Wednesday, April 8, 2020

स्वत:ला शोधताना..


      मराठी महिन्यांवर ब्लाॅग लिहील्यावर तो महिना साधारणपणे ज्या इंग्रजी महिन्यात येतो त्या महिन्यातल्या खास दिवसावर लिहायचं ठरवतेय. चैत्र साधारणपणे 'मार्च' महिन्यात येतो. आणि मार्च म्हणजे महिला दिन! म्हणूनच स्री म्हणून आपल्याला मिळालेल्या संधींचा आपण कितपत स्वत:साठी उपयोग करून घेतला ह्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करायचं ठरवलं.
    माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे ८ मार्च,कारण लग्नानंतर  वर्षभरानी ह्याच तारखेला माझ्या लेकीचा 'निलमचा' जन्म झाला.त्यानंतर तीन वर्षांनी मुलाचा ' किरणचा' जन्म झाला.मुलांच्या जन्मानंतर खर्‍याखुर्‍या अर्थाने संसाराची सुरुवात होते. मग तो प्रेमविवाह असो की ठरवून केलेला विवाह असो, संसारातील तडजोडींना सामोरं जावंच लागतं. मला नेहमीच मुलं, घर सांभाळून काही तरी करावं असं सतत वाटत असल्यामुळे बाटिक प्रिंटींग,योगशिक्षक, ब्युटीपार्लर असे वेगवेगळे डिप्लोमा केले.गंमत म्हणजे पदवीची शेवटची परीक्षा मात्र आजतागायत देता आली नाही.
    घरातल्या घरात पार्लर चालवायला सुरुवात केली.पण स्वत:च्या बिल्डींगमध्ये स्वत:च्या घरात रहायला गेल्यावर  पार्लर बंद करावं लागलं.खरं म्हणजे पार्लर सुरू करून दोन वर्षे झाली होती आणि चांगलं चालतही होतं. छोट्या मोठ्या आॅर्डर येत होत्या पण कधी कधी आपण स्रिया भावनिक होऊन घरासाठी, मुलांसाठी निर्णय घेतो, तसं काहीसं माझं झालं होतं.आता मागे वळून बघताना वाटत तेव्हा जिद्दीनं पार्लर सुरू ठेवलं असतं तर कदाचित आयुष्य काही वेगळ्या वाटेनं गेलं असतं.
    व्यवसाय सुरू झाला नाही पण एक वेगळीच संधी मिळाली.
     रामनगरमध्येच रहाणाऱ्या भारती मोरे आणि वैशाली ओक‌ एक दिवस अचानक माझ्या घरी आल्या. वैशालीच्या चैतन्य ज्ञानदीप मंडळातर्फे पत्रकारिता वर्ग घेण्यात येणार होते आणि त्या वर्गाला मी यावं असा आग्रह त्या दोघीही करत होत्या. वर्गाच्या शेवटी लेखी परीक्षा घेतली जाणार होती आणि मला तेच नकोसं वाटत होतं. मग वैशालीनी " तू परीक्षेला बसू नकोस" असा पर्याय दिला. त्या अटीवर मी वर्गाला यायला तयार झाले.पण त्या वर्गाचे प्रमुख असलेल्या मा.बेटावदकर सरांनी इतकं छान शिकवलं की मी सहज परीक्षा दिली आणि पहिला वर्ग पण मिळवला.
     त्याच वर्गात रोज डोंबिवली पूर्वेला ज्ञानदीप मंडळं सुरू करायच्या चर्चा व्हायच्या! कारण पश्र्चिमेला ज्ञानदीपचं कार्य जोरात सुरू झालं होतं. भारती मोरे पुर्वेला ज्ञानदीपचं कार्य सुरू व्हावं ह्यासाठी मनापासून खूप प्रयत्न करत होती.अशाच एका मंडळाच्या स्थापनेसाठी स्मिता तळेकरकडे मिटींग ठरत होती. २७ सप्टेंबर १९८५ 'अनंत चतुर्दशीच्या' दिवशी ही मिटींग ठरली होती. स्मिता आणि भारतीनी मला आवर्जून आमंत्रण दिलं होतं. मीपण अगदी सहज उत्सुकतेपोटी तिथं जायचं ठरवलं.मिटींगमध्ये मंडळाचं नांव"उन्मेष" ठरलं! स्मिता मंडळाची अध्यक्ष असणार हे नक्कीच होतं. पण ऐनवेळी तिनं अध्यक्ष नाही होणार पण मंडळाची सक्रीय सभासद होऊन सगळ्याप्रकारची मदत करेन असं ठामपणे सांगितलं.त्यामुळे हजर असलेल्यांमध्ये 'तू हो अध्यक्ष' असं ऐकमेकांमध्ये अडम-तडम सुरू झालं. आणि‌ अगदी अनपेक्षितपणे अध्यक्षपदाची माळ माझ्या गळ्यात पडली. ह्यामध्ये भारतीने मी अध्यक्ष व्हावे अशी आग्रही भूमिका घेतली होती.
