Thursday, March 28, 2019

आजीची गोष्ट



  सकाळ पासून धावपळ करून स्कुटरवरुन बुटीकवर जाणार्‍या स्नेहाला बघून वसुधा ताईंना भरून आलं.त्यांच्या मनात आलं"केवढ्या हौसेनं आपण हिचं लग्न करुन दिलं होतं.तिच्या लग्नाला जेमतेम वर्ष झालं आणि त्यांना नातवाची चाहूल लागली.....
         त्याकाळात एकुलती एक लाडकी लेक आपल्या संसारात सुखी आहे हे बघून तिच्या आईला जितका आनंद होतो तितक्याच त्या खूषीत असायच्या.त्यात  पुन्हा लग्न झाल्यावर लेक ठाण्यातच जवळ रहायला आली होती. 
     आकाशच्या म्हणजेच त्यांच्या नातवाच्या जन्मानंतर तर रोज ती बुटीकला जाताना सकाळी  आकाशला  त्यांच्याकडेच सोडायची.त्यामुळे नातू पण त्यांना रोज भेटायचा. आकाशचा तर त्यांना खूपच लळा लागला होता.
     स्नेहाची मात्र किरकोळ कुरबुर चालूच असायची.सासूबाई जरा जास्तच 'आमच्या वैयक्तिक आयुष्यात लक्ष घालतात'. अरूण, त्यांचा जावई नोकरीवर न जाता बरेच वेळा घरी बसून असतो. स्नेहाचे सासरे मात्र तिला खूप मानसिक आधार देत असत. बायकोच्या न कळत स्नेहाला आर्थिक मदतही करत असत. त्यामुळेच वसुधाताई समजवायच्या"अग,तुझा नवरा पण एकुलता एक आहे.त्यामुळे त्याच्यावरचा हक्क तुझ्या सासुबाईंच्या मनातून जायला जरा वेळ लागेल. 
      कधी स्नेहाला समजावताना म्हणायच्या "तुझा नवरा पण थोडा लाडोबाच आहे.हळूहळू  होईल सगळं नीट! बघ थोड्या दिवसांनी आकाशमुळे दोघंही जबाबदारीनं वागतील." पण स्नेहाच्या नशीबात काही तरी वेगळंच लिहीलेलं होतं.
      स्नेहा रहात असलेली बिल्डींग रिडेव्हलपिंगसाठी गेली आणि अरूणनी जागा विकून पैसे घेऊन लांब स्वस्तात मोठी जागा घ्यायचं ठरवलं.स्नेहानी खूप समजावलं माझ बुटीक इथं आहे,स्टेशन जवळ आहे,आई जवळ रहाते त्यामुळे मी आकाशला तिच्याकडे ठेवू शकते पण अरूण अजिबात ऐकायला तयार नव्हता.नाईलाजानी तिनं होकार दिला. एक म्हणजे तीन बेडरूमची मोठी जागा झाली आणि पैसे पण थोडे उरले म्हणून स्नेहानी हो म्हटलं होतं.पण झालं भलतंच,  त्या पैशात अरुणनी जुनं फर्निचर विकून सगळं नवीन केलं.आणि त्याही पेक्षा वेडेपणा म्हणजे थोडेसे पैसे आहेत म्हणून एक दिवस अचानक चांगली नोकरी सोडून घरी बसला.त्याच्या वडिलांनी त्याला खूप समजावलं.पण व्यवसाय सुरू करायचाच आहे असं म्हणू लागला.
     आता अरुणची आईपण थोडीशी चिडचिड करायला लागली होती. चुक अरूणची असली तरी त्या राग स्नेहावर काढायच्या.आकाश आता वसुधा ताईंना महिन्यापंधरा दिवसांतून एखाद्या वेळेसच भेटू लागला होता.कारण त्याची आता शाळा सुरू झाली होती.वसुधाताई खरं म्हणजे नातवाच्या आठवणीने कासावीस व्हायच्या.आणि‌ तिकडे स्नेहाच्या सासुबाईंनी "माझ्यानी नाही होणार हो आकाशला सांभाळणं"म्हटल्यामुळे स्नेहाला आकाशला तिथल्या पाळणाघरात ठेवावं लागतं होतं.सासरे नसते तर ती एक दिवस सुध्दा तिथं राह्यली नसती.
    आकाश सातवीत गेला आणि सगळं असह्य होऊन स्नेहा आकाशच्या मे महिन्याच्या सुट्टीत त्याला घेऊन आईकडे रहायला आली.कारण अरूण आता व्यवसायाच्या नावानं कर्ज करून ठेवायला लागला होता.कर्जदार दारावर येऊ लागले होते.कंटाळून स्नेहा घर सोडून आली होती. 
    स्नेहाच्या वडिलांना तिच्या परत येण्याचा खरं म्हणजे खूप त्रास होत होता.त्याच मुख्य कारण म्हणजे एकुलत्या एक मुलीला हे स्थळ त्यांच्या मित्रानी सांगितलं आणि आपण चौकशी न करता लग्न लावून दिलं ह्याचा त्यांना त्रास होत होता. आणि त्याचा त्यांच्या तब्येतीवर परिणाम होऊ लागला.वसुधाताईंना मात्र असं काही तरी होणार ‌हे कळलं होतं.
    स्नेहा वडिलांना खूप समजवायची"बाबा मला मनासारखं करियर करु दिलंत. तुम्ही मला स्वत:च बुटीक काढून दिलंय. आज मी स्वत:च्या पायावर उभी आहे.तुम्ही नका काळजी करू".पण तिचा संसार मोडलाय हे त्यांना सहनच होत नव्हतं.
    आकाश आणि त्याची वसूआजी मात्र सतत एकत्र रहात होते."वसूआजी भरव ना,वसूआजी गोष्ट सांग ना,चल ना आपण दोघं आईस्क्रीम खायला जावू.दोघांचा तो महिना अविस्मरणीय झाला होता.लग्नाचा सीझन असल्यामुळे स्नेहाला पण बुटीकमध्ये खूप काम होतं.त्यामुळे आकाशसारखा आजीच्या मागेमागेच असायचा.
