Sunday, July 5, 2020

दादा आणि मी....

         गेल्या काही वर्षांत अनेक प्रकारचे 'डे' दर महिन्याला साजरे होऊ लागलेत. त्याचा एक मोठा फायदा झालाय आणि तो म्हणजे काही व्यक्ति, संबंध ह्यांचा विचार आपण फार कमी करत होतो, त्याविषयी व्यक्त होण्याची संधी मिळू लागली. असंच एक नातं म्हणजे वडील आणि मुलांचे नातेसंबंध!
जुन महिन्याच्या तिसऱ्या रविवारी येणारा 'फादर्स डे' माझ्यासाठी हा लेख लिहायला प्रेरणा देऊन गेलाय.
ह्या लेखाच्या निमित्ताने बापलेकीच्या नात्यातल्या वेगवेगळ्या वळणांचा, विविध टप्प्यांवर बदलेल्या संबंधांचा विचार करायला लावणार्‍या अनेक आठवणी ताज्या झाल्या. संगोपन, समुपदेशन हे शब्द आमच्या पिढीतल्या अनेकांना अजिबात माहीत नव्हते. कारण आई वाढेल ते निमुटपणे खायचं आणि वडील म्हणतील ते काहीही न बोलता ऐकायचं! अशी साधारणपणे त्याकाळाची लाईफस्टाईल होती.
दादांच्या स्वभावातला रागीटपणा, शिस्त ह्याचं दडपण नक्कीच होतं. त्यांच्या रागीटपणाचा अनुभव त्यांच्या जवळच्या बहुतेकांनी कमी-जास्त प्रमाणात घेतलेलाच आहे. पण मी मात्र त्यांच्या स्वभावातली खास वैशिष्ट्यं, आम्हां बापलेकीच्या नात्यातल्या गमतीजमती इथं शेअर करणार आहे.
दादांच वाचन खूप होतं. त्यातसुद्धा वाचलेल्या गोष्टींची टिपणं काढण्याची त्यांची वेगळी पध्दत होती. ती टिपणं म्हणजे वाचलेल्या लेखांवर, गोष्टींवर त्यांचं भाष्य असायचं. मला आवर्जून ते वाचायला सांगत असत. पण मी मात्र तेव्हा वाचायला अळंमटळंम करत असे. आज त्याचा नक्कीच पश्र्चाताप होतोय. सकाळी रोज सगळे मराठी पेपर आॅफीसमुळे आमच्या घरी यायचे. जवळजवळ तासभर त्यांचं पेपर वाचन चालायचं. आमच्या घरी नवशक्ती यायचा बाकीचे पेपर ते खाली आॅफिसमध्ये घेऊन जायचे. साधारण सहावी इयत्तेनंतर मी रोज शाळा सुटल्यावर इंग्रजी पेपर वाचायला आॅफिसमध्ये जात असे, तेव्हा इतर पेपरातल्या महत्त्वाच्या बातम्या, अग्रलेख मी वाचावेत यासाठी खूणा करून ठेवलेले असायचे. त्यांच्यामुळेच मला वाचायची आणि टिपणे काढायची सवय लागली आहे. ह्या लेखाच्या निमित्ताने हे सांगायला मिळतंय हेही नसे थोडके!! त्यांच्या आईचे काका म्हणजे नाटककार आदरणीय कृ. प. खाडिलकर! त्यांची सर्व नाटकं त्यांच्या जवळ होती. तुकाराम गाथा, गीतारहस्य, सार्थ ज्ञानेश्वरी, दासबोध अशी अनेक पुस्तकं त्यांच्या संग्रहात होती आणि त्या पुस्तकांची त्यांनी अक्षरशः पारायण केली होती. परेलहून डोंबिवलीला शिफ्ट होताना त्यांनी ती पुस्तकं त्यांच्या जवळच्या मंडळींना गिफ्ट म्हणून दिली. तेव्हा मी मुलं खूपच लहान असल्यामुळे माझ्या व्यापात इतकी व्यस्त होते की ती पुस्तकं आपल्या जवळ ठेवावीत हे खरंच सुचलं नाही आणि एक मौल्यवान ठेवा मी गमावला. दादांच्या वाचनात इतकीच रोजची पूजा खूप आठवणीत रहाणारी होती आणि आई त्या पुजेची तयारी छान करून द्यायची. पण त्यांना देवळात आवर्जून गेलेलं मात्र आठवत नाही.