मी तिचे ह्या निमित्ताने नक्कीच आभार मानेन.कारण जो काही संस्थेत काम करण्याचा अनुभव, सामाजिक भान मला आलं आहे त्याच श्रेय नक्कीच ज्ञानदीपला जातं. भारतीनेही काम करतानाची शिस्त, कार्यक्रमाचं आयोजन हे सर्व वेळोवेळी शिकवलं. त्याशिवाय उमा आवटेपुजारी, विद्या राळे, मंदा खापरेंसारख्या असंख्य मैत्रिणी, आबासाहेब पटवारींसारखे अनेक मार्गदर्शक ' उन्मेष' च काम करताना मला लाभले.आणि  माझ्या मनातली पार्लर न काढल्याची खंत हे काम सुरू झाल्यावर निवळून गेली.अत्यंत महत्त्वाचा उल्लेख केलाच पाहिजे तो म्हणजे आकाशानंद! ज्ञानदीपच्या कार्यकर्त्यांच प्रेरणास्थान! मला देखील त्यांचे आशीर्वाद कायमच मिळाले. जे मला नेहमीच प्रेरणादायी ठरले. आणि माझं उन्मेष ज्ञानदीप मंडळ! ज्याच्या पहिल्या वर्षापासून आज ३५ वर्ष माझ्या सोबत असणार्‍या सर्वजणी सभासद न रहाता आमचं एक कुटुंब झालं आहे.
      ज्योतीनं ज्योत प्रगटवावी तशी डोंबिवली पूर्वेला एकंदर १८ ज्ञानदीप मंडळं स्थापली गेली.  भारतीच्या अथक प्रयत्नानं ती सर्व मंडळं एकत्र येऊन अश्र्विनी ज्ञानदीप संघ स्थापला गेला. आम्ही सर्वजण भारावल्यासारखे संघटितपणे काम करत होतो. स्वतंत्र आपआपल्या मंडळांच आणि अश्र्विनी संघाचं असं काम सुरू होतं.
      ज्ञानदीपमुळे मला अगदी जवळच्या दोन मैत्रिणी मिळाल्या.. वैशाली ओक आणि मीना गोडखिंडी! मी थोडी उंच आणि त्या दोघी बुटक्या त्यामुळे आम्हा तिघींना 'एक शुन्य शुन्य' असं गंमतशीर नांव‌ पडलं होतं. मी १९९० ते१९९५ अशी पाच वर्षे अश्र्विनीची अध्यक्ष होते. ह्या काळात आम्ही तिघी सतत बरोबर असायचो. वैशाली आणि मीना तशा वेगवेगळ्या स्वभावाच्या त्यामुळे माझ्या कामाचा खूप छान बॅलन्स व्हायचा.मीनाचं प्रत्येक काम वेळेत,शिस्तीत व्हावं ह्यासाठी आग्रही असणं आणि वैशालीचं काम हातात घेतलयं ना मग ते होईल ती वेळ आपली अशी वृत्ती! आम्हा तिघींना एकत्रित काम करायला मजा यायची. त्यामुळेच आम्ही ज्योती पाटकर,इंदू देढिया आणि जयश्री करमरकर‌ ह्या तिघींना आमच्या बरोबर घेऊन 'माध्यम' ही संस्था स्थापन केली.संस्थेच्या माध्यमातून घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या  वस्तुंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रदर्शनं भरवण्याचं ठरलं.जवळजवळ तीन‌ वर्ष आम्ही प्रदर्शनांच्या आयोजनाच्या निमित्ताने खूप मजा केली.आम्हा तिघींमध्ये अनेकदा रागवारागवी व्हायची,इतर मैत्रीणींशी मतभेद व्हायचे पण ते सगळं तेवढ्यापुरतं असायचं.पण अचानक दृष्ट लागल्यासारखी वैशाली आम्हाला सोडून गेली.तिच्यानंतर गेल्या वर्षी ज्योतिचं पण दु:खद निधन झालं. ह्या दोघीही आठवणीतून मनात सतत आहेत.
      ज्ञानदीप,माध्यम ह्या सर्व कामातून डोंबिवलीत खूप ओळखी झाल्या होत्या.त्यामुळेच डोंबिवलीत महिला बॅंक सुरू व्हावी ह्या परवानगीसाठी धडपडणाऱ्या मंगलाताई कुलकर्णीशी भेट झाली आणि त्याशिवाय आबासाहेबांनी महिला बॅंकेच्या परवानगीच्या प्रपोजलवर सह्या करणार्‍या दहाजणींमध्ये माझी सही घेतली होतीच. बारा वर्षांच्या परिश्रमातून १९९२मध्ये डोंबिवलीत महिला बॅंकेला परवानगी मिळाली.आणि मी ह्या बॅंकेची संचालक व्हावं असं मला सुचवलं गेलं.  मी अर्थात नाही म्हटलं होतं पण खूप आग्रह झाला आणि ‌२९मे १९९२ रोजी सुवर्ण मंगल महिला सहकारी बँकेच्या पहिल्या संचालक मंडळात माझं नाव लिहीलं गेलं. त्यावेळी नेहमी मनात यायचं ज्ञानदीपसारख्या दूरदर्शनशी संलग्न असलेल्या कामातून मला आवडणार्‍या अभिनय, लेखन ह्याची कधीच संधी मिळाली नाही आणि गणितासारख्या माझ्या नावडत्या विषयाशी संबंधित असलेल्या बॅंकेच्या संचालकपदावर काम करावं म्हणून आग्रह होत होता.