    स्नेहा माहेरी आल्यापासून अरुण आणि त्याची आई अजिबात फिरकले नव्हते. अरूणनी दोन वेळा फोन केला होता.पण 'परत ये' म्हणण्याऐवजी वाटेल ते बोलत होता.
      स्नेहाचे सासरे मात्र तीन-चार दिवसांनी येऊन आकाशला भेटून जात होते.
       असेच एक दिवस ते आले असताना आकाश सहज म्हणाला"आजोबा, मी आणि वसूआजी इकडे ना खूप धम्माल करतोय.तुम्ही पण आम्हाला जाॅईन कराना!
     "नाही रे राजा, मला नाही येता येणार! त्यांचा घसा दाटून आला होता." वसूआजी, नवरा-बायकोंच्या भांडणांत मुलं जेवढं दु:ख भोगतात तेवढच दु:ख ज्या आजी आजोबांच्या घरी नातवंड नसतं त्यांना होत असतं."बोलता बोलता ते थांबले.
        "अशा परिस्थितीत एका घरातल्या आजी आजोबांना आपलं नातवंड गमवावंच लागतं."असं बोलून ते आकाशच्या डोक्यावर हात फिरवून झटकन निघून गेले.
      आकाशची शाळा सुरू व्हायच्या वेळीच स्नेहाच्या बाबांची तब्येत बिघडली. त्यांना हाॅस्पिटलमध्ये हलवावं लागलं.त्यामुळे आकाशला अरुणचे बाबा घरी घेऊन गेले.कारण ठाण्यातच इतक्या लांब असलेली शाळा,बुटीक,हाॅस्पिटल अशी चौफेर धावपळ स्नेहासाठी शक्य नव्हती.
     खरं म्हणजे वसुधाताईंना आकाशला त्याच्या घरी पाठवणं काही पटलं नव्हतं पण इलाज नव्हता कारण काही दिवसांनी बाबांना बायपास सर्जरी करण्यासाठी मुंबईला न्यावं लागलं.
       स्नेहाला सारखं वाटायचं 'मलाच का' हे सगळं सहन करावं लागतंय.मग ती लगेच मनाशी म्हणायची "माझं आयुष्य मलाच घडवायचय, दुसऱ्या कोणालाही नाही! आणि पुन्हा एकदा कामाला लागायची.
       हाॅस्पिटलमध्ये भेटायला अरूणचे बाबा आले तेंव्हा त्यांना "आता नातवापासून दूर रहायची पाळी बहुतेक माझी आलेली दिसतेय"असं वसूआजी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या.आणि ते खरं ठरलं! स्नेहानी आणि तिच्या सासऱ्यानी आकाशला हाॅस्टेलमध्ये ठेवायचं ठरवलं.
     आकाश जाताना फक्त येवढंच म्हणाला"मम्मी,तू घर सोडून गेलीस म्हणून मला असं घर सोडावं लागतंय!  तो गेल्यावर स्नेहा अक्षरशः ओक्साबोक्शी रडली.
    नंतर बारावीपर्यंतची पांच वर्ष आकाश हाॅस्टेलवर राह्यला.स्नेहावर तर त्यान भलताच आकस धरला होता. अर्थात त्याला अरूण अणि त्याच्या आईचा स्नेहाविषयीचा बोलण्यातून व्यक्त होणारा राग पण कारणीभूत होताच. एकंदरीतच तो अबोल झाला होता.
     त्याकाळात वसूआजी हाॅस्टेलवर आकाशला पत्र लिहायच्या, कधी फुलं,पक्षी ह्यांची चित्र नावासकट कापून चिकटवून पाठवायच्या,कधी गोष्टी लिहून पाठवायच्या.अनेकदा पेपरातले काही चांगले लेख पाठवत असत.
सुट्टीत तो घरी भेटायला आला की त्या विचारत "आकाश पत्रं मिळतात का रे माझी? तो फक्त 'हो' म्हणायचा.
    अभ्यासात मात्र तो खूपच हूशार होता. बारावीला उत्तम मार्क मिळवून सुध्दा त्यानं इंजिनिअरिंगला बाहेरगावी अॅडमिशन घेतली.त्यामुळे तो पुन्हा दूर जाणार म्हणून वसूआजी कासावीस झाल्या.त्याला आवडणार्‍या चार खाण्याचे पदार्थ घेऊन आपण इतके वर्षात अरुणच्या त्या घरी गेलो नाही पण आकाशसाठी जावं का?असा त्या विचार करत असतानाच अचानक त्यांना आकाशचा मोबाईलवर फोन आला.
   "वसूआजी, घरी आहेस? मी येतोय तुला भेटायला!पण तू एकटीच हवीस घरी,मला जाताना फक्त तुलाच भेटायचंय"आकाश बोलत होता आणि वसूआजीच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता.डोळ्यातून घळाघळा अश्रू अनावर झाले होते.
‌ "येरे,बाळा कधीही ये. मी वाट बघतेय"वसूआजी गहिवरून गेल्या होत्या.
उद्या सकाळी येऊ?आकाशनी विचारलं.
"ये आणि आपण दोघं एकत्र जेवूया".वसूआजी.
  "पण तू एकटीच हं"आकाश.
    "तो आपणहून येणार आहे हेच खूप आहे.असा जर येत राह्यला तर तू नक्कीच त्याच्या मनातला माझ्याबद्दलचा राग दूर करशील. मी नाही येणार उद्या जेवायला! स्नेहाला तो येतोय हे कळल्यावर ती शांतपणे म्हणाली.वसूधाताईंना सगळ्यांचं खरं म्हणजे दडपणच आलं होतं.
