टाॅवरचं स्मारक म्हणजे अमेरिकेला पडलेलं दु:स्वप्न!!
        हे सगळे प्रवास कोणाबरोबर तरी केलेले आहेत पण लेह लडाखचा प्रवास मात्र अनोळखी गृपबरोबर एकटीने केला. तो माझ्यासाठी लक्षात रहाणारा ठरलाय. तो नुसता अप्रतिम              निसर्गसौंदर्य असणारा प्रदेश नाहीये तर ती एक संस्कृती आहे. तिथले अनेक रंगांचे पर्वत आणि पेन्गाॅन लेक फक्त अविस्मरणीय!
       धबधबे खूप बघितले पण तामिळनाडूतल्या कुडतालम् चे 5 falls, म्हणजे जंगलात पाण्याचे पाच अखंड स्त्रोत्र ज्यांचा नुसता स्पर्श आपलं शरीरच नाही तर मन पण निर्मळ करून जातात!!
       असे हे माझे आठवणीतले काही प्रवास ज्यांचं अनपेक्षित वळण खूप छान अनुभव देऊन गेले आहेत.
       एखाद्या कलाकाराचा संघर्षाचा प्रवास, भविष्यकाळ शोधणारा ज्योतिषांचा प्रवास, अडचणी, अडथळ्यातून केलेला जगण्याचा प्रवास आपण सर्वचजण करतोय!
       पण निवांत, निसर्गरम्य ठिकाणी जगण्याला एक सुंदर सुर असतो जो आपल्याला निसर्गाच्या लयीत मिसळून टाकतो आणि तोच खरा अनुभवातून आयुष्याचा प्रवास...


                      अधिक अश्र्विन पौर्णिमा
                          ता. ३०-९- २०२०
                              ललिता छेडा

