Saturday, May 23, 2020

जेष्ठातला मृद् गंध

 ‌   पहिल्या पावसाच्या सरीं नंतर दरवळतो तो मातीचा सुगंध! ज्येष्ठ महिन्याच्या म्हणजेच मे महिन्याच्या साधारणपणे शेवटच्या आठवड्यात ह्या पहिल्या पावसाच्या सरींनी तृप्त झालेली धरा कृतज्ञतेचा गंधित हुंकार देते.
कधी कधी मे अखेरीस काही ठिकाणी गारांचा पाऊस देखील पडतो. मुंबईकरांनी मात्र वळीवाच्या सरी अनुभवल्या असल्या तरी गारांचा पाऊस मात्र त्यांना बघायला मिळत नाही.
माझ्या आठवणीत एकदा पुण्यात असताना अगदी दोन मिनिटांसाठी छोट्या छोट्या गारा पडल्या होत्या. पण फलटणमध्ये आत्याच्या घरी मात्र अचानक गारांचा पाऊस अनुभवायला मिळाला होता. हवेतला उष्मा इतका वाढला होता की आत्या म्हणालीसुध्दा" ललिते, आज तुला गारांचा पाऊस बघायला मिळणार बहूतेक! आणि खरंच अवघ्या अर्ध्या तासात घराच्या पत्र्यांवर तडतड आवाज येऊन गारा पडू लागल्या. त्या आभाळातून जमिनीवर जितक्या पटकन पडत होत्या तितक्याच पटकन ‌वाटीत जमवेपर्यंत विरघळत होत्या. मला गारांचा‌ पाऊस बघायला मिळाला म्हणून दादांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता आणि त्यांचा तो आनंद माझ्या अजूनही नजरेसमोर आहे.
जेष्ठ महिन्यातले दिवस मोठे असतात म्हणूनच बहूतेक ह्या महिन्याला ' जेष्ठ' म्हणत असावेत.
ह्या काळात शाळांना सुट्टी असल्यामुळे बहूतेकांचे प्रवासाचे बेत ठरलेले असतात. आम्हीपण मुलांना घेऊन उन्हाळ्यातल्या सुट्टीत खूप फिरलो आहोत. भटकंतीला कुठेही गेलं तरी काही ठिकाणं, काही जागांच सौंदर्य आगळंच असतं. कन्याकुमारी'चा सुर्यास्त असाच माझ्यासाठी अविस्मरणीय आहे.
ती उन्हाळ्यातली संध्याकाळ असल्यामुळे सहा वाजले तरी कन्याकुमारीच्या समुद्र किनाऱ्यावर अजून उन्हांचा पिवळा प्रकाश पसरलेला होता. तीन समुद्रांच्या संगमावर क्षितीजापर्यंत पसरलेल्या त्या किनाऱ्यावर आम्ही येऊन उभं राह्यलो. समोर आकाश आणि पाणी ह्या मधली निळ्या रंगाची किनार आता लालसर केशरी रंगाची उधळण झाल्यामुळे अस्पष्ट होऊ लागली होती. पिवळसर रंगाचा सूर्य त्या रंगात मिसळून पाण्यात अस्त होण्यासाठी हळूहळू खाली सरकत होता. एका बाजूला विवेकानंद राॅक मेमोरियलची विस्तीर्ण देखणी वास्तू आणि समोर दिसणारा सुर्यास्त! सूर्याच्या त्या समुद्रात अस्ताला जाताना दिसलेलं निसर्गाचं गुढ, अनाकलनीय रूप आणि समुद्रातच उभी असलेली मानव निर्मित विवेकानंद स्मारकाची प्रेरणादायी वास्तू बघून तिथं असलेले सर्वजण निशब्द होऊन गेले होते. अचानक आमच्या शेजारी