पहिल्या पावसाच्या सरीं नंतर दरवळतो तो मातीचा सुगंध! ज्येष्ठ महिन्याच्या म्हणजेच मे महिन्याच्या साधारणपणे शेवटच्या आठवड्यात ह्या पहिल्या पावसाच्या सरींनी तृप्त झालेली धरा कृतज्ञतेचा गंधित हुंकार देते.
कधी कधी मे अखेरीस काही ठिकाणी गारांचा पाऊस देखील पडतो. मुंबईकरांनी मात्र वळीवाच्या सरी अनुभवल्या असल्या तरी गारांचा पाऊस मात्र त्यांना बघायला मिळत नाही.
माझ्या आठवणीत एकदा पुण्यात असताना अगदी दोन मिनिटांसाठी छोट्या छोट्या गारा पडल्या होत्या. पण फलटणमध्ये आत्याच्या घरी मात्र अचानक गारांचा पाऊस अनुभवायला मिळाला होता. हवेतला उष्मा इतका वाढला होता की आत्या म्हणालीसुध्दा" ललिते, आज तुला गारांचा पाऊस बघायला मिळणार बहूतेक! आणि खरंच अवघ्या अर्ध्या तासात घराच्या पत्र्यांवर तडतड आवाज येऊन गारा पडू लागल्या. त्या आभाळातून जमिनीवर जितक्या पटकन पडत होत्या तितक्याच पटकन वाटीत जमवेपर्यंत विरघळत होत्या. मला गारांचा पाऊस बघायला मिळाला म्हणून दादांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता आणि त्यांचा तो आनंद माझ्या अजूनही नजरेसमोर आहे.
जेष्ठ महिन्यातले दिवस मोठे असतात म्हणूनच बहूतेक ह्या महिन्याला ' जेष्ठ' म्हणत असावेत.
ह्या काळात शाळांना सुट्टी असल्यामुळे बहूतेकांचे प्रवासाचे बेत ठरलेले असतात. आम्हीपण मुलांना घेऊन उन्हाळ्यातल्या सुट्टीत खूप फिरलो आहोत. भटकंतीला कुठेही गेलं तरी काही ठिकाणं, काही जागांच सौंदर्य आगळंच असतं. कन्याकुमारी'चा सुर्यास्त असाच माझ्यासाठी अविस्मरणीय आहे.
ती उन्हाळ्यातली संध्याकाळ असल्यामुळे सहा वाजले तरी कन्याकुमारीच्या समुद्र किनाऱ्यावर अजून उन्हांचा पिवळा प्रकाश पसरलेला होता. तीन समुद्रांच्या संगमावर क्षितीजापर्यंत पसरलेल्या त्या किनाऱ्यावर आम्ही येऊन उभं राह्यलो. समोर आकाश आणि पाणी ह्या मधली निळ्या रंगाची किनार आता लालसर केशरी रंगाची उधळण झाल्यामुळे अस्पष्ट होऊ लागली होती. पिवळसर रंगाचा सूर्य त्या रंगात मिसळून पाण्यात अस्त होण्यासाठी हळूहळू खाली सरकत होता. एका बाजूला विवेकानंद राॅक मेमोरियलची विस्तीर्ण देखणी वास्तू आणि समोर दिसणारा सुर्यास्त! सूर्याच्या त्या समुद्रात अस्ताला जाताना दिसलेलं निसर्गाचं गुढ, अनाकलनीय रूप आणि समुद्रातच उभी असलेली मानव निर्मित विवेकानंद स्मारकाची प्रेरणादायी वास्तू बघून तिथं असलेले सर्वजण निशब्द होऊन गेले होते. अचानक आमच्या शेजारी उभे असलेले एकजण म्हणाले" मागे बघा, चंद्रोदय होतोय आणि चैत्री पौर्णिमेला तर सुर्य आणि चंद्र दोन्ही एकाचवेळी आकाशात दिसतात. आतादेखील जेष्ठी पौर्णिमा आलीच आहे ना! ते गृहस्थ विवेकानंद केंद्राचे काम करत असल्यामुळे इथं त्यांचं नेहमी येणं जाणं होतं. समोर किनाऱ्यावर लाटा परतून फिरताना एक गाज ऐकू येत होती. छायाप्रकाशाच्या खेळातली जपून ठेवलेल्या आनंदाच्या क्षणातली एक अविस्मरणीय संध्याकाळ होती ती!!