Friday, September 18, 2020

महिना...अधिकाचा

                    जगणं... अधिक-उणं


          ह्यावर्षी अधिक अश्र्विन आला आहे. आणि अधिक महिना ही खरं म्हणजे खगोलशास्त्रीय अॅडजस्टमेंट आहे. अगदी साध्या भाषेत सांगायचं तर दैनंदिन जीवनचर्या ठरवताना सुर्यामधले बदल नोंदवून कालगणना करण कठीण जात होतं आणि म्हणूनच दैनंदिन जीवनात चंद्र उपयोगी ठरला. त्यामुळेच जगभरातील अनेक संस्कृतींमध्ये दैनिक व्यवहारासाठी चांद्र आणि वार्षिक व्यवहारासाठी सौर कॅलेंडर वापरले जाऊ लागले. या दोन्ही कॅलेंडर मधल्या कालगणनेत तफावत येऊ नये म्हणून काही सुधारणा करून चांद्रवर्षामध्ये ठराविक कालावधीनंतर म्हणजेच तीन वर्षांनंतर एक महिना अधिक घेतला जाऊ लागला.
          ह्यावेळचा अधिक महिना मात्र काही तरी वेगळं शिकवून जाणार आहे. एखाद्या देशाच्या नव्हे तर जगभरातल्या सीमा ओलांडून कोरोना विषाणूने संपूर्ण जगासमोर भयंकर आव्हान उभं केलंय. त्यातही चक्रीवादळ, आर्थिक मंदी अशा अनेक संकटांनी आपल्या देशाला घेरून ठेवलंय!
          ह्या परिस्थितीत फेसबुकवर एक सुंदर पण विचार करायला लावणारी पोस्ट वाचली. लेखिकेने अपरिग्रहावर तिचे विचार मांडलेत....
          "कमळ हे अपरिग्रहाचं प्रतिक मानलं जातं! अलिप्ततेचं न गुंतण्याचं प्रतिक!! अनेक धर्मात, मातीत, लोकांत 'कमळ सांगते स्वत:कडे साठवून ठेवू नको, वाहू दे पानावरून ओघळू दे. जितकं धरून बसशील तितकं ते दूर जाणार!!
          लेखिकेने लिहीलेले संदर्भ ‌तिचे स्वत:चे आहेत. पण ‌मला मात्र हे‌ विचार कुठेतरी आजच्या परिस्थितीशी जोडून घ्यावेसे वाटले...
‌‌ आज कोरोनाशी लढताना जाणवलं की आपण आपल्या गरजा नकळत अपरिग्रहाच्या दिशेने नेत होतो. गरजेच्या पूढे सुरू होतो तो मोह आणि त्यानंतर येतो हव्यास! आज घरात बसलेल्या आपल्या सर्वांना गेल्या सहा महिन्यांत वापरलेल्या कपड्यांच आणि कपाटात जमा असलेल्या कपड्यांच्या संख्येचं गणित गरजेपेक्षा अधिक असल्यांच जाणवतंय! मोठेपणा साठी लग्नावर पैसा, अन्न ह्यांची वारेमाप उधळण करणाऱ्या आपल्याला ५० जणांना बोलवून पण लग्न समारंभ संपन्न करता येतोय ते कळतंय. महत्वाचं म्हणजे हे सगळं वेगवेगळ्या बाबतीत सगळ्यांनाच जगण्यातलं अधिक- उणं दाखवून देतंय.
           माझ्यासाठी अधिक महिना म्हणजे आई करत असलेले अनारसे, कारण तिला अनारसे खूप आवडायचे आणि त्यासाठी ती एखाददुसरी आॅडरही घ्यायची आणि अनेकदा ती ह्या महिन्यात जेवताना मौन पाळायची त्या‌ आठवणी !!
          तशीच एक बोचरी आठवण आहे ती म्हणजे "आमच्या ओळखीतल्यांच्या घरी माझ्या आई-वडिलांना ३०+३ मेहूणातले एक म्हणून बोलावलं होतं. समारंभ खूप थाटामाटात आणि देखणा व्हावा ह्यासाठी सर्वजण धावपळ करताना दिसत होते. त्या काकू माझ्या आईची मैत्रीण त्यामुळे आईनी अगदी सहज विचारलं" का गं, तुझी बहिण दिसत नाही कुठे? त्यावर काकू उतरलेल्या ‌चेहर्‍यानी म्हणाल्या होत्या तिचे यजमान गेल्या वर्षी गेले ना, म्हणून सासूबाई तिला बोलावू नको म्हणाल्या!! त्यावेळी माझं वय अडनेडी होतं. पण तरीही मला ते काही पटलं नव्हतं येवढं नक्की आठवतंय.
          घरी आल्यावर मी आईला विचारलं होतं की "‌हे ३०+३ काय आहे. तेव्हा तिनं काय सांगितलं ते आठवत नाही पण तिलाही काकूंच्या बहिणीला जी वागणूक दिली गेली ते‌ आवडलं नव्हतं असं जाणवलं.
         आज‌ वाटत विचारांचा सुध्दा अपरिग्रह नसावा, प्रत्येकाबद्दल भूतकाळातल्या घटनांमधून मतं बनवून मनात साठवून ठेवण्यापेक्षा माणसं काळानुसार बदलतात हे लक्षात घेऊन नदीसारखं वाहतं रहावं.
         ही पोस्ट लिहीण्यासाठी वाचन करताना कळलं की जावयाला ‌दीपदान आणि अनारसे ह्यांचं अधिकाच वाण देण्यामागची संकल्पना म्हणजे मुलीला आणि जावयाला लक्ष्मी-नारायणाचा जोडा समजून‌ हे वाण द्यायचं आणि म्हणूनच तेहत्तीस न म्हणता ३०+३ म्हणायची पद्धत आहे. म्हणूनच अधिक महिन्यांला पुरुषोत्तम (विष्णू) मास म्हणतात.‌ ह्यावेळी तर लीप ईयर आहे त्यामुळे असा योग १६० वर्षांनंतर जुळून आला आहे.
         माझी मैत्रीण मेधाताईं बोडस ह्यांनी अधिक महिन्याची एक वेगळीच गोष्ट सांगितली. त्यांच माहेर अलिबागचं असल्यामुळें अलिबाग पासून २ कि. मी. वर असलेल्या वरसोली गावांत एका नारळाच्या वाडीत असलेल्या देवळाची कथा त्यांनी सांगितली. त्या नारळाच्या वाडीत एक चौथरा आहे ज्याला चार खांब आहेत तिथे एक शिवलिंग आहे जे कायम नारळाच्या झावळ्यांनी झाकलेलं असतं. पण ज्यावेळी अधिकमास येतो तेंव्हा झापं काढून शिवलिंग मोकळं केलं जातं. त्यामुळे अधिकमासात तिथे खूपजण दर्शनासाठी जातात. त्यांनी हे सांगितल्यावर मनांत आलं...
         ह्या अधिक महिन्यांपासून अपरिग्रहाची, जुन्या चुकीच्या रीतरिवाजांची झापं काढून मन मोकळं करायला हवं.
         जावयाला दान देताना माझ्या लेकीला सन्मानाची वागणूक दे आणि लेकीला सासरी सर्वाना प्रेमाने जिंकुन घे असं सांगायला हवं.
         ३०+३ गरीब विद्यार्थ्यांना पुस्तकाचं,एकल महिलांना जगण्याच्या बळाचं अधिकाचं वाण द्यायला हवं.
         तरच जगण्यातलं, मनातलं उणं जाऊन अधिक महिना सफळ सुफळ संपूर्ण होईल.