उभे असलेले एकजण म्हणाले" मागे बघा, चंद्रोदय होतोय आणि चैत्री पौर्णिमेला तर सुर्य आणि चंद्र दोन्ही एकाचवेळी आकाशात दिसतात. आतादेखील जेष्ठी पौर्णिमा आलीच आहे ना! ते गृहस्थ विवेकानंद केंद्राचे काम करत असल्यामुळे इथं त्यांचं नेहमी येणं जाणं होतं. समोर किनाऱ्यावर लाटा परतून फिरताना एक गाज ऐकू येत होती. छायाप्रकाशाच्या खेळातली जपून ठेवलेल्या आनंदाच्या क्षणातली एक अविस्मरणीय संध्याकाळ होती ती!!
सर्व सणांची सुरवात होते ती जेष्ठातल्या वटपौर्णिमेपासून! श्रद्धा- अंधश्रद्धा ह्यातली रेषा अंधूक करणारा हा सण. योगायोगाने वसुंधरा दिनाच्या आजूबाजूलाच ही पौर्णिमा येते. पण अनेक ‌स्रिया ह्या पुजेसाठी वडाच्या फांद्या तोडून घरी पूजा करतात. अनेकदा त्या तोडलेल्या फांदीला लालसर फळं सुध्दा असतात. पक्ष्यांची घरटी असणारं, सावली देणारं, पारंब्यांनी विस्तारलेलं देखणं वडाचं झाड नक्कीच पूजनीय आहे. पण ते पर्यावरणाच्या दृष्टीनं बघितलं तरच जाणवलं पाहिजे. जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी ह्या वृक्षाची पूजा करणं हे मलातरी पटत नाही. जन्मजन्माचं नातं जोडण्यापेक्षा मिळालेल्या जन्मात एकमेकांना मानानं वागवलं, इच्छा अपेक्षांचा आदर केला तर जास्त चांगलं होईल असं मला मनापासून वाटतं. त्यासाठी वटवृक्षासारखं मन मोठं व्हावं ह्यासाठी पूजा करणं निश्चितच संयुक्तिक ठरेल. पण पुन्हा एकदा श्रद्धा-अंधश्रध्देतली प्रत्येकाची अस्पष्ट रेघ...
परळला असताना लहानपणी आई वडाची पूजा करायला देवळात जाताना मला बरोबर घेऊन जायची. आई नऊवारी साडी,नथ घालून साग्रसंगीत पुजेची तयारी करून निघायची ते चांगलंच आठवतंय. आईच्या मैत्रीणी तिथं तिला भेटायच्या त्यांची पुजा‌ होईपर्यंत आम्ही मुलं देवळाच्या आवारात खेळत असू.
मी डोंबिवलीला आल्यावर आई-दादा पण डोंबिवलीत आले. इथं आल्यावर मात्र तिनं वडाची पूजा करायची थांबवली. वडाला नुस्त हळदीकुंकु वाहून यायची.
निसर्गाकडून काही तरी घ्यावं असं शिकवणार्‍या सणावारांकडे आपण शहरी जीवन जगणारे आपल्या सोयीप्रमाणे त्या सणवारांकडे बघू लागलो आहोत. तरी सुद्धा घरातल्या भिंतीवर बाहेरच्या बाजूला उगवलेल्या वडाचे झाड तोडताना त्याची कोवळी पानं मनाला सुखावून टाकतात.
म्हणूनच सरत्या ग्रीष्माला निरोप देणार्‍या आणि वर्षा ऋतूचं स्वागत करणार्‍या जेष्ठ महिन्यासाठी ना.धों.महानोरांच्या कवितेच्या ओळी म्हणाव्याशा वाटतात.
ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे।

