Monday, November 30, 2020

गृहीणी


गृहीणी...

घर सावरते घर आवरते...
तरीही घड्याळाच्या काट्यावर धावते

धावता धावता थकली दमली तरी...
स्वत:च्या गायन वाचनाचे छंदही जपते

रोज मनाच्या खिडक्या आनंदाने उघडते...
आणि खिडकीतल्या कुंड्यांमध्ये निसर्ग शोधते

नोकरी व्यवसाय करावा असा मनातला ध्यास..
घराचा कोपरा न कोपरा मात्र सजवते खास

मुलांसाठी ऊन पाऊस झेलत लढत रहाते...
पण उडालेल्या पिल्लांकडेे दूरूनच पहाते

घरातल्यांच्या खुशीचा मार्ग पोटातून जातो हे जाणते..
आयुष्यभर करायच्या स्वैपाकात नाविन्य शोधत रहाते

सासर-माहेर नणंदा-भावजया नात्यांत अडकून पडते..
आणि सांभाळताना नाती स्वत:ला शोधायला विसरते

खिडकीतून दिसणारं तिचं आभाळ मधूनच अंधारते..
पण लावलेल्या पणतीनं ती घराच अंगणच उजळते

धाग्यानं वडाभोवती ज्याच्यासाठी फेऱ्या घालते...
त्याचा अहंकार,त्याचा राग,धाग्याच्या गाठी सोडवत जगते

हाताला लागणारे चटके, डोळ्यात येणारं पाणी...
होणारे पराभव सगळं हसत हसत सहन करून जाते

दिवसभराची कामं मोलाची अपेक्षा न करता करत जाते..
दिवसभर करतेस काय? ह्या प्रश्राचं उत्तर शोधत रहाते.

३ नव्हेंबरचा राष्ट्रीय गृहिणी-दिन त्यानिमित्ताने
मनांत आलं 'गृहीत' धरली जाते ती 'गृहीणी' की जिच्या 'ऋणात' सारं घर असतं ती 'गृहिणी!! आणि म्हणूनच जे मनात आलं ते लिहीलं. गृहिणीला मन असतं, विचार असतात, कलागुण असतात ह्याची जाणीव सर्वांना असायला हवीच पण ती जाणीव तिच्यापर्यंत पोचणं पण आवश्यक आहे.
कोरोनाच्या ह्या अवघड काळात जिच्या मनोबलावर अवघा समाज टिकून राह्यला होता ती घरातली गृहिणी होती. कारण तिनं.
Work from home.. केलं
Work for home..... केलं आणि
Work with patience... शिकवलं.
अशा सर्व गृहिणींना माझा मनापासून सलाम!

कार्तिक पौर्णिमा
ता. ३०. ११. २०२०
ललिता छेडा.

Sunday, November 15, 2020

लखलख चंदेरी.....कार्तिक

        समृद्धीचा एक उत्सव म्हणजे दीपोत्सव! दिवाळीतलं उत्सवी वातावरण, थंडीची सुरवात आणि अभ्यंगस्नान हे सगळं पारंपरिक असलं तरी आपण प्रत्येक दिवाळी फराळ, साफसफाई, खरेदी ह्या सगळ्यांमुळे नव्यानं अनुभवतो.

