Tuesday, December 29, 2020

नवे वर्ष, नवे संकल्प...

         सगळ्या जगाच्या जगण्यात बदल करून अनेक प्रश्न निर्माण करून २०२० हे वर्ष संपेल. त्याबरोबर एक दशक ही संपेल. कोणत्याही क्षणाला, दिवसाला अगदी वर्षाला सुध्दा लांबी रुंदी मिळते ती त्यावेळी आलेल्या अनुभवांच्या आधारावर!! आणि सरत्या वर्षाने कुठुनतरी निर्माण झालेल्या सुक्ष्म जीवाणूंनी निसर्गाचे अफाट सामर्थ्य आणि अहंकारी माणसाला आपल्या क्षुद्रपणाची जाणीव करून दिली आहे. 

       कितीतरी आपल्या जवळचे, नात्यातले, नामवंत चेहरे आपल्या आठवणीत राहून आयुष्यातुन‌ वजा झाले आहेत. ह्या वर्षात आपण शिकलो की पैशांनी हवं ते विकत घेता येत पण आॅक्सिजन विकत घेता येत नाही आणि साधं सोपं सरळ आयुष्य जगणंच खरं जगणं आहे. सगळ्या अडथळ्यांच्या शर्यतीतून आपण ह्या अवघड वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात आलो आहे आणि ३१डिसेंबरच्या रात्री नंतर उगवणार्‍या आशेच्या सोनेरी सकाळची आपण आतुरतेने वाट पहात आहोत.

       ३१ डिसेंबरची रात्र नेहमीच उद्या सकाळी नवं वर्ष नवा संकल्प! अशा विचारात जाते. डायटिंगसाठी आवडते आणि वजन वाढवणारे पदार्थ सोडायचे, सकाळी चालायला जायचं, डायरी लिहायला सुरुवात करायची, घरातली कामं वेळच्या वेळी रोज करायची असे अनेक संकल्प जे कमीत कमी दोन दिवस आणि जास्तीतजास्त एक महिना चालू शकतात. ह्या वर्षी मात्र सर्वसाधारण पूर्ण-अपूर्ण संकल्पांचे संदर्भच बदलून गेले आहेत.

      रोजच्या धावपळीच्या जीवनात कोरोनामुळे अचानक थांबावं लागलं आणि त्या काळात जाणवलं की आपलं स्वतःसाठी जगणं राहूनच गेलं आहे!! 

      त्यासाठीच नवीन वर्षाच्या सुरुवातीला संकल्प करूया की स्पर्धेच्या युगात आपण आपले छंद, आवड ह्याकडे ही लक्ष देऊया.

      अचानक घरकाम करणाऱ्या महिला कामाला यायच्या बंद झाल्या आणि घरातली कामं वाटून घ्यावी लागली. आता मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीला मुलगा मुलगी असा भेद न करता प्रत्येकानं घरकाम, स्वैपाक शिकून घ्यायचा संकल्प करायलाच हवा.

       ह्या काळात एकटे रहाणारे जेष्ठ नागरिक, आजारी मंडळी ‌ह्यांना मदतीची खूप गरज भासली. ह्या वर्षात आपण अशा गरजूंना लागणारी मदत करून माणूसकीची नाती जोडणं शक्य आहे. व्यावहारिक संबंधांपलिकडे जाऊन अशी मदत केली तर आपल्या मनाला भावनिक आनंद नक्कीच मिळेल. शेवटी असे नातेसंबंध आपल्या जगण्यावरचा विश्वास दृढ करतात. तेव्हा अनोळखी असले तरी गरजू लोकांना मदत हा संकल्प नवीन वर्षासाठी होऊ शकतो.

      कोरोनाच्या काळात नोकरी करणं हे सर्वात सुरक्षित असं जे समजलं जातं होतं ह्या संकल्पनेला छेद मिळाला आणि अनेक घरगुती व्यवसाय सुरू झाले. आमच्या गल्लीत दोन इंजिनिअर मुलं सकाळच्या वेळ ताजी फळं, भाज्या विकताना दिसली. आपली आवड जाणून घेऊन एखाद्या व्यवसायाचं ज्ञान घेण्याचा संकल्प करायला काहीच हरकत नाही.

      सर्वात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी करायचा संकल्प! जगण्यासाठी आवश्यक असलेला प्राणवायू म्हणजे झाड, वृक्ष आहे. ज्यांचा भरमसाठ नाश आपण केला आहे. तेव्हा सर्वांनी वृक्षारोपणाचा संकल्प करायला हवाय.‌ कारण ह्या कमी प्रदुषण काळात सर्वांनीच पृथ्वीचे प्रेमगीत अनुभवलय. स्वच्छ नद्याचं वाहणं, प्रदुषणमुक्त हवेमुळे शहरांतून दिसणारी हिमशिखरे हे सर्व नक्कीच आनंददायी होत. तेव्हा कचर्‍याची योग्य व्यवस्था, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचे नियम पाळणे, एखादं तरी झाड लावायचं, ह्या अगदी साध्यासुध्या संकल्पांमुळे स्वतः आणि समाज म्हणून आपली जबाबदारी निश्चित पार पाडता येईल.

       अनेक प्रकारांनी मी ३१ डिसेंबर साजरा केला आहे. मोठ्या हाॅटेलातल्या पार्ट्या बघितल्या आहेत. घरी मित्र-मैत्रिणींना बोलावून खूप धमाल केली आहे. पण ‌ह्यावेळी मात्र कुठे तरी आयुष्यातली असुरक्षितता व्याकूळ करून जातेय. ह्या असुरक्षिततेची लढाई आपल्या सर्वांना द्यायची आहे. एकत्रित येऊन द्यायची आहे. तेव्हाच २०२१ ची सकाळ सोनेरी होईल आणि ‌नव्या वर्षाचं स्वागत नव्या संकल्पानी करता येईल.


