Monday, June 22, 2020

ओलाकंच आषाढ

         पाऊस...आषाढातला
रिमझिम बरसणारा, उत्स्फुर्तपणे कोसळणारा, मुसळधार झोडपणारा आणि अंधारून आलेल्या संध्याकाळी एखादीच सर येऊन मनाला ओलाकंच करणारा तो‌ प्रत्येकाच्या आठवणीत वेगवेगळ्या रुपात असतो.
माझ्या आठवणीतला पाऊस काॅलेजच्या दिवसांत तो पडत असताना बघितलेल्या मॅटिनी मधला आहे...जो अजूनही तसाच पहिल्या पावसासारखा माझ्या मनात ताजा आहे.
तो पाऊस 'रिमझिम के तराने लेके आयी बरसात' म्हणणार्‍या वहिदा-देवआनंदच्या डोळयातला असतो. त्या दिवसांत मी आणि माझी मैत्रीण लता गोठोस्कर आम्ही दोघींनी सिनेमा बघण्याचे आमचेच अनेक विक्रम आम्हीच तोडलेत. आम्ही कालाबाझार बघायला गेलो असताना खूप पाऊस पडत होता आणि दोघीनी नखशिखांत भिजून तो सिनेमा पाहिला आहे. सिनेमात वरचं गाणं ती दोघंही एका छत्रीत चालताना आहे. लता माझ्या कानात कुजबुजली होती "आपण दोघींनी एक तरी छत्री आणायला हवी होती ना" ती हे बोलल्यावर आजुबाजुच्या शुक-शुक कडे लक्ष न देता आम्ही दोघी वेड्यासारख्या हसत सुटलो होतो ते आठवतं.
गाईड सिनेमातल्या 'मेघ दे, पानी दे, छाया देरे तू रामा....एस्. डी. बर्मन ह्यांच्या सुरातली पावसाला केलेली विनवणी आणि त्या गाण्याचं
पिक्चरायझेशन फक्त अविस्मरणीय!
'परख' सिनेमा फक्त 'ओ सजना बरखा बहार आयी' ह्या गाण्यापुरताच लक्षात आहे. पण त्या गाण्यानं गारुड मात्र प्रत्येकाच्या मनावर कायमच केलेलं आहे. पाऊस पडला की हे गाणं एकदा तरी मनात गुणगुणलंच जातं.
मल्हार हा पावसाळ्याचा राग आहे हे माहित होतं पण सिनेसंगीताचा अभ्यास असलेल्या विनय नवरेशी बोलताना कळलं की' ह्या ‌रागाचे मुळ नांव 'मलरूहका' असं आहे. त्याचा अपभ्रंश 'मल्हार' असा झाला आहे. पुस्तकांतून ही ह्याविषयी लिहिलेलं आढळलं! 'मलका हरण करने वाला वो मल्हार! हे वाचनात आलं.
ग्रीष्मातलं ते कोरडं वातावरण, मरगळलेला दिवस, धुळीने भरलेली झाडं आणि अचानक मल्हारच्या सुरांसारख्या पावसाच्या धारा सुरू होतात आणि तो सोहळा पंचेन्द्रियांना सुखावून जातो. असंच एक सुखावणारं गाणं म्हणजे...
आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिये।
आयी रात सुहानी देखो प्रीत लिए।
रोमॅंन्टिक मेलडी!! साधीसुधी पण सुंदर नंदा, भाबड्या पण देखण्या चेहर्‍याचा सुनील दत्त! शैलेंद्र आणि सलिल चौधरी शब्द-सुरांचा एक अप्रतिम ठेवा! मुलायम आवाजाचे तलतजी आणि साक्षात लतादीदींचे स्वर!! १९६० साली आलेल्या उसने कहां था।ह्या सिनेमातलं हे गाणं मनाच्या कोणत्याही अवस्थेत फक्त आनंदच देतं. सुरवातीचा म्युझिकचा पीस, त्यानंतरचे 'झींगुर बोले चिकीमिकी' हे कानाला सुखावणारे शब्द आणि शेवटचे आहाहा, आहा च्या नक्षीदार ताना! ह्या गाण्यासाठी परत परत बघितलेला सिनेमा! आजही मी अनेकदा यु ट्युबवर हे गाणं ऐकते.