दादाना सगळ्या खेळांची आवड होती. ते स्वत: फुटबॉल खेळत होतेच. ते स्टेट लेव्हलवर देखील खेळले आहेत. त्यांनी कॅरम बोर्ड एका स्ट्रोक मध्ये सर्व काळ्या किंवा सर्व पांढऱ्या सोंगट्या घेतलेल्या मी बघितल्या आहेत. आई आणि माझ्या बरोबर कॅरम खेळताना आमच्या दोघींचे शाॅट बघून ते दोन बोटं कपाळाला ज्यापध्दतीने लावायचे जाम हसू यायचं अर्थात त्यांना ते हसणं आवडतं नसे पण आमचा खेळ काही सुधारला नाही. पत्ते खेळताना पण ते खूप मनापासून आणि आवडीने खेळत. ब्रिज त्यांचा आवडता खेळ! आम्ही तिघं कत्थ्रोट खेळायचो. खेळ ब्रिजसारखाच पण चौथी गेम जास्त बोललेल्यासाठी ओपन होत असे. बाकीचे दोघे भिडू! आम्ही भिडू झालो की आईला हरवायला आम्ही दोघे जाम चिटींग करत असू, तिला ते कधीच कळलं नाही. मला बुद्धीबळ त्यांनीच शिकवलं. ते उत्तम खेळायचे. पण माझी त्या खेळातली गती बघून त्यांनी तो नाद सोडून दिला. ते म्हणायचे" लल्या, तुला खेळ समजलाना बास झालं! अरे हो, माझं माहेरचं लाडाचं नांव 'लल्या' आहे. पुढे नातवंडांशी पण तितक्याच उत्साहानं ते कॅरम, पत्ते, बुद्धीबळ खेळत असत.
त्यांना आॅफिसला सोमवारी सुट्टी असल्यामुळे रविवारी दुपारी जेवणं झाल्यावर अनेकदा ते म्हणायचे" चला, लल्या, 'तिर्र गो' करायला जाऊया. 'तिर्र गो' हा त्यांचा खास शब्द त्याचा अर्थ 'उगीचच फिरायला जायचं' आणि मग ते मला इराॅस, रिगल, मेट्रो थिएटरमध्ये इंग्रजी सिनेमा बघायला न्यायचे. सिनेमा अर्थात चार्ली चॅप्लीन, लाॅरेल- हार्डी ह्यासारखे पिक्चर तसेच काही क्लासिकल इंग्रजी चित्रपट पण आम्ही बघितले आहेत. गणेशोत्सवात गिरगाव, दादर, परळ, लालबागचे गणपती बघायला जायचा आम्हां दोघांचा कार्यक्रम रविवार/सोमवारच्या दुपारचा ठरलेला असायचा. त्यांचा त्या दर्शनाचा रूट निश्चित होता आणि तो त्यांनी कधीच बदलला नाही. महत्त्वाचं म्हणजे शक्यतो चालत जायचं. गोकुळाष्टमीला गिरगांवातले चित्ररथ मला खांद्यावर घेऊन मी ६/७ वर्षांची होईपर्यंत दाखवले आहेत. त्यानंतर ते त्यादिवशी वर्षातून एकदा आजीकडे जेवायला जायचे. आई-आजीला तोच आनंद असायचा. त्याशिवाय ते सभासद असलेल्या एशियाटिक लायब्ररी, गिरगांव चौपाटीला मधून मधून जायचंच! आमच्या कडे आलेल्या नातेवाईकांना मुंबई दर्शन करावावं तर त्यांनीच! अनेकांना त्यांनी दाखवलेली राणीची बाग अजुनही आठवत असेल. तिथे पण रूट ठरलेला. आईसफ्रुट खायची जागा नक्की! प्रत्त्येक गोष्ट एका शिस्तीतच व्हायला हवी हा त्यांचा अट्टाहास असायचा. तत्व आणि शिस्त त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग होता.
त्यांना अभ्यास घ्यायला आवडायचं पण शिकताना विद्यार्थ्याची फटका खायची तयारी हवीच.
दादांचं गोष्ट सांगणं म्हणजे खूप आनंददायी अनुभव असायचा. त्यांची 'तीच ग मी' ही गोष्ट ज्यांनी ज्यांनी ऐकलेय ते कोणीच गोष्ट ऐकतानाच घाबरणं विसरणारच नाही.