सर्व सणांची सुरवात होते ती जेष्ठातल्या वटपौर्णिमेपासून! श्रद्धा- अंधश्रद्धा ह्यातली रेषा अंधूक करणारा हा सण. योगायोगाने वसुंधरा दिनाच्या आजूबाजूलाच ही पौर्णिमा येते. पण अनेक स्रिया ह्या पुजेसाठी वडाच्या फांद्या तोडून घरी पूजा करतात. अनेकदा त्या तोडलेल्या फांदीला लालसर फळं सुध्दा असतात. पक्ष्यांची घरटी असणारं, सावली देणारं, पारंब्यांनी विस्तारलेलं देखणं वडाचं झाड नक्कीच पूजनीय आहे. पण ते पर्यावरणाच्या दृष्टीनं बघितलं तरच जाणवलं पाहिजे. जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी ह्या वृक्षाची पूजा करणं हे मलातरी पटत नाही. जन्मजन्माचं नातं जोडण्यापेक्षा मिळालेल्या जन्मात एकमेकांना मानानं वागवलं, इच्छा अपेक्षांचा आदर केला तर जास्त चांगलं होईल असं मला मनापासून वाटतं. त्यासाठी वटवृक्षासारखं मन मोठं व्हावं ह्यासाठी पूजा करणं निश्चितच संयुक्तिक ठरेल. पण पुन्हा एकदा श्रद्धा-अंधश्रध्देतली प्रत्येकाची अस्पष्ट रेघ...
परळला असताना लहानपणी आई वडाची पूजा करायला देवळात जाताना मला बरोबर घेऊन जायची. आई नऊवारी साडी,नथ घालून साग्रसंगीत पुजेची तयारी करून निघायची ते चांगलंच आठवतंय. आईच्या मैत्रीणी तिथं तिला भेटायच्या त्यांची पुजा होईपर्यंत आम्ही मुलं देवळाच्या आवारात खेळत असू.
मी डोंबिवलीला आल्यावर आई-दादा पण डोंबिवलीत आले. इथं आल्यावर मात्र तिनं वडाची पूजा करायची थांबवली. वडाला नुस्त हळदीकुंकु वाहून यायची.
निसर्गाकडून काही तरी घ्यावं असं शिकवणार्या सणावारांकडे आपण शहरी जीवन जगणारे आपल्या सोयीप्रमाणे त्या सणवारांकडे बघू लागलो आहोत. तरी सुद्धा घरातल्या भिंतीवर बाहेरच्या बाजूला उगवलेल्या वडाचे झाड तोडताना त्याची कोवळी पानं मनाला सुखावून टाकतात.
म्हणूनच सरत्या ग्रीष्माला निरोप देणार्या आणि वर्षा ऋतूचं स्वागत करणार्या जेष्ठ महिन्यासाठी ना.धों.महानोरांच्या कवितेच्या ओळी म्हणाव्याशा वाटतात.
ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे।
जेष्ठ शुध्द प्रतिपदा
ता.२३.५.२०२०
ललिता छेडा
कधी कधी मे अखेरीस काही ठिकाणी गारांचा पाऊस देखील पडतो. मुंबईकरांनी मात्र वळीवाच्या सरी अनुभवल्या असल्या तरी गारांचा पाऊस मात्र त्यांना बघायला मिळत नाही.
माझ्या आठवणीत एकदा पुण्यात असताना अगदी दोन मिनिटांसाठी छोट्या छोट्या गारा पडल्या होत्या. पण फलटणमध्ये आत्याच्या घरी मात्र अचानक गारांचा पाऊस अनुभवायला मिळाला होता. हवेतला उष्मा इतका वाढला होता की आत्या म्हणालीसुध्दा" ललिते, आज तुला गारांचा पाऊस बघायला मिळणार बहूतेक! आणि खरंच अवघ्या अर्ध्या तासात घराच्या पत्र्यांवर तडतड आवाज येऊन गारा पडू लागल्या. त्या आभाळातून जमिनीवर जितक्या पटकन पडत होत्या तितक्याच पटकन वाटीत जमवेपर्यंत विरघळत होत्या. मला गारांचा पाऊस बघायला मिळाला म्हणून दादांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता आणि त्यांचा तो आनंद माझ्या अजूनही नजरेसमोर आहे.
जेष्ठ महिन्यातले दिवस मोठे असतात म्हणूनच बहूतेक ह्या महिन्याला ' जेष्ठ' म्हणत असावेत.
ह्या काळात शाळांना सुट्टी असल्यामुळे बहूतेकांचे प्रवासाचे बेत ठरलेले असतात. आम्हीपण मुलांना घेऊन उन्हाळ्यातल्या सुट्टीत खूप फिरलो आहोत. भटकंतीला कुठेही गेलं तरी काही ठिकाणं, काही जागांच सौंदर्य आगळंच असतं. कन्याकुमारी'चा सुर्यास्त असाच माझ्यासाठी अविस्मरणीय आहे.