                             मार्गशीर्ष पौर्णिमा

                            ता. २९.१२.२०२०

                               ललिता छेडा


       

       




     

Tuesday, December 15, 2020

कृतज्ञ मार्गशीर्ष

      'मासानां मार्गशीर्षोऽहम्' असं म्हटलं जाणाऱ्या ह्या महिन्यांपासून हेमंत ऋतूची सुरुवात होते. ह्या महिन्यात जरी कोणतेही सण नसले तरी दत्त जयंती ह्याच महिन्यातल्या पौर्णिमेला असते. मी स्वत: दत्तभक्त असल्यामुळे माझ्यासाठी हा महिना भक्तीचा आहे. मार्गशीर्ष महिना डिसेंबर महिन्यात येत असतो त्यामुळे वर्षभर घडलेल्या चांगल्या घटनांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीही हा महिना योग्य आहे असं मला मनापासून वाटतं. 

       त्यात ह्या वर्षी तर सगळेच महिने प्रत्येकासाठी परीक्षेचे गेले. एका जीवघेण्या आजारानं संपूर्ण जगाला हादरवून टाकलं. पण सगळ्या अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणारे 'कोविडयोध्दे' सरळ सरळ त्या महामारीशी जाऊन भिडले. त्या सर्वांनी अतिशय समर्पित भावनेने काम केले. म्हणूनच वर्षाच्या शेवटच्या दिवसात त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणं आवश्यक वाटतंय.

       माझ्यासाठी ह्या वर्षी घर बदलणं, लेकीच्या घरी रहायला जावं लागणं हे अचानक बदल घडले आणि घर म्हटलं की आठवते चिऊ-काऊची गोष्ट! वाहून गेलेल्या घरामुळे चिऊताईच्या दारात आलेल्या काऊची‌ गोष्ट सांगताना माझ्या नातवानं‌ मला विचारलं होतं "उन्हात मेणाचं घर वितळले असेल ना मोठी मम्मी? मग चिऊताई कावळ्याच्या घरट्यात रहायला गेली ना? लहान मुलं कधी कधी निरागसपणे शिकवून जाणारं बोलून जातात. असो, हा सगळा घर बदलण्याचा अनुभव मला पण खूप काही शिकवून गेला आणि म्हणूनच‌ ह्यावर्षी माझ्यात झालेल्या बदलासाठी माझ्या मैत्रिणी, जवळचे सुह्रद ह्यांच्यामुळे परिस्थितीत सकारात्मक मनस्थिती ठेवायला मदत झाली त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटतेय!!
        ह्याच काळात सुधा मूर्ती यांचे विचार वाचण्यात आले. "Attachment in Detachment" कोणत्याही नात्यातल्या ओढीपासून अलिप्तपणापर्यंतचा प्रवास!! सुधाताई म्हणतात "मुलं आपापल्या सोडून गेली की आपण मानसिक दृष्ट्या मॅच्युअर होतो आणि वयामुळे आलेली इमोशनस् ची पोकळी सहज टॅकल करू शकतो. कारण त्यांना हवं तसं जगू दिलं तर मी पण ते जसे आहेत तसे स्वीकारायला तयार होईन! त्याचबरोबर आपण स्वत:च्या आवडीनिवडी जपाव्यात आणि आपण करतो त्याच्यावर प्रेम करण्यापेक्षा आपलं ज्या गोष्टींवर प्रेम आहे त्या कराव्यात" त्यांच्या या विचारानं माझ्यातला बदल हा वाचण्याच्या सवयीने झालाय हे कळलं आणि वाचण्याची सवय लावणाऱ्या वडिलांची आठवण झाली. अर्थात ह्या निमित्तानं त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटली.
       वाचण्यावरून नुकतीच एका पुस्तक-विक्रेत्यानी टाकलेली पोस्ट वाचली त्याची आठवण झाली. विषय होता मार्गशीर्ष महिन्यातील 'गुरवारी करायच्या लक्ष्मीव्रतासंबंधी!' शेवटच्या गुरवारी अनेक महिला हळदीकुंकू समारंभ करून पोथ्या वाटतात आणि पुस्तकविक्रेत्यांची अक्षरशः शेकड्यांनी पोथ्यांची विक्री होते. खरोखर अशा पोथ्या वाटून लक्ष्मी प्रसन्न होईल? असा प्रश्न त्यांनी स्वत: विक्रेता असूनही उपस्थित केलाय. नफा होत असूनही त्यांच्या मनात जे आलंय त्याचा आपणही विचार करायला हवा ना? त्याऐवजी त्या पैशातून एखाद्या गरजू महिलेला भाजी, धान्य द्यावं. त्या‌ महिलेचे आशिर्वाद मात्र नक्कीच मिळतील तरच खर्‍या अर्थानं मार्गशीर्षातली भक्ती कृतज्ञतेची होईल असं वाटतं.
        दुर्गाबाई भागवतांनी मार्गशीर्षाबद्दल‌ लिहीताना म्हटलं आहे" छायेची शांती, छायेचा स्पर्श, छायेचे सौंदर्य मार्गशीर्षातल्या लांबच लांब रात्रीत जसे भासते तसे इतर वेळी भासत नाही. ह्या दिवसातली उन्ह तर हवीहवीशी वाटतातच पण छायेचे खेळही गमतीचे असतात"
       अगदी तसेच मार्गशीर्ष महिन्या निमित्ताने कृतज्ञतेचे माझे हे विचार सर्वांना शांती, आनंद, सौंदर्यपूर्ण व्हावेत हीच दत्तात्रया चरणी प्रार्थना!!

                           मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा
                              ता. १५.१२.२०२०
                                ललिता छेडा