               अधिक अश्र्विन शुद्ध प्रतिपदा
                       ता. १८- ९-२०२०
                          ललिता छेडा



Tuesday, September 1, 2020

स्वातंत्र्य..... तुमचं, माझं,आपलं सर्वांचं!

          आॅगस्ट म्हणजे देशभक्तीचा महिना! ह्याच महिन्यातल्या ९ आॅगस्टला क्रांती ‌दिन साजरा केला जातो. कारण ८ आॅगस्टला गांधीजींनी ब्रिटीशांना 'भारत छोडो'चा इशारा दिला आणि ९ तारखेला सर्वत्र जनक्षोभ उसळला. तो स्वातंत्र्याचा शेवटचा आणि मोठा लढा! ह्याच वेळी अरूणा असफली यांनी इंग्रजांना‌ न जुमानता गोवालिया टॅंकवर तिरंगा फडकवला होता. हे सगळं लिहीण्याचं कारण म्हणजे नुकतेच टी. व्ही. वर स्वातंत्र्यदिनादिवशी तरुण पिढीला काही प्रश्र्न विचारले जात होते आणि दुर्दैवानं बरीचशी उत्तरं त्यांना देता येत नव्हती!! त्यातला एक प्रश्न होता "स्वातंत्र लढ्यात सहभागी असलेल्या एका महिलेच नांव सांगा? १५/२० जणांमध्ये कोणालाही एक नांव सांगता आलं नाही. प्रश्र्न रस्त्यावर विचारत होते. त्यामुळे एक मुलगा म्हणाला"असं अचानक कसं आठवेल? त्यावर पत्रकारानी छान उत्तर दिलं "स्वात्रंत्र्याविषयी काहीही झोपेतसुध्दा विचारलं तर उत्तर यायला हवं! "तुम मुझे खून दो.. कोणी म्हटलं आहे? ९० टक्के मुलांना उत्तर सांगता आलं नाही. 

         तेव्हा मनात विचार आला की ह्या पिढीला मिळालेलं स्वातंत्र्य ही‌ अशी संकल्पना आहे जी हक्क आणि जबाबदारीची जाणीव करून देते हे सांगण्याची आवश्यकता आहे असं जाणवतंय! त्यामुळे 'इंडिपेंडन्स' म्हणजे आपल्यावर कोणाचंही बंधन नाही असा साळसूद अर्थ काढला जातो. 

ह्यावर्षीचा आपला ७४ वा स्वातंत्र दिन होता. पण तो कोरोनाच्या छायेतच साजरा करावा‌ लागला. 