                       जेष्ठ शुध्द प्रतिपदा

                         ता.२३.५.२०२० 
                          ललिता छेडा
        

Wednesday, May 6, 2020

।आरोग्यम् धनसंपदा।

वैशाख साधारणपणे एप्रिल महिन्यात येतो आणि ह्या महिन्यातला महत्त्वाचा दिवस म्हणजे ७ एप्रिलचा जागतिक आरोग्य दिन!
        आपण आणि आपल्या शरीराचा,मनाचा उत्तम संबंध म्हणजे निरामय 'आरोग्य' असं मला मनापासून वाटतं. कारण आजारपण येणं आणि त्यातुन बरं होऊन बाहेर पडणं ह्यासाठी आपलं शरीर आपल्याला माहीत असणं जितकं गरजेचं असतं तितकीचं मनात सकारात्मकता असणं पण आवश्यक असतं.मला झालेल्या वेगवेगळ्या  'आजारपणांच्या' अनुभवातून मी हे शिकलेय. आणि झालेल्या बहूतेक आजारांना  यशस्वीरीत्या मी परतवून लावलंय.हे महत्त्वाचं! 
        फक्त स्वभावामुळे शरीरात साखरेचा गोडवा असण्याचं प्रमाण मात्र जरासं असतं.
        लहानपणापासून माझी तब्येत तशी नाजूकच! आत्ता जे कस्तुरबा रुग्णालय कोरोनामुळे सर्वांना परिचित झालं आहे. तिथे मला साधारण तिसरी- चौथीत असताना घटसर्प झाल्यामुळे दाखल करावं लागलं होतं.जवळजवळ महिन्याभराच्या तिथल्या वास्तव्यात अनेक आठवणी मनात आहेत. माझ्या आईवडिलांनी घेतलेली काळजी,केलेली धावपळ अजुनही आठवतेय. तेव्हाही त्या रूग्णालयाची व्यवस्था, स्वच्छता, छान होती. आमचा लहान मुलांचा वाॅर्ड असल्यामुळे स्टाफ खूप चांगली काळजी घ्यायचा. शिफ्ट बदलली की थोडावेळ जायच्या आधी तिथल्या नर्स आमच्याशी गप्पा मारून, खेळून  जायच्या! खूप वर्ष झाली तरी  त्या आठवणी ताज्या आहेत. 
       मी डॉक्टरशी लग्न केल्यावर मैत्रीणी गमतीनं नेहमी म्हणतात" तू  तुझ्या आजारपणाला डाॅक्टरशी लग्न करून मस्त इलाज शोधलास!!
       माझ्या अनेक आजारांपैकी एक म्हणजे मला सोर्‍यासिससारखा स्कीनडिसीज झाला. आणि पायावर झालेल्या जखमा दिसायला आणि सहन करायला खूप कठिण झाल्या होत्या. पण त्यावेळी माझी नणंद हरकवंती धावत आली आणि जवळजवळ आठवडाभर दिवसांत तीन वेळा पाय स्वच्छ करून तिने त्या जखमा बऱ्या केल्या. माझ्या गुडघ्यांच्या ऑपरेशन नंतर इंदू,लता, राजश्री आणि जयश्री ह्यांनी दवाखान्यातल्या वेळा वाटून घेतल्या होत्या. अशी अनेक नावं सांगता येतील ज्यांच्या मदतीमुळे मी सर्व आजारपणांना अक्षरशः पळवून लावलं. त्यात घरच्यांची मदत तर असायचीच.
       पण आता संपूर्ण जगाला  हादरवून सोडणाऱ्या ह्या कोरोनाच्या साथीनं मात्र सर्वांना हतबल करून टाकलं आहे.युरोपसारखा निसर्गरम्य देश, अमेरिकेसारखा बलाढ्य,प्रगत देश सर्वांनी ह्या आजारापुढे हात टेकलेत. जीवितहानीचे आंकडे तर ऐकवत नाहीत.