       दुसऱ्या दिवशी आकाश आला आणि कोणी घरात नाही असं बघून सोफ्यावर निवांत बसून बोलायला लागला."वसूआजी, शेंगांची आमटी केलीय ना? मला गोड काही नको.त्याची मोकळी बडबड ऐकून वसूआजी धन्य झाल्या होत्या.
     दोघंही गप्पा मारत जेवले.आणि मागचं आवरुन वसूधाताई बाहेर आल्या आणि आकाशनी त्याच्या बॅग मधून एक पॅक केलेला बाॅक्स काढला आणि आजीच्या हातात ठेवला."हे काय आहे? आजीनं विचारलं.
    "तू उघडून तर बघ"आकाश म्हणाला.
    थरथरत्या हातांनी वसूधाताईंनी ते पॅकींग उघडलं.आतमध्ये 'वसूआजीच्या गोष्टी' असं नांव असलेलं पुस्तक होतं.
   "अरे हे कोणाचं पुस्तक आहे?"वसूताईंनी उत्सुकतेने विचारलं.
    'तुझं' आकाश म्हणाला." ह्या पुस्तकात तू मला जे जे पाठवत होतीस ते आणि मी हाॅस्टेलमध्ये मोबाईलवर काढलेले फोटो आहेत.मी हे सर्व बाईंडींग करून घेतलं आणि त्याच पुस्तक केलं.पुस्तकावरचा फोटो पण मीच काढलाय.झाडांमध्ये लपलेल्या एका घराचा तो फोटो होता.
       "ए मी पण तुझ्यासाठी माझ्या साडीची गोधडी स्वत:च्या हातानं बनवलेय"वसूआजीनी गोधडी आकाशला दिली.त्यानी पण ती लगेच उलगडून स्वत: भोवती गुंडाळून घेतली.

     गोधडीत गुंडाळलेला आकाश आणि पुस्तकाची पानं उलटणारी वसूआजी! दोघंही प्रत्येक पानाच्या आठवणीत रंगून खूप हसत होते, बडबड करत होते.
     रंगलेल्या त्या गप्पांमुळे 'आजीच्या गोष्टींची' पुन्हा एकदा नवीन सुरुवात झाली होती.
                                             ललिता छेडा

Thursday, March 21, 2019

लढा एकटीचा


रोजच्या सवयीनुसार सकाळी उठल्यावर स्वैपाकघराच्या खिडकीतून समोरच्या बिल्डींगमधल्या दक्षाच्या दुकानाकडे लक्ष गेलं.दुकानाच्यामागेच दोन खोल्यात रहाणार्‍या दक्षाच्या दुकानाचा लाईट बरोबर साडेपाच वाजता लागायचा. आज मात्र सहा वाजले तरी उजेड दिसत नव्हता.थोडी काळजी वाटली.कारण गेल्या वीस वर्षांपासून एकही दिवस असा गेला नव्हता की दक्षानी दुकान उघडलं नाही.सकाळच्या शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी स्टेशनरी,डब्यासाठी खाऊ अशा गोष्टींच्या त्या दुकानात दहानंतर वडापाव आणि चहा मिळायचा.
     असा पहाटे साडेपाचला सुरू झालेला दक्षाचा दिवस रात्री अकरा वाजेपर्यंत अव्याहत कामात जायचा.
      दक्षा, जिला पंचवीस वर्षांपूर्वी घाटकोपरला आमच्या बिल्डिंगच्या समोर असलेल्या चाळीतल्या कोपऱ्यात एका खोपटात स्टेशनरीच दुकान चालवणारा रमेश लग्न करून घेऊन आला होता.
     गुजराथी असलेला रमेश आपल्या विधवा आई आणि धाकट्या भावासह त्या खोपट्यातच मध्ये पडदा लावून मागच्या बाजूला रहात असे. लग्न करून आलेल्या काळ्या सावळ्या दक्षानी मात्र सर्वांशी खूपच छान संबंध जोडले. माझ्याशी तर तिचं खूपच चांगलं जमलं. आमच्या घरी येऊन काही बनवायचं असेल किंवा पाहूणे येणार असतील तर दक्षा आवर्जून येणार आणि मदत करणार. आम्ही आजूबाजूचे सगळेच तिनं मदत केली की तिला पैसे,वस्तु देत असू. 
    तिचं नशीब ही चांगलं होतं, तिचं लग्न झाल आणि वर्षभरात चाळीच्या मालकानं चाळ पाडून तिथे बिल्डिंग बांधायला सुरुवात केली.
      नवीन चाळीत रमेशला जागा घेणं शक्यच नव्हतं पण मालकांनी दक्षाकडे बघून त्या खोपटाच्या जागी पक्कं बांधकाम करून दिलं. दुकानाच्या मागे एक मोठी खोली होईल येवढी जागा बांधून रमेशला ती भाड्यानी दिली.मालक गुजराती असल्यामुळे त्यानं स्वत:च्या नावाने जागा बांधून स्वार्थ-परमार्थ दोन्ही साधला होता.त्याशिवाय रमेशला सोसायटीसाठी टाकीत पाणी सोडणं-भरण्याच कामही मिळवून दिलं.
    त्याच काळात नेमके दक्षाला दिवस गेले त्यामुळे रमेशनी तिला आणि त्याच्या आईला दक्षाच्या माहेरी पाठवून दिलं.तो आणि त्याच्या धाकट्या भावानं बांधकाम होईपर्यंत कुठे तरी राहून दिवस काढले.धाकटा भाऊ दूध,पेपर टाकून काही तरी कमवत होता.पण रमेशनी ती दोन वर्षे काहीही काम न जुगार,लाॅटरी असले नस्ते उद्योग करून काढली.   दूकानाच बांधकाम झाल्यावर दक्षा वर्षाच्या  लेकीला घेऊन आली. 