ती उन्हाळ्यातली संध्याकाळ असल्यामुळे सहा वाजले तरी कन्याकुमारीच्या समुद्र किनाऱ्यावर अजून उन्हांचा पिवळा प्रकाश पसरलेला होता. तीन समुद्रांच्या संगमावर क्षितीजापर्यंत पसरलेल्या त्या किनाऱ्यावर आम्ही येऊन उभं राह्यलो. समोर आकाश आणि पाणी ह्या मधली निळ्या रंगाची किनार आता लालसर केशरी रंगाची उधळण झाल्यामुळे अस्पष्ट होऊ लागली होती. पिवळसर रंगाचा सूर्य त्या रंगात मिसळून पाण्यात अस्त होण्यासाठी हळूहळू खाली सरकत होता. एका बाजूला विवेकानंद राॅक मेमोरियलची विस्तीर्ण देखणी वास्तू आणि समोर दिसणारा सुर्यास्त! सूर्याच्या त्या समुद्रात अस्ताला जाताना दिसलेलं निसर्गाचं गुढ, अनाकलनीय रूप आणि समुद्रातच उभी असलेली मानव निर्मित विवेकानंद स्मारकाची प्रेरणादायी वास्तू बघून तिथं असलेले सर्वजण निशब्द होऊन गेले होते. अचानक आमच्या शेजारी उभे असलेले एकजण म्हणाले" मागे बघा, चंद्रोदय होतोय आणि चैत्री पौर्णिमेला तर सुर्य आणि चंद्र दोन्ही एकाचवेळी आकाशात दिसतात. आतादेखील जेष्ठी पौर्णिमा आलीच आहे ना! ते गृहस्थ विवेकानंद केंद्राचे काम करत असल्यामुळे इथं त्यांचं नेहमी येणं जाणं होतं. समोर किनाऱ्यावर लाटा परतून फिरताना एक गाज ऐकू येत होती. छायाप्रकाशाच्या खेळातली जपून ठेवलेल्या आनंदाच्या क्षणातली एक अविस्मरणीय संध्याकाळ होती ती!!
सर्व सणांची सुरवात होते ती जेष्ठातल्या वटपौर्णिमेपासून! श्रद्धा- अंधश्रद्धा ह्यातली रेषा अंधूक करणारा हा सण. योगायोगाने वसुंधरा दिनाच्या आजूबाजूलाच ही पौर्णिमा येते. पण अनेक स्रिया ह्या पुजेसाठी वडाच्या फांद्या तोडून घरी पूजा करतात. अनेकदा त्या तोडलेल्या फांदीला लालसर फळं सुध्दा असतात. पक्ष्यांची घरटी असणारं, सावली देणारं, पारंब्यांनी विस्तारलेलं देखणं वडाचं झाड नक्कीच पूजनीय आहे. पण ते पर्यावरणाच्या दृष्टीनं बघितलं तरच जाणवलं पाहिजे. जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी ह्या वृक्षाची पूजा करणं हे मलातरी पटत नाही. जन्मजन्माचं नातं जोडण्यापेक्षा मिळालेल्या जन्मात एकमेकांना मानानं वागवलं, इच्छा अपेक्षांचा आदर केला तर जास्त चांगलं होईल असं मला मनापासून वाटतं. त्यासाठी वटवृक्षासारखं मन मोठं व्हावं ह्यासाठी पूजा करणं निश्चितच संयुक्तिक ठरेल. पण पुन्हा एकदा श्रद्धा-अंधश्रध्देतली प्रत्येकाची अस्पष्ट रेघ...
परळला असताना लहानपणी आई वडाची पूजा करायला देवळात जाताना मला बरोबर घेऊन जायची. आई नऊवारी साडी,नथ घालून साग्रसंगीत पुजेची तयारी करून निघायची ते चांगलंच आठवतंय. आईच्या मैत्रीणी तिथं तिला भेटायच्या त्यांची पुजा होईपर्यंत आम्ही मुलं देवळाच्या आवारात खेळत असू.
मी डोंबिवलीला आल्यावर आई-दादा पण डोंबिवलीत आले. इथं आल्यावर मात्र तिनं वडाची पूजा करायची थांबवली. वडाला नुस्त हळदीकुंकु वाहून यायची.
निसर्गाकडून काही तरी घ्यावं असं शिकवणार्या सणावारांकडे आपण शहरी जीवन जगणारे आपल्या सोयीप्रमाणे त्या सणवारांकडे बघू लागलो आहोत. तरी सुद्धा घरातल्या भिंतीवर बाहेरच्या बाजूला उगवलेल्या वडाचे झाड तोडताना त्याची कोवळी पानं मनाला सुखावून टाकतात.
म्हणूनच सरत्या ग्रीष्माला निरोप देणार्या आणि वर्षा ऋतूचं स्वागत करणार्या जेष्ठ महिन्यासाठी ना.धों.महानोरांच्या कवितेच्या ओळी म्हणाव्याशा वाटतात.
ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे।
जेष्ठ शुध्द प्रतिपदा
ता.२३.५.२०२०
ललिता छेडा