        माझी लहानपणीची दिवाळी परळ, गिरगावातल्या चाळींमध्ये साजरी झाली आहे.‌ दोन खोल्यांची ती घरं दिवाळीच्या आधीच्या आठवड्यात साबण घालून धुवून स्वच्छ करायची आणि मग फराळ बनवायला सुरुवात व्हायची. वसूबारसेला आई बरोबर देवळात जाऊन गाय आणि वासरू ह्यांची पूजा करायची आणि त्यांना नेवैद्य म्हणून आई गव्हाच्या पिठाचे लाडू करून न्यायची. नरकचतुर्दशीच्या दिवशी ‌आंघोळीच्या वेळी फुलबाज्या लावायच्या, फराळाबरोबर दही पोहे इतके मस्त लागायचे की अजूनही ती चव जिभेवर रेंगाळतेय. खरेदी म्हणजे वडिलांची धोतर-जोडी, आईला एक साडी आणि मला घरी आईनं शिवलेला फ्राॅक!! खरेदी गिरगावातल्या माझ्या ‌मामांच्या दुकानातच व्हायची. चाळीत, नातेवाईकांसाठी द्यायला फराळाचे डबे तयार व्हायचे. झिरमिळ्यांचे कंदील घरी बनायचे. अशी अगदी साध्यासुध्या गोष्टींत आनंद शोधत त्यावेळी दिवाळी साजरी व्हायची.
        लग्नानंतर डोंबिवलीत आल्यावर माझ्या मैत्रिणी जयश्री आणि अनघा आम्ही तिघी दिवाळीचा फराळ एकत्रच‌ बनवत असू. खूप धमाल यायची. आम्ही तिघी दिवाळीची खरेदी करायला क्राॅफर्ड मार्केटला जायचो. तेव्हा ट्रेनला हल्ली सारखी गाड्यांना गर्दी नसायची. त्यामुळे ती क्राॅफ्रर्ड मार्केटची खरेदी आठवणीतली ट्रीप होत होती येवढं मात्र खरं!! एकदा तर आम्ही तिघींनी इतकी खरेदी केली की आम्हाला हमाल करावा लागला होता...‌
        आता अनघा आमच्यात नाही पण तिच्या अनेक आठवणी मनात रेंगाळत असतात...
        डोंबिवलीत आल्यावर दरवर्षी लक्ष्मीपूजनाला माझ्या नवऱ्याचे मित्र आणि माझ्या मैत्रिणी संध्याकाळी आमच्या आमच्या घरी येतात आणि आमचं एक छानसं गेट-टूगेदर आम्ही कायम करत आहोत. दिवाळीची एक कायमची आठवण!!
        सुवर्ण मंगल महिला सहकारी बॅंकेच्या संचालक पदामुळे अठरा वर्षे व्यावसायिक दिवाळीचा वेगळाच अनुभव घेतला! स्टाफचा बोनस, खातेदारांसाठी नवीन स्कीम जाहीर करणं, लक्ष्मीपूजन अशी वेगळ्या पध्दतीची, वेगळ्या विचारांची दिवाळी अनुभवलीय.
ह्याच बॅंकेच्या अध्यक्षपदी असताना डोंबिवलीचं ग्रामदैवत असलेल्या गणेश मंदिरात तर्फे दिवाळी पहाटेच्या सकाळी माझा सन्मान करण्यात आला तो क्षण अविस्मरणीय!!‌ अर्थात माझं नेहमीच कौतुक करणाऱ्या आबासाहेब पटवारींचा इथं आवर्जून उल्लेख करावासा वाटतोय.
        ह्यावर्षीच्या दिवाळीत मात्र कोरोनाच्या अंध:काराला आरोग्यपूर्ण जगण्याच्या छोट्याश्या पणतीनं भेदायचंय. त्याशिवाय ह्या आजारपणामुळे थकलेल्या वृध्द पावलांना, कष्टकरी हातांना, नैसर्गिक आपत्तींमुळे बेजार शेतकऱ्यांना जमेल तसं सहकार्य करून एक सामाजिक भान जपायचं आहे. प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी फटाके आता उडवायचेच नाहीत असं सर्वांनीच ठरवायचं आहे.
       अशा ह्या दिवाळीच्या प्रत्येक दिवसाच्या कथा आहेत. भाऊबीजेची एक कथा माझी आजी सांगायची "असं म्हणतात भाऊबीजेला यम आपल्या बहिणीकडे "यमीकडे" दिवसभरासाठी जातो आणि जाताना नरकाचे दरवाजे बंद करून स्वर्गाची दारे सताड उघडी ठेवतो! आणि त्यामुळे भाऊबीजेला मृत्यू झाला तर ती व्यक्ती सरळ स्वर्गात जाते आणि माझ्या आईचा मृत्यू भाऊबीजेला झालाय....


                          कार्तिक शुद्ध प्रतिपदा
                            ता. १६-११-२०२०
                               ललिता छेडा