     एकतर मुलगी झाली म्हणून तिला बघायला सुध्दा न आलेल्या जावयाची लक्षणं दक्षाला सोडायला आलेल्या तिच्या वडिलांनी बरोबर ओळखली .ते तर तिला आमच्या बरोबर 'परत चल' असंच म्हणत होते. बिचारे माझ्या घरी येऊन तिला समजवा असं पण सांगून गेले.पण दक्षानी त्यांना ठाम नकार दिला.
     बडोद्याजवळच्या खेड्यात राहणाऱ्या दक्षाच्या पाठच्या अजून एका बहिण,भावाची जबाबदारी पण वडिलांवर होती.तिथे परत जाण्यापेक्षा आपण इथंच राहून लढायचं असा तिनं निर्णय घेतला.
      दक्षाला सोडून परत जाणार्‍या तिच्या वडिलांकडे रमेशनी निर्लज्जपणे सामान भरायला पैसे मागितले.वडिलांनी पण पैशाऐवेजी मालच भरून दिला.
हे सगळं रमेशच्या आईला खरं म्हणजे अजिबात आवडलं नव्हतं.पण रमेशच्या पुढे मात्र तिचं काही चालतच नव्हतं.
       दक्षानी हळूहळू दुकान चालवायची जबाबदारी स्वत:च घेतली.सकाळच्या शाळेत जाणाऱ्या मुलांना डब्यासाठी ती काही तरी बनवून देऊ लागली.तिनं मुलांना शाळेला लागणारी स्टेशनरी ठेवायला सुरुवात केली.त्या एरियात ते दुकान 'दक्षाच दुकान' म्हणून प्रसिद्ध होऊ लागलं.आणि रमेशला त्याचाच राग येऊ लागला.सारखा तिचा दुकानात जाऊन अपमान करायचा, भांडण उकरून काढायचं असे उपद्व्याप त्यानं सुरू केले.अशात तिला पुन्हा दिवस गेले.तिला खरं म्हणजे हे मुल नको होतं पण विधी लिखीत काही ‌वेगळंच होतं.दक्षाला मुलगा झाला पण ‌खूप अशक्त, दोन्ही पायात ताकद नसलेला असा होता.त्याला बघून ‌रमेशनी हाॅस्पिटलमध्येच आरडाओरडा सुरू केला. तेव्हाच नेमकी मी  दक्षाला बघायला गेले होते.ते सगळं ऐकून पहिल्यांदाच मी त्याला चांगलाच दम भरला.  गरोदरपणात ‌तिची किती ‌हेंडसांळ झाली ते ऐकवलं.तेवढ्यापुरता तो गप्प राहिला पण तिला घरी आणल्यावर रोज आरडाओरडा चालूच असायचा. 
     आणि एक दिवस अचानक तो नाहीसाच झाला.
     स्वत:ची आई,भाऊ, दोन मुलं दक्षावर टाकून निघून गेला.कोणत्यातरी बाई बरोबर पैशाच्या मोहात कलकत्त्याला गेला असं ऐकू येत होतं.
    अवघ्या सहा महिन्याचा अधू मुलगा, चार वर्षाची मुलगी, दक्षा जरासुद्धा डगमगली नाही.तिचे वडिल तिला भेटायला आले त्यांना पण तिनं परत पाठवलं.
    ‌‌कोणीतरी म्हटलं पोलीसांना कम्प्लेंट द्या. पण तिच्या सासुनी सांगितलं "काही शोधू नका त्याला.बरी पीडा गेली."
    काळ पुढे धावत होता. आमच्या पूर्ण भागात दक्षा  सर्वांसाठी अन्नपूर्णा झाली होती. कोणाकडे पाहूणे आले दक्षा भाजी करून पाठव ना, कोणी माहेरी गेली की दक्षा टिफीन पाठवशील? कोणी हाॅस्पिटलमध्ये आहे की दक्षा जेवण द्यायला तयार! 
    दक्षानी कष्ट करून पुढच्या दहा वर्षांत भाड्याचं दुकान स्वत:च्या नावावर विकत घेतलं. 
     वीस वर्ष उलटून गेली.दक्षाचा दिर शिकून चांगल्या नोकरीला लागला आहे.मुलगी पॅथाॅलाॅजिस्ट झाली.ती एका लॅबमध्ये मध्ये नोकरी करतेय.तिला पण स्वत:ची लॅब काढायचीय.
    मुलासाठी दक्षाने केलेल्या प्रयत्नांना यश येऊन तो घरातल्या घरात चालायला लागलाय.दीराच लग्न झालं आणि सासु गेली. दक्षाचा मोठा आधारच गेला होता.त्यानंतर दिरानी पण स्वत:च घर कर्ज काढून घेतलं.आणि वहिनीला आपण ह्या घरी एकत्र राहू म्हणून खूप आग्रह केला.पण दक्षानी त्या दुकानात मुलासह रहाणार असं ठाम ठरवलं होतं. तिला मुलाला ते दुकान चालवण्या इतका सक्षम करायचा होता.त्याच्या हालचालींसाठी योग्य अशा सोयी करून घ्यायच्या होत्या. दक्षाची मुलगी मात्र रात्री झोपायला काकांकडे जाऊ लागली.दक्षाच्या ह्या एकटीच्या लढ्याचे आम्ही‌ सर्व साक्षीदार होतो.
     म्हणूनच आज दुकान न उघडल्याने मला काळजी वाटली.काम आवरलं की तिच्याकडे जाऊन येऊ असं ठरवून मी कामाला लागले.पण तोपर्यंत शेजारच्या वैद्य वहिनीनी बातमी आणली "दक्षाचा नवरा परत आलाय.खूप आजारी आहे.काल रात्री उशिरा कोणीतरी त्याला तिच्याकडे सोडलं. त्यानंतर दक्षानी डॉ.ना बोलावलं आणि त्याच्यावर उपचार सुरू केलेत. ह्या सगळ्या गडबडीत ती दुकान उघडू शकली नव्हती. वहिनींनी सगळ थोडंसं रागातच सांगितलं.आणि त्यांचा राग योग्यही होता.मनात आलं हिने का घेतलं रमेशला घरात?