       बॅंकेत अठरा वर्षे संचालक,अध्यक्ष,उपाध्यक्ष अशा वेगवेगळ्या पदांवर काम करत असताना चांगले-वाईट खूप अनुभव आले. ज्ञानदीपचं काम करताना समाजासाठी काहीतरी करण्याचा आनंद मिळत होता.
        बॅंक मात्र एका राजकीय पक्षाच्या अधिपत्याखाली असल्यामुळे समाजकारणा इतकंच राजकारणपण बर्‍यापैकी अनुभवायला मिळालं. बॅंकेत काम करताना  जयश्री कर्वे आणि सुनिती रायकर अशा दोन  मैत्रिणी मिळाल्या. आर्थिक काम असुनही सगळ्या सहकारी संचालिका अतिशय प्रामाणिकपणे काम करणाऱ्या होत्या ही खूप महत्त्वाची आणि आनंददायी गोष्ट होती. त्याकाळात जवळच्या मैत्रिणी म्हणून सुनिती आणि जयश्रीशी प्रत्येक गोष्ट शेअर करायची सवय लागली. जी अजूनही तशीच आहे.
      बॅंकेच्या कामामुळे ग्लॅमर मिळालं, मोठ्या मोठ्या व्यक्तिचं कार्य जवळून बघायला मिळालं. त्याचबरोबर माणसातल्या वागण्यातला स्वार्थ,इर्षा जवळून अनुभवता आली. असे अनुभव आपल्याला नक्कीच प्रगल्भ करतात. बॅंकेत केलेल्या कामामुळे माझ्या स्वभावात कमालीचा पेशन्स आला. निर्णय घेताना, बोलताना विचार करून बोलायची सवय लागली.
   २०१० मध्ये परिस्थितीला शरण जाऊन बॅंक दुसऱ्या बॅंकेत विलीन करावी लागली. मला स्वत:ला हा माझा वैयक्तिक पराभव व्हावा इतकं दु:ख झालं.
       त्यानंतर मात्र  कोणत्याही संस्थेत, पदांवर अजिबात काम करणार नाही असा स्वत:शीच निर्णय घेतला. पण देवाच्या मनात काही तरी वेगळंच होतं. संस्था,पद काहीही नसलेल्या पै सरांच्या  कट्ट्यावर मी काम करावं अशी पै सरांनी इच्छा व्यक्त केली. आणि काम आवडतं असल्यानं आणि माझ्या मनातल्या अटींमध्ये बसणारं असल्यानं मी ती जबाबदारी घेतलीय. पुन्हा एकदा वेगळ्या संधींचा आनंद मिळतोय.
      बॅंक विलीन झाल्यावर अगदी सहज कथा लेखनाच्या स्पर्धेत भाग घेतला आणि पहिलं बक्षीस मिळालं. त्यानंतर वर्षभर आठवड्याला एक अशा ५२ कथा ब्लाॅगच्या माध्यमातून लिहील्या. ज्याचं ग्रंथालीनं पुस्तक प्रकाशित केलं. ह्या पुस्तकानी मात्र अनेकांनी मिळवून दिला असला तरी  जो आनंद मिळाला तो माझ्या एकटीचा होता. आणि आयुष्याच्या संध्याकाळी तो मिळाला म्हणून कृतकृत्य ही वाटतंय!
    महिला दिनानिमित्ताने स्वत:ला शोधताना स्वत:मधले सकारात्मक बदल नक्कीच जाणवले. श्रेयासाठी धडपड करण्यापेक्षा 'स्वान्त सुखाय' काम करत रहावे.मिळालेल्या संधींचा मनापासून काम करून आनंद मिळवावा.कारण काय,किती आणि केव्हा मिळणार हे आपल्यासाठी कोणीतरी ठरवून ठेवलंय.जे आपल्याला फक्त आनंदाने स्वीकारायचं आहे हे आता कळलंय!
      आयुष्याला जर संगीताची उपमा दिली तर संगीतातल्या सात सुरांसारखं सुंदर,मधुर मनात साठवून ठेवावं असं वाटतंय. कारण  रागांमध्ये जसे काही सुर वर्ज्य असतात.तशीच आता आयुष्याची भैरवी  वर्ज्य सुर विसरून मधुर आठवणींच्या सुरात गाता यावी हीच परमेश्वराजवळ प्रार्थना!
                 चैत्र पौर्णिमा
                 ८ एप्रिल २०२०
                           ललिता छेडा 