‌         कोरोनाच्या ह्या काळात ‌बंधन आणि स्वातंत्र्य दोन्ही गोष्टी ‌हातात‌ हात घालून चालायला हव्या होत्या. पण‌ तसं होताना कमी जाणवलं. लोकांनी स्वत: पूढे होऊन सरकारी यंत्रणेला मदत करावी अशी अपेक्षा होती. पण हातावर पोट असलेल्या लोकांबरोबर उगीचच मास्क न लावता फिरणारे ही बरेच होते. हा स्वातंत्र्याचा दुरूपयोग आहे असं वाटलं!! त्याचबरोबर नियोजनाच्या अभावामुळे लाॅकडाऊनमध्ये व्यवस्थापनही नीट होऊ शकत नव्हतं.
         स्वातंत्र्या विषयी अच्युत गोडबोले ह्यांनी खूप छान लिहिलंय "स्वातंत्र्य ह्या संकल्पनेला ठराविक चौकटीत बसवण्यापेक्षा ह्या संकल्पनेच्या अर्थाचा आता शोध घ्यायला हवाय. म्हणजेच भारतातल्या प्रत्येकाला अगदी तळागाळातील लोकांपर्यंत किमान सोईसुविधा ‌निवारा, वीज, शिक्षण, वाहतूकीसाठी सोय आणि महत्त्वाचं म्हणजे आरोग्य हे सर्व मिळालंच पाहिजे"
         तसंच मिळालेलं स्वातंत्र्य खऱ्या अर्थानं प्रत्येकानं कसं जोपासावं‌ हा सुध्दा एक महत्त्वाचा सामाजिक विचार होऊ शकतो. स्वत:वर अनेक सामाजिक बाबींबाबत स्वत:चं नियंत्रण असलंच पाहिजे. अगदी साधी‌ रस्त्यावर थुकण्याची‌ सवय!! हा स्वच्छतेचा साधा नियम पाळण्याची किती गरज आहे आणि आता आरोग्याचा प्रश्न इतका गंभीर झाला आहे अशावेळी तरी असे साधे साधे स्वच्छतेचे नियम पाळणं आवश्यक आहे नाही का?
चंगळवाद, पर्यावरणाचा समतोल, निसर्गाची जपणूक ह्या सगळ्या गोष्टींचा जाणीवपूर्वक विचार करणं म्हणजे स्वातंत्र्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकणं आहे. इथं सर्च संस्थेच्या डॉ. आनंद बंग ह्याना लोकसंख्येवर‌ प्रश्र्न विचारल्यावर "माणसं 'किती' पेक्षा 'कशी' आहेत ‌हे‌ महत्वाचं आहे." असं उत्तर दिलं होतं. तेव्हा माणसं कशी आहेत ह्यावर समाजाच्या स्वातंत्र्याचं भविष्य ठरणार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे.
         स्वातंत्र्य अंमलबजावणीत मोठी अडचण स्त्रीयांच्या बाबतीत येते. स्वातंत्र्य मिळालं आहे पण त्याचा वापर कसा करायचा ते मात्र दुसरं कोणी तरी ठरवणार. अशा परिस्थितीशी लढा द्यायला बळ देणार्‍या अनेक संस्थां/स्रिया अशा महिलांच्या पाठीशी उभ्या ‌आहेत.‌ पण जेव्हा एखादी स्त्री नोकरीच्या ठिकाणी होणाऱ्या त्रासाविरूध्द आवाज उठवेलं किंवा घरातल्या जवळच्या नातेवाईकाकडून लैंगिक छळाविषयी प्रतिकार करेल तेव्हा स्वातंत्र्याचा अर्थ कळतोय असं म्हणू शकतो.
        १५ आॅगस्टच्या निमित्ताने स्वातंत्र्याविषयी संकल्पना, संवेदना ह्यावर वाचलेल्या लेखांमधून, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमधून मला जे वाटलं ते ‌लिहीण्याचा प्रयत्न केला. 
कारण आपल्या सर्वांची,
'देश हा देव असे माझा'
‌‌ हीच भावना मनात कायम असते आणि तशीच असली पाहिजे.
                   

                  भाद्रपद शुद्ध पौर्णिमा
                      ता. १.८.२०२०
                        ललिता छेडा