माझ्या मॅटिनी बघण्याच्या क्राईममधल्या अनेक पार्टनर होत्या पण लता खास आणि कुंदा मुजुमदार, मंगल कुलकर्णी ह्यांच्यासारख्या अनेकजणी ह्या सिनेमाच्या वेडात सहभागी असायच्या. काॅलेज आणि पाऊस नेहमी एकत्रच सुरू व्हायचे त्यामुळे माझ्या मॅटिनीच्या आठवणीत पाऊस खूप आहे.
हिंदी-मराठी पावसातली, पावसावरची गाणी तर चिक्कार आहेत. त्यांचे नुसते उल्लेख केले तरी एक पुस्तक होईल.
गाण्यांशिवाय पाऊस असाही खूप आठवणी देऊन गेलाय. आम्ही परळला रहात असताना हिंदमाता पासून जवळच रहात असल्याने थोडासा पाऊस जरी पडला‌ तरी‌ घरासमोरच्या रस्त्यावर पाणी भरत असे. त्या पाण्यात मुलांची धमाल, खेळ बघायला मजा यायची. कधी कधी अगदी कमरेपर्यंत पाणी भरत असे आणि गंमत म्हणजे आज पन्नास वर्षे झाली तरी तितकंच पाणी भरतय. अनेक पक्ष, अनेक नगरसेवक आले-गेले पण ‌पाऊस आणि हिंदमाताला भरणारं पावसाळ्यातंल पाणी तसंच आणि तितकंच आहे.
डोंबिवलीला आल्यावर स्टेशनजवळ पाणी भरतच असतंआणि पुर्वी पाणी भरलं की मी आणि जयश्री (माझी‌ सख्खी शेजारीण) पाणी ‌बघायला जात असू. एका वर्षी पाणी नुस्तं न बघता पाण्यात शिरलो. कमरे एवढ्या पाण्यात गंमत म्हणून चालतांना जयश्रीचे दीर समोरून आले नंतर जे काही झालं तेव्हा पासून आमचं पाणी बघायला जाणं बंद झालं.
आषाढातल्या पावसाचा आठवणीतला प्रसंग म्हणजे डोंबिवलीतच माझ्या नणंदेच्या सासरी जायला आम्ही दोघी पाऊस पडत होता तरी निघालो. संध्याकाळची दिवेलागणीची वेळ होती. रस्त्यावर लाईट नव्हते त्यामुळे माझ्या नणंदबाई शाॅर्टकट मारायच्या नादात दलदलीत अडकुन पडल्या. अंधारात काय झालंय ते मला काहीच कळत नव्हतं. पाऊसही जोरात पडायला लागला होता. फक्त त्यांच्या हाका ऐकू येत होत्या. इतक्यात तिथं एक बाई आली तिच्याकडे बॅटरी होती. बॅटरीच्या उजेडात काय घडलंय त्याची कल्पना आली. प्रसंग खूप कठीण होता. पण त्या बाईच्या मदतीनं आणि माझ्या नणंदेच्या हिमतीनं त्यांना आम्ही बाहेर काढलं. नेहमी मनांत येतं ती बाई जर आली नसती आणि तिच्या जवळ बॅटरी नसती तर काय झालं असतं?
असा हा आठवणीतला आषाढ!
आज तर आषाढाचा पहिला दिवस!
जो 'कविकुलगुरू कालिदास दिन' म्हणून साजरा केला जातो. ह्या लेखाच्या निमित्ताने अजरामर काव्ये, नाटके आणि लघुकाव्ये लिहीणार्‍या कालिदासांचे स्मरण करून...
'आषाढस्य प्रथम दिवसे' सर्व लेखकांना आणि रसिक वाचकांना वंदन करते आणि ह्या दिवसांच्या शुभेच्छा देते.


