गाईड सिनेमा प्रदर्शित झाला ६ फेब्रुवारी १९६५ ह्या वर्षी! त्यावेळी माझं वय होतं चौदा वर्षांचं! प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांनी आम्ही बहिणींनी कोहिनूर टाॅकीजला तो पाहिला. सिनेमा तितकासा कळला नाही पण कुठेतरी वहिदाचे डान्स कितीतरी दिवस मनात रुंजी घालत होते. त्यात सुध्दा मला आठवत राहिलं ते सपेर्यांच्या वस्तीवर वहिदाजींनी केलेलं नाग नृत्य! मला आठवतंय त्यावेळी मी ज्याला त्याला त्या नृत्याबद्दलच सांगत होते.
कुठेतरी आपली कला आणि त्या कलेवरचं प्रेम नाचातल्या विविध मुद्रांनी सांगणारी रोझी आणि ती साकारणारी वहिदा....मनावर गारूड करून गेली! ते गारूड अजूनही तितकंच आणि तेवढंच आहे.त्यानंतर काॅलेजला गेल्यावर मॅटिनीला गाईड वेगवेगळ्या गृप बरोबर अनेकदा बघितला. प्रत्येक वेळी तो नव्यानं उलगडत होता.
ह्या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे वहिदाजींच्या प्रत्येक नृत्यातूनच हा सिनेमा पूढे जात रहातो.आणि प्रत्येक नृत्यातून रोझी आपल्याला कळत जाते.
"आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है.... हे शब्द शैलेंद्रजीना विजय आनंद नी सिच्युएशन सांगितल्या बरोबर सुचले आहेत असं म्हणतात. अगदी कमी शब्दात रोझीची मनस्थिती सांगणारं हे गाणं आणि त्या गाण्याच्या सुरांशी जुळलेल्या अनेक स्त्रीयांची बंधमुक्तता...अत्यानंदानं चितोडच्या विजयस्तंभावर बेभान नाचणारी रोझी..शुटींग करणं नक्कीच कठीण होतं पण ते साहस मुक्त स्त्रीमध्येच येवू शकतं. अशी प्रत्येकीच्या मनातली मनमुक्ता रोझी.....
ह्या सिनेमाची कथा फ्लॅशबॅकनी उलगडते. "स्वामी" म्हणून जगणार्या राजू गाईडचा भूतकाळ उलगडतो तो रोझी आणि राजूची आई तो सुटणार म्हणून जेलमध्ये त्याला घ्यायला एकत्र आल्या असताना त्याची आठ दिवस आधीच सुटका झाली असं त्यांना कळतं आणि रोझी राजूच्या आईला आपली कहाणी सांगते आणि कथा उलगडत जाते.त्या दोघींच्या संवादात रोझी " राजू वरच्या प्रेमासाठी मी कोर्टात खोटं का बोलले नाही? असं स्वतःला विचारते.हा प्रश्न अनेकदा माझ्याही मनात आला आणि अनेकांनी त्यावर लिहिलेलंही वाचलंय. पण मनाला जास्त भावते,पटते प्रामाणिक रोझी....
रोझी कडे पत्नीपेक्षा भोग्य वस्तू म्हणून पहाणाऱ्या मार्कोनी तिच्या सहजीवनाचा आनंद हिरावून घेतलाय. आणि त्यामुळेच रोझी मार्कोला गुंफेत भेटायला जाऊन जे काही ऐकवते तो संपूर्ण संवाद अनेक स्त्रीयांसाठी त्यांच्या मनातले विचार आहेत. ती मार्कोला म्हणते" लग्न करून आईचं घर सोडताना वाटलं की पतिच्या घरी जाईन पण माहित नव्हतं की तिथं घरपण नसेल आणि पतिपण नसेल! ती ओरडून सांगते " मार्को मैं जीना चाहती हूं।
नवऱ्यानं केलेल्या अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवणारी रोझी...
त्यानंतर बेसहारा, असहाय्य होऊन ती राजू कडे येते. राजूनी दिलेल्या प्रतिसादानंतर ती त्याच्या बरोबर रहायला तयार होते. आणि म्हणूनच "तेरे मेरे सपने" हे गाणं संपूर्ण सिनेमा व्यापून रहातं आणि लक्षात रहाते त्या शब्दांवर आयुष्य उधळणारी रोझी....
त्यांच लग्नाशिवाय रहाणं त्याकाळी जरी स्वीकार करणं कठीण होतं तरी सगळ्या जगाच्या विरुद्ध जाऊन राजू रोझीला"नलिनी" ह्या नावानं प्रसिद्ध नर्तकी बनवतो. राजूच्या प्रेमात आकंठ बुडालेली रोझी....
प्रेमात संपूर्ण समर्पित होऊन " पिया तोसे नैना लागी रे" म्हणत ती सर्वांना मोहवून टाकते. आपल्या प्रियकराच्या प्रेमातल्या प्रत्येकीच्या मनात ते गाणं आपलं म्हणून रूंजी घालायला लावणारी रोझी....
सगळी दुखः विसरून नव्यानं जगताना "बदले दुनिया सारी तुम ना बदलना"" असं म्हणत गाणारी रोझी....
खरं म्हणजे नवर्यापूढे हतबल झालेली ती राजूला मनापासून प्रतिसाद देते. तोही तिला पैसा-प्रसिध्दी मिळवून देतो. पण तोच पैसा पुन्हा एकदा त्यांच्या सहजीवनाचा आनंद हिरावून घेतो. आणि पुन्हा एकदा ती फसवली जाते. एका प्रतिभावान स्त्रीचा आक्रोश म्हणजे " सैंया बेइमान"
बॅक टू बॅक एकाच रागातील दोन गाणी!! "क्या से क्या हो गया... ह्या गाण्यातला मागचा कोरस म्हणजे जणू रोझीचा आक्रोशच असावा असं वाटत रहातं. फसवणूक झालेल्या प्रत्येकाची रोझी....
आणि मग शेवटच्या अर्ध्या तासात सिनेमात जे घडत ते प्रत्येकाचा स्वतंत्र घेण्याचा अनुभव असतो. राजूचा अध:पतनापासून उन्नतीकडे जाण्याचा प्रवास सांगणारी त्याची स्वगतं! सिनेमा आध्यात्मिक उंचीवर नेऊन ठेवण्यात त्या स्वगतांचे लेखन करणारे दिग्दर्शक विजय आनंद यशस्वी झाले आहेत.
पण तितकीच लक्षात रहाते राजूला भेटण्यासाठी वाळवंटातून, उन्हात दागिने काढत चालणारी विरक्त रोझी....
मला माहित आहे गाईड सिनेमा हा फक्त रोझीचा नाही तर राजूचा देखील आहे.आणि महत्त्वाचं म्हणजे दिग्दर्शक, पटकथाकार विजय आनंद ह्यांचा आहे, संगीतकार सचिन देव बर्मन ह्यांचा आहे, गीतकार शैलेंद्र ह्यांचा आहे, कॅमेरामन, कोरिओग्राफर ह्या प्रत्येकाचा आहे. देव आनंद, वहिदाचा तर आहेच आहे. त्यामुळे "गाइड" ह्या मास्टरपीस बद्दल लिहीण्याचं साहस मी केलंच नाही....
फक्त आजूबाजूला दिसणाऱ्या रोझींसाठी ह्या कॅरेक्टरच्या माध्यमातून जाणवलेलं लिहीण्याचा हा प्रयत्न केला!
प्रत्येकीच्या जगण्यातली रोझी.....
माघ पौर्णिमा
ललिता छेडा.