       मी दक्षाकडे गेले तेव्हा तिची मुलगी,दिर,जाऊ, सगळेच आलेले होते.तिची लेक तर जाम चिडलेली दिसत होती.मला बघून ती सुरूच झाली" बघा, काकी ही आता ह्या माणसाला घरात ठेवून त्याच्या उपचारासाठी हैराण होणार आहे.कायतरी सांगा हिला!वीस वरस झाले आम्ही जिन्दा आहे की नाही हे ह्यांनी विचारलं सुध्दा नाही.आणि आज येवढे बीमार झाले म्हणजे आले इकडे!
          "अरे,ते तुझे पप्पा आहे."दक्षानी लेकीला समजवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.
     नहीं,काकी तूला तर माहित आहे, मी माझ्या नावासमोर दक्षा मेहता लावते"दक्षाच्या लेकीनं न ऐकण्याचा जणू ठरवलच होतं.तिनी मलाही त्यात सहभागी करून घेतलं.
      माझं लक्ष रमेशकडे गेलं.त्याचे डोळे मिटलेले होते पण डोळ्यांच्या कडेनी अश्रू गळत होते.त्याची अवस्था बघवत नव्हती.त्याचा भाऊ माझा चेहरा बघून लगेच म्हणाला"काकी,नाटकी आहे तो लक्ष नका देऊ.
        ह्या सर्वांच खरं होतं.खूप कष्ट, गरीबी, अपमान त्यांनी सहन केले होते.दक्षाचा मुलगा काहीच न बोलता बसून होता.आवडलं नाही तरी तो आईच्या बाजूनी होता.ते जाणवत होतं.
        दुकान बंद का बघायला बरीच माणसं येऊन जात होती आणि रमेशला बघून कपाळाला हात लावून जात होती.
      "काकी,ह्या सर्वांना सांगा ना ते बरे झाले की मग आपण काय करायचं ते ठरवू या चालेल?"दक्षाने निर्वाणीच्या स्वरात माझ्याकडे बघत विचारलं.
     तिच्यापूढे कोपरापासून हात जोडून"तोपर्यंत मी इथं येणार नाही.असं म्हणून दक्षाची लेक निघाली.आणि भावाकडे बघून म्हणाली"दुकानमें आके मैं तुमको मिलके जाऊगी, कुछ भी प्राॅब्लेम है तो फोन करना!
     ती सर्वजण गेल्यावर दक्षा माझ्या शेजारी येऊन बसली."मेरी कुछ गलती हो रही है क्या? असं डोळ्यात पाणी आणून म्हणाली."नाही ग, तू खूप चांगली आहेस हीच तुझी गलती आहे.दरवेळी असं तुला एकटीनं लढताना बघून वाटतं की कधी संपणार हिच्या कष्टाचे दिवस? येवढंच बोलून मी पण घरी जायला निघाले.
       काकी,लढाईची नाही भीती वाटत पण हरायची मात्र हल्ली खूप भीती वाटते" दक्षा मला जाताना बघून केविलवाणी झाली होती. 
        मनांत आलं दक्षासारख्या एकट्या लढणार्‍यांच्यां पाठीवर हात ठेवून आपण 'फक्त लढ म्हणावं" कदाचित तोच एखादा धीराचा हात त्यांना  लढायला बळ देणारा असू शकतो.
                       ललिता छेडा.

Thursday, March 14, 2019

अनुभव


                             मैत्रिणीच्या मुलीच लग्न सोलापूरला आहे असं कळल्यावर आम्ही तिघी मैत्रिणींनी जायचं ठरवलं.त्यानिमीत्ताने सोलापूर बघणं होईल म्हणून आम्ही दोन दिवस आधी गेलो.खूप हिंडलो फिरलो आणि लग्न पण एन्जाॅय केलं.
      बायकी आवडीप्रमाणे खरेदीपण झाली.येताना एक बॅग होती पण आता प्रत्येकीची एक बॅग वाढली होती.लग्नात झालेल्या ओळखींमुळे मुंबईला जाणारे आम्ही ८/१०जण आहोत हे कळलं होतं.सर्वांची रात्रीचीच गाडी होती.आणि गंमत म्हणजे तिकीटं बघितल्यावर कळलं होतं की आमच्या सर्वांचा एकच डबा आहे.
      रिझर्व्हेशन होतं तरीही थोडेसे लवकरच स्टेशनवर येऊन बसलो.इतक्यात एक दहावी बारावीत असावी अश्या वयाची मुलगी, तिच्या बरोबर दोन तरुण मुलं,एक जाडी बाई असे चारजण येऊन डबा नंबर सांगून तो इथेच येईल का असं विचारू लागले?. माझ्या स्वभावाप्रमाणे उठून त्यांची तिकीट बघितली फक्त त्या मुलीच तिकीट होत आणि ते आमच्याच डब्यात होतं.ती‌ मुलगी कोणाचीतरी वाट बघतेय असं जाणवत होतं.कारण ती सारखी मेनगेटकडे बघत होती.मोबाईल लावत होती.पण बहुतेक लागत नव्हता.ती हळूच माझ्याजवळ येऊन बसली. मी पुस्तक वाचत होते आणि ती मला इतकी खेटून बसली की असं वाटलं तिला काही तरी सांगायचंय. मला माझ्या नातीची आठवण झाली.ती पण काही हवं असेल की अशीच जवळ येऊन बसते. 
     मी तिच्याकडे बघितलं तर तिनी तेव्हाच तिच्या शेजारी येऊन बसलेल्या तिच्या बरोबर असलेल्या बाईंकडे बघितलं.त्या बाई तिच्या बरोबर होत्या पण तिच्या ओळखीच्या नसाव्यात असं मला उगीचच वाटलं.त्या बाईंशी ती अजिबात बोलत नव्हती.