                 
आषाढ शुद्ध प्रतिपदा
                   ता. २२- ६-२०२०
                     
 ललिता छेडा




Friday, June 5, 2020

वसुधैव कुटुंबकम्

         १५ मे जागतिक कुटुंब दिन म्हणून साजरा करत असताना टी.व्ही. वर आपल्या गावी, आपल्या कुटुंबात जाण्यासाठी धडपडणाऱ्या मजुरांना बघताना 'कुटुंब' शब्दाचा अर्थ कळत होता.
कोरोनाच्या लाॅकडाऊनमुळे घराबाहेर न पडणारी मी महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडले होते. सकाळी अकरा वाजता ऊन अक्षरशः भाजून काढत होतं. अशा वेळी डोंबिवली म्युनिसिपाल्टीसमोर कमीत कमी हजार माणसांची लाईन होती. उत्सुकतेनं त्यांना विचारल्यावर ही मंडळी गावाला घरी परतण्यासाठी लागणाऱ्या सर्टिफिकेट, सह्या ह्यासाठी लाईनीत उभी होती. त्यातला एका ओळखीच्यालाच मी विचारलं "कहां जा रहे हो? "राजस्थान" त्यानं उत्तर दिलं. "यहां एक हाॅटेलमें काम करता था, गांव में घर पे बुड्ढे मां-बाप, बीबी-बच्चे है। इधर दसजन साथ में रहते थे। अब इस महामारी में साथ में रहभी नहीं सकता। अब जो होगा फॅमिली के साथ रहकर ही होने दो" तो बोलत होता आणि त्याच्या मनातलं दुःख डोळ्यात भरून आलं होतं. तो उभा असलेल्या लाईनीतला त्याचा नंबर दुपारी दोन वाजेपर्यंत लागेल की नाही कळतं नव्हतं. एक छोटीशी बॅग घेऊन तो निघाला होता. त्याला कळलं होतं' कुटुंबाबरोबर जगण्यासाठी सामान नाही तर फक्त इच्छा लागते'.
आपल्या भारतीय परंपरेत कुटुंबवत्सलतेचा संस्कार खूप महत्त्वाचा मानला जातो. विभक्त कुटुंब पद्धती आता वाढत असली तरी कुटुंबाशी जुळलेलं रहायला हवं हे आता ‌सर्वानाच कळलेलं आहे.
आता त्यातही भर पडली आहे 'एक्स्टेंडेड फॅमिली' अर्थात 'विस्तारित कुटुंबांची'! रक्ताच्या नात्यांच्या इतकंच महत्व असलेल्या ह्या जिवलग मित्र मैत्रिणींच जवळचं कुटुंब बनलेलं असतं. रक्ताची नसली तरी मनानं, मायेनं जोडलेली ही नाती अनेकदा जगण्याला बळ देतात.
'वसुधैव कुटुंबकम्' हे शब्द खर्‍या अर्थानं अनेक व्यक्ती-संस्था सार्थ करत असतात. माझी मैत्रीण भारती मोरे एकल महिलांसाठी तिच्या ज्ञानदीप स्री जागृती मंचातर्फे गेली अनेक वर्षं काम करतेय. एकट्या राहणाऱ्या महिलांना आर्थिक, मानसिक आधार देण्याचं काम ही संस्था करतेय. ह्या संस्थेमुळे ओळख झालेल्या अनेकजणींचे इतके जवळचे संबंध झाले आहेत की एखाद्या कुटुंबाप्रमाणे त्या एकेमेकीच्या आनंदात सहभागी होतात, अडीअडचणीला मदतीला धावून जातात. विस्तारित कुटुंबाच एक सुंदर उदाहरण ह्या 'एकल पण एकत्र' रहाणार्‍या महिलांनी सर्वांसमोर ठेवलं आहे.
माझी दुसऱी मैत्रीण ज्योती पाटकर, जी आता आमच्यात नाही पण तिनं उभा केलेला टिटवाळ्यातला 'मुक्ता बालिकाश्रम' सुध्दा एक 'एक्स्टेंडेड फॅमिली' म्हणजे काय ते छान समजावून देते. ५ ते १८ वर्षाच्या अनाथ, अन्याय झालेल्या बालिकांसाठी हा आश्रम आहे. त्या मुलींना सांभाळणार्‍या, शिकवणार्‍या सगळ्या ताईसुध्दा एखाद्या कुटुंबाप्रमाणे त्यांना शेअरिंग केअरिंग शिकवतात. जेणेकरून ‌त्या आश्रमातून बाहेर पडल्यावर सुध्दा सर्वांशी मिळून मिसळून राहू शकतील.
सध्याचे समाजमाध्यमातले फॅमिली गृप! म्हणजे कुटुंब शब्दाचा परीघ मोठा करू लागलेत. प्रत्यक्ष भेट होत नसली तरीही ‌जगभरातले नातेवाईक, शाळेतल्या मैत्रीणी‌ फेसबुक, व्हाॅटस्‌ ॲप वरून फॅमिली बनू लागलेत. सध्याच्या कोरोनाच्या दिवसांत ही माध्यमातली कुटुंब खूप उपयोगी पडताहेत.
आयुष्याच्या सेकंड इनिंग मध्ये आपल्या कुटुंबातून काही कारणांनी बाहेर पडलेले अनेकजण वृध्दाश्रमातले शांत, निवांत जगणं कधी ऐच्छिक कधी मनाविरुद्ध स्वीकारतात आणि ‌तो वृध्दाश्रम ‌त्यांच कुटुंब ‌बनतं.
जागतिक कुटुंब दिनानिमित्ताने इतक्या प्रकारच्या कुटुंब कथा आठवल्या. पण खर्‍या अर्थानं विश्र्वातील समस्त जीवांच्या हिताचे 'पसायदान' मागणार्‍या ज्ञानेश्वरांनी सर्व विश्र्वालाच कुटुंब मानलंय! आणि तसं मानणं हेच खरं आणि योग्य आहे.



                    जेष्ठ शुध्द पौर्णिमा
                    ता. ५ जुन २०२०
‌                       ललिता छेडा