9 comments:

  1. Well written, covering a large span of your energetic life. Connecting, relating and sensitively maintaining friends.

    ReplyDelete
  2. Well written, covering a large span of your energetic life. Connecting, relating and sensitively maintaining friends. -- CA Jayshree Karve

    ReplyDelete
  3. या लेखामुळे तुमच्या आयुष्यात जे अनुभव आले ते आमच्या पर्यंत पोहोचले. परंतु जिद् ,चिकाटी या गुणांमुळे तुम्ही यशस्वी ठरल्या. छान वाटले वाचून.

    ReplyDelete
  4. Chhan lihile ahes.aple aausshya sankshiptpane jasechya tase lihile ahes.pan niropachi bhasha ka?

    ReplyDelete
  5. उत्तम नेतृत्व आणि माणस जोडायची कला तुमच्यात आहे 🙏

    ReplyDelete
  6. Chan lihites .Ata. atmacharitra lihayla harkat nahi tula.Besr luck.

    ReplyDelete
  7. अप्रतिम. फार सुंदर लिखाण आहे

    ReplyDelete
  8. सर्वांचे खूप खूप आभार

    ReplyDelete
  9. सुंदर आवडलं
    मला पण लिखाणाचा प्रयत्न करावासा वाटतो आहे

    ReplyDelete