     इतक्यात गाडी अर्धातास उशिरा सुटेल अशी अनौसमेंट झाली.म्हणजे आता जवळपास सव्वा अकरा वाजणार होते.इतक्यात बहुतेक ती वाट बघत असलेला मुलगा आला.कारण ती अक्षरशः वेड्यासारखी हातातली बॅग घेऊन धावत सुटली.पण त्या मुलानं तिला काही तरी समजावलं आणि तो जाऊ लागला.ती पण त्याच्याबरोबर जायला लागली.तो तिनं 'येऊ नकोस' असं समजावत होता आणि ती मात्र त्याचा हात धरून मी नाही जाणार असं बहुतेक सांगत होती.आता सगळ्यांचच लक्ष त्या दोघांकडे जात होतं.येवढ्यात गाडीचे दरवाजे उघडले होते.आम्ही सर्वजण सामानासह चढायला सुरुवात केली. सामान चढवताना वाटतं की कशाला येवढं सामान जमवतो.जागा शोधणं,सामान लावणं,जागा ठरवणं ह्यात थोडा वेळ गेला.आणि बघितलं तर ती आमच्या सीटशेजारच्या  समोर समोरच्या सीटवर बसलेली होती.ती खिडकीतून त्या मुलाला आत ये म्हणत होती...मध्येच मला "जरा पिशवीकडे लक्ष ठेवा"सांगून दरवाजाकडे गेली.त्याला आंत यायला सांगत होती.शेवटी गाडी सुटली.आणि तो मुलगा काही चढला नाही.माझं तिच्याकडेच लक्ष होतं.ती सीटवर येऊन बसली.तिच्याबरोबरची बाईच तिला घेऊन सीटवर बसवून गेली.त्या बाईला तत्काळमध्ये बहुतेक दाराजवळचं तिकीट त्या दोन्ही मुलांनी मिळवून दिलं होतं. परीक्षांचे दिवस असल्यामुळे गाडीला खास गर्दी नव्हती. 
      आमच्या बरोबरच्या मंडळींच पत्ते, गप्पा सुरू झालं होतं. मी मात्र त्या मुलीमुळे अस्वस्थ होते. डब्यात आमच्यासारखाच अजून एक तरूण मुलामुलींचा गृप होता.त्यामुळे आमचा डबा चांगलाच गजबजलेला होता.ती बाई मध्येच येऊन तिला थोडंसं दम मारावा तस काही तरी बोलून गेली.त्या मुलीचे डोळे भरून आले होते.
      ती मुलंपण जवळच्याच डब्यात असावीत त्यांची पण एक फेरी झाली होती. त्यांनी तिला आपण कल्याणला उतरायचं असं सांगितलं आणि ती मुलगी प्रचंड अस्वस्थ झालेली जाणवली.मला काही सुचत नव्हतं.पण ती काही बोलत नाही तोपर्यंत मला किंवा कोणालाच काही करता येणार नव्हतं.माझ्यासारखीच बेचैन तिच्या समोरच्या सीटवरची मुलगी झाली होती.कारण तिथं येऊन बोलून जाणारी ती मुलं,ती बाई ह्यांना तिनं ऐकलं होतं.
      इतक्यात कुर्डवाडी येतेय अशी चर्चा सुरू झाली.'चला ब्रेक घेऊया'अशी बडबड करत पत्तेवाली मंडळी सगळ आवारायला लागली.कोणीतरी बरोबर आणलेलं खाऊया.अशी जोरदार मागणी करू लागलं.लग्नघरातून आम्हाला पूरीभाजीच्या प्रत्येकाच्या नावानं छान प्लेट पॅक करून दिल्या होत्या.पाचसहा जास्तच होत्या.मला त्या मुलीशी बोलायचा चान्स मिळाला होता. मी तिला प्लेट पूढे करून विचारलं"खाणार?"ती जशी वाटच बघत होती.तिनी पटकन प्लेट घेतली.खाण्यासाठी तिला पेपर डिश दिली.आणि तिचे डोळे चमकले.तेवढ्यात ती बाई पण तिथं आली. मी लगेच तिच्या पुढेपण प्लेट केली.तिनं अगदी अधाशासारखी घेतली.मला कळलं होतं की दोघीही भुकेल्या आहेत.
   ती बाई आपल्या जागेवर जाऊन खाऊ लागली. मी तिला अजून एक प्लेट दिली.
    मी परत जागेवर बसायला गेले आणि वरती बसून  खात असलेल्या त्या मुलीनं पटकन माझ्या हातात काही तरी लिहीलेली प्लेट दिली.
    प्लेटवर लिहीलं होतं की" मी फसलेय.मला वाचवा.मला पुण्याला उतरायला मदत करा.प्लीज मी आयुष्यभर तुमचे उपकार विसरणार नाही.....शीतल आणि खाली तिचा मोबाईल नंबर लिहीला होता.
    इतकावेळ तिला मदत करावी असा विचार करणारी मी, पण आता माझे हातपाय कापायला लागले होते.माझ्याकडे लक्ष असलेली ‌खालच्या सीटवरची मुलगी माझ्या जवळ आली आणि तिनं माझ्या हातातली ती लिहीलेली प्लेट घेऊन वाचली.आणि म्हणाली "मला वाटलच होतं.काळजी नका करू मी बघते आता काय करायचं ते!"
    त्या खालच्या सीटवरच्या मुलीनं परिस्थिती हातात घेतली होती."काकू, मी मेघना तुम्हाला फोन लावतेय रिंगटोनचा आवाज बंद करा उगीच लोकांची झोपमोड होईल"त्याबरोबर वरती शीतलनी डोक्यावरून पांघरूण घेतलं.पोरगी हूशार आहे.मला बरं वाटलं.