        'लाॅकडाउन'हा शब्द पूर्वी कधी ऐकला सुध्दा नव्हता. तो शब्द आज जगण्याच्या एक महत्त्वाचा भाग बनून गेला आहे.पैसा, प्रतिष्ठा हे सगळं निरर्थक ठरलं आहे. प्रत्येकजण स्वत:च्या जगण्यासाठी धडपड करतोय. त्यामुळेच एकमेकांना भेटतानासुध्दा मोकळेपणाने न भेटता तोंडावर पट्टी लावून बोलावं लागतंय. 
         एका छोट्याशा व्हायरसनी आपलं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलंय. मनात येत की पृथ्वी टाहो फोडून काहीतरी सांगत होती पण पुढे,पुढे जायच्या नादात आपल्याला तिचा आवाज ऐकूच आला नाही. आणि म्हणूनच तिनं बहूतेक संपूर्ण जग थांबवलं. तिनं दाखवून दिलं की खरा धर्म हा निसर्गाचे नियम पाळणं हाच आहे. कारण अवघ्या दोन महिन्यांत गंगा,यमुनेसारख्या सर्व नद्यांचं पाणी स्वच्छ झालं. आकाश निरभ्र दिसायला लागलं. हवेतलं प्रदुषण नियंत्रित झालं.
         गरजा इतक्या कमी झाल्या की घरात बसून कुटुंबातला हरवलेला संवाद  सापडला. खऱ्या-खोट्या नातेसंबंधांची ओळख झाली.  स्वत:च्याच घराकडे नोकरी,व्यवसाय,अशा अनेक कारणांमुळे झालेलं दुर्लक्ष नुसतं लक्षात नाही आलं. तर फक्त गरजेपुरती स्वच्छता आणि जेवण, झोपण्यासाठी घराकडे बघणारे आपण त्या घराला सुंदर कराण्यासाठी प्रयत्न करु लागलो. घरकाम, स्वैपाक करणार्‍या बायकांना आपण गृहीत धरून चाललो होतो ती आपली केवढी मोठी सपोर्ट सिस्टीम आहे ते कळलं!आणि हे सगळं अनपेक्षित आलेल्या आरोग्यावरच्या संकटाला घाबरल्यावर कळलं,हे सुध्दा विचार करावा असंच आहे नाही का?  
         कोरोनाग्रस्त आणि कोरोनामुक्त हे दोन्ही शब्द आपल्या सर्वांना शारीरिक, मानसिक, आर्थिकसुध्दा प्रचंड घाबरवणारे ठरलेत. कुठेतरी आपली चुकलेली जीवनशैली, रहाणीमानातला हरवलेला साधेपणा आपल्या स्वत:ला जाणवतोय! आजुबाजुच्या माणसांबरोबर निसर्गाकडे पण सजग दृष्टीने बघायला शिकल पाहिजे हे हा 'आजार' शिकवून जातोय. मजुरांची घराकडे जाण्याची ओढ, काही शेतकऱ्यांच्या मालाला न मिळणारी बाजारपेठ तर कुठे तरी होणारा काळाबाजार! प्रत्येक गोष्ट स्वत:च्या जगण्याचा शोध घ्यायला शिकवतेय. 
         पुन्हा एकदा सर्व संपवून आपण नव्यानं आयुष्याची सुरुवात करु तेव्हा मोठेपणाच्या भ्रामक कल्पनांसाठी धावणाऱ्या आपली ' जाणीवपूर्वक जगण्याची रेषा' मोठी व्हायला हवी. पुढच्या अनेक वर्षांसाठी हे अनुभव  थोडं थांबून जगायला शिकवणारे व्हायला पाहिजेत.
         तेव्हा सध्या तरी थांबलेली जगरहाट सुरू व्हायला कवींनी म्हटल्याप्रमाणे,
         "बाहर की हवा है कातिल युं ही।
         कातिल से उलझने की जरूरत क्या है।
         घरी रहा,स्वस्थ रहा कारण निरोगी आरोग्य हेच खरं धन आहे.
               वैशाख पौर्णिमा
               ता. ७ मे २०२०
                   ललिता छेडा