दादा पट्टीचे पोहणारे होते. सांगलीला असताना कृष्णेच्या पुरात पोहल्याच्या अनेक आठवणी ते सांगत असत. मला पोहायला शिकवावे असं त्यांच्या मनात आलं आणि एका मे महिन्याच्या सुट्टीत मला भोपळा बांधुन विहीरीत ढकललं आणि ते पण विहीरीत उतरले थोड्याच वेळात त्यांना कळलं की मला पायाला आणि हाताच्या कोपराना लागलंय! रक्त येत होतं. त्यांनी पटकन मला बाहेर काढलं आणि म्हणाले" काही गरज नाही पोहायला शिकायची! खूप अपसेट झाले होते ते मला लागलेलं बघून!
त्यांच्या आयुष्यातलं अतिशय महत्त्वाचं वळण म्हणजे त्यांच्या मनाविरुद्ध मी केलेलं लग्न! मी घरातून गेल्यावर त्यांना झालेला मनस्ताप नंतर सर्वांनी सांगितलाच पण मी घरी येऊ का? असं विचारल्यावर' लग्नाचं सर्टिफिकेट घेऊन ये! आणि एकटीच ये. येवढंच बोलले. मी घरी गेले तेव्हा शांतपणे दोन शब्द बोलून बाहेरच्या खोलीत जाऊन बसले. त्यानंतर जावई म्हणून डॉ.चा स्वीकार करायला त्यांनी सहा महिने घेतले. आमचं स्वत:च डोंबिवलीत घर झाल्यावर घरी येऊन डॉ.शी बोलायला सुरुवात केली.
लग्नानंतर मला खूप कांजण्या झालेल्या. त्यावेळी त्यांनी माझी केलेली सेवा, घेतलेली काळजी मी कधीच विसरणार नाही.
डोंबिवलीत रहायला आल्यावर नातवंडांना गोष्टी सांगायला, अभ्यास घ्यायला ते रोज माझ्या घरी येत असत. नंतर ते आजारी झाल्यावर माझ्याच बिल्डींगमध्ये देवाच्या कृपेने त्यांना तळमजल्यावर जागा मिळाली. ह्या सगळ्या वर्षात त्यांनी कधीच माझ्या लग्नाबद्दल काही विषय कधीच काढला नाही.
अनेकदा काही प्रसंगात त्यांच्या कठोरपणामुळे आईला जे सोसावं लागलं ते मनातून जात नाही. पण त्याकाळी सर्वसाधारणपणे स्त्रीयांनी निमुटपणे सहन करायचं अशी परिस्थितीच होती. आजच्या लेखात आईबद्दल लिहायचं शक्यतो टाळलंय!
माझं लिखाण, पुस्तक प्रकाशित झालं हे सर्व बघायला ते दोघंही नाहीत ही खंत वाटते. पण त्यांच्यामुळेच मी लिहीती झालेय. हे पण तितकंच खरं आहे.
आम्हा बाप-लेकीची नातं उलगडताना माझी एक स्मरणयात्रा घडली. आज गुरु पौर्णिमा, त्यामुळे माझ्या पहिल्या गुरुं बद्दल लिहायला मिळालं हे माझं नशीब! ह्यानिमित्ताने माझ्या आई- वडिलांच्या स्मृतीला वंदन करते आणि इथंच थांबते.


                       आषाढ शुद्ध
 पौर्णिमा
                          ता. ५-७-२०२०

                           ललिता छेडा
                   
                     

7 comments:

  1. आठवणी येतात त्या .आई वडील यांच्या सोबत काही तरी शिकायला मिळाले तेच आयुष्य भर उपयोगी ठरते. लिखाण छान

    ReplyDelete
  2. खूप छान लिहिले आहेस ललिता. दर आठवड्यातून एकदा काकीला भेटायला त्यांची घरी चक्कर असे, ते मला आठवत आहे.

    ReplyDelete
  3. Khup sunder Me dada na baghitala nahi pan tyancha baddal khup aikala aahe tumcha kadun aaj tumcha likanatun te najare samor disale👌💐

    ReplyDelete
  4. इतकं सुंदर आणि सहज लिखाण केले आहेस की सगळवडोळ्यासमोर चित्रपटा सारख उभं राहिलं
    सुरेख गुरुदक्षिणा गुरुरूपी वडिलांना त्या ही fathers day च्या रुपात.👍👌👌💐💐

    ReplyDelete
    Replies
    1. माधुरी छेडा-पासड

      Delete