    हळूहळू आमच्या सीट जवळ मेघनाच्या गृपच्या मुलांच्या फेऱ्या सुरू झाल्या होत्या.तिनं सर्वांना मेसेज केला असावा.थोड्यावेळानी मला पण तिचा मेसेज आला.मेघना एका एन्.जी.ओ.साठी काम करत होती.त्यामुळे  पुण्यात उतरल्यावर त्या मुलीशी बोलून ती पोलिसांची मदत घेणार होती. मेघनाची मैत्रीण पण स्टेशनवर येणार होती.मेघना पुण्यालाच उतरणार होती.अजून तरी सगळं व्यवस्थित पार पडत होतं.आता चांगलीच रात्र झाली होती.बरीचशी मंडळी झोपली होती ज्यांना हा गोंधळ कळला होता ते झोपायचा प्रयत्न करत होते.एक गोष्ट चांगली झाली होती की ती बाई पदरानी तोंड झाकून गाढ झोपली होती. बहुतेक पोट भरल्यामुळे झोप आली असावी.
    भिगवण, दौंड करताकरता गाडी शेड्युल वेळेप्रमाणे पुण्यात रात्री तीन वाजता पोचणार होती.पण आता साडेतीन वाजले होते आणि गाडी पुण्याजवळ आली होती.पुणे स्टेशन आलं आणि उतरणारे उतरू लागले.अपेक्षेप्रमाणे ती मुलं आली.पण शीतल आणि ती बाई गाढ झोपल्याच त्यांनी बघितलं.आणि ते परत आपल्या डब्याकडे गेले.जाताना त्या बाईला उठवून लक्ष राहू दे असं सांगितलं.तिनी पण झोपेत हो हो म्हटलं.
     ते गेल्याची खात्री झाल्यावर आवाज न करता शीतल आणि मेघना दरवाजापाशी जाऊन उभ्या राहिल्या. आणि गाडी हलल्यावर पटकन स्टेशनवर उतरल्या. उतरल्या बरोबर शीतलला सर्वांनी कोंडाळे करून सेफ केलं.आम्ही सर्व खिडकीतून बघत होतो.गाडीन स्टेशन सोडलं आणि आम्ही सगळ्यांनी मोठा आणि मोकळा श्वास घेतला.
     पाचच मिनिटांनी ती बाई उठून शीतलच्या सीटपाशी आली आणि म्हणाली" गेली ना सुरक्षित?"मी आयुष्यात कधी घाबरले नसेन इतकी घाबरले होते.
    "ताई घाबरू नका. मी जागीच होते.तिला जेव्हा कल्याणला उतरवायला सांगितलं आणि मला तुम्ही नका उतरू  दादरला जा असं त्या मुलांनी सांगितलं.आणि मला कळलं की इथे काही तरी काळेबेरं आहे.आणि त्या मुलीनं तुम्हाला लिहीलेलं दिलं.आणि मी समजले की तिनं तुमच्याकडे मदत मागितलेय.आणि तुम्ही ती करताय.
        ताई,माझा मुलगा खूप आजारी आहे.त्याच्या औषधोपचारासाठी मला हा पैशाचा मोह पडला. मला ह्या लोकांनी ‌सांगितलं होतं शीतल त्या मुलाशी पळून जाऊन लग्न करणार आहे.तू फक्त शीतलला दादरला सोड आम्ही तुला पन्नास हजार रुपये देऊ.मोह पडला हो ताई! पण सगळं चुकीचं सुरू झाल्यावर मला कळायला लागलं की मी हे पाप करतेय.सुरवातीला शीतल ज्या मुलांबरोबर पळणार होती तोच ट्रेन मध्ये चढला नाही तेव्हाच माझ्या मनात पाल चुकचुकली.त्या बाईनी आम्हाला हातानं 'थांबा'अशी खूण केली.आणि फोन लावला.जे घडत होतं ते अतर्क्य होत."अरे पोरांनो,त्या पोरीनं पूणे स्टेशनवर चालत्या गाडीतून उडी मारली. मी मागे धावले पण तोपर्यंत तिनी उडी मारली होती."बाईनी मुलांना फोन करून टाकला होता.ती मुलं धावत आमच्या डब्यात आली.आणि परिस्थिती बघून परत जायला लागली.मला कसं सुचलं काय माहित मी पटकन म्हटलं "अहो,वीजेसारखी वेगात चालत्या गाडीतून उडी मारली हो त्या पोरीनं"कल्याण पर्यंत आता काहीच करता येणार नाही.हे त्यांना कळून चुकलं होतं.
        कल्याणला मी उतरून सरळ चालायला लागले.पोलीसांनी त्या मुलांना पकडलंय ते मला दिसलं होतं पण मी दुर्लक्ष करून उलट्या दिशेने चालायला लागले.
      डोंबिवलीला घरी आल्यावर जाणवलं की आपण कोणत्या अनुभवातून गेलोय."त्या मुलांच्याकडे शस्त्र असती तर,त्या मुलीनं धावत्या रेल्वेतून जीव द्यायचा प्रयत्न केला असता तर, त्या बाईच्या मनातला परमेश्वर जागा झाला नसता तर, मेघनाच त्या गाडीत नसती तर!मेघनानी जितक्या सहजतेने सगळं निभावून नेलं मी करू शकले असते?आता हे सगळं मी कोणालाही सांगेन तेव्हा ती एक सस्पेन्स थ्रिलर कथा होईल.पण माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव होता.
      दोन दिवसांनी मेघनाचा फोन आला" काकू बारावी पास झालेल्या शीतलच सुजयवर प्रेम होतं.तो काहीच करत नव्हता त्यामुळे घरातून त्यांच्या लग्नाला विरोध होता.म्हणून सुजयवर विश्वास ठेवून ती घरातून पळून मुंबईला यायला निघाली होती.सुजय ट्रेनमध्ये चढला नाही म्हटल्यावर तिला संशय आला.कारण ती त्या मुलांना ओळखत नव्हती.त्या मुलांनी तिला मोबाईलवर मेसेज करून धमकवायला सुरवात केली.तिनी मला हे सर्व मी तिला काॅल केल्यावर माझ्या नंबरवर मेसेज करून कळवलं.खूप हूशार आहे ती."मेघना बोलत होती आणि माझ्याच ह्रदयाचे ठोके मला ऐकू येत होते."काकू शीतल सुखरूप घरी पोचलीय,मीच तिला सोडायला गेले होते.""तिला तो सुजय का कोण तो त्रास नाही ना देणार?"माझा उगीचच मेघनाला प्रश्र्न होता."नाही हो काकू, तिच्या घरच्यांना मी सगळं समजावून सांगितलय"मेघना हसत म्हणाली.
     ह्या अनुभवातून एक मात्र शिकायला मिळालं की सामाजिक काम करणाऱ्या त्या येवढ्याशा मेघनाकडे योग्य दिशेने योग्य निर्णय घ्यायची क्षमता माझ्यापेक्षा निश्चितच जास्त होती.जी आजच्या काळातल्या पिढीकडे जरा खासच आहे.
            ललिता छेडा

Thursday, March 7, 2019

मनातलं माझ्या...




       मी भैरवी,चार मुलींमधली धाकटी आणि म्हणून भैरवी! मोठ्या दोघी जुळ्या बहिणी,चित्रा-गौरी,नंतरची दुर्गा आणि धाकटे आम्ही दोघे पुन्हा जुळे केदार-भैरवी.अशी आम्ही पांच भावंडं! आमचे बाबा  निरंजन देशमुख हे प्रसिद्ध गायक, संगीताचे अभ्यासक असल्यामुळे आमची नांव रागांवरून ठेवलेली होती.
      झालं असं की नुकताच माझा पंन्नासाव्वा वाढदिवस साजरा झाला. आणि गेली पंचवीस वर्षे स्त्रियांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेत मी काम करतेय त्यामुळे असं वाटलं की आपणही थोडंसं मनातलं आपल्या, बहिणींच्या आयुष्यावर लिहावं त्या लिखाणातून जर एखादा प्रसंग, एखादा विचार,कोणाला तरी जगण्याचं बळ देऊन गेला तरी....
      
    आमची आई तशी गृहिणी, जुन्या वळणाची, साधी भोळी! तिचं घर,आम्ही पांचजण आणि आमचे बाबा हेच तिचं जग होतं.
      आम्ही रहायला दादरला होतो.कोकणातून बर्‍याच वर्षांपूर्वी  नोकरीच्या ‌निमित्ताने मुंबईला आलेल्या
आजोबांनी दादरला मोठ्या चार खोल्यांचं घर घेतलं होतं.आणि सध्याच्या काळात हे तेव्हा घेतलेलं घर  आमच्यासाठी खूप मोठं वरदान ठरलं होतं.
      माझ्या दोन्ही मोठ्या बहिणी स्वभावानी आईसारख्याच आणि आम्हा धाकट्या तिघांनाही मायेनं सांभाळणार्‍या! 
     खरं म्हणजे ह्या दोघींनंतर दोन वर्षानी दुर्गा आणि त्यानंतर तीन वर्षांनी आम्ही दोघे. त्यामुळे आमच्या जन्माच्या वेळी  अवघ्या पांच वर्षाच्या असलेल्या त्या दोघींना लवकर मोठं व्हावं लागलं होत.
     आमच्या घरात मात्र सर्वांनीच काम करायचं असा बाबांनी घातलेला नियमच होता. अगदी केदारसाठी सुध्दा तोच कायदा लागू होता. मी आणि दुर्गा थोड्याशा बंडखोर,जिद्दी होतो तर दुर्गा आणि गौरी बाबांचा गाण्याचा वारसा पुढे चालवत होत्या.दोघीही संगीत विशारद आहेत.मला मात्र शिक्षणाची आवड जास्त होती. बाबांनी आम्हा सर्वांनाच शिक्षणाचं महत्त्व सांगितलेल होतं.किंबहूना किमान पदवीपर्यंत तरी शिक्षण घेतलच पाहिजे असं बजावलंही होतं.
     दुर्दैवानी केदार एक़ंदर शिक्षणात यथातथाच होता.कसा कुणास ठाऊक पण घाबरट ही होता.आईला नेहमी त्याची काळजी वाटायची.ती म्हणायची सुध्दा"ह्या चौघीजणी कशा बिनधास्त आहेत आणि हा असा कसा?मला वाटायचं की 'त्याला आमच्या चौघींच्या हूशारीचा, बिनधास्तपणाचा काॅमप्लेक्स येतोय.तस मी बहिणींना, आई-बाबांना बोलले सुध्दा होते.आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करत रहायचो. पण केदारमध्ये मात्र फारसा फरक पडत नव्हता. नशीबानी आमच्या घरचं वातावरण खूपच मोकळं आणि एकेमेकांना समजून घेणारं होतं.
       बघता बघता आम्ही सगळे मोठे झालो.
       बी.ए.झालेल्या चित्राला पुण्याजवळच्या गावातल्या स्वत:चा दुधाचा व्यवसाय असणार्‍या सधन घराचं स्थळ आलं.आणि जास्त चौकशी न करता लग्न ठरलं आणि झालं सुध्दा! 
     वर्षभरात चित्राच्या ‌चुलत दिरासाठी त्या मंडळींनी गौरीला मागणी घातली.पण तोपर्यंत चित्राचा नवरा अत्यंत तापट स्वभावाचा असल्याचं आम्हाला जाणवलं होतं.चित्रा बिचारी काही बोलत नव्हती पण नवरा बरोबर असताना तिच्या चेहऱ्यावरचे भाव सगळं सांगून जात होते.
      गौरीसाठी स्थळ घेऊन आलेल्या आमच्या लांबच्या आत्याला आमची आई म्हणत होती"जावईबापू जरा तापटच आहेत हो.पोर अगदी सुकून गेलीय. त्यावर आत्या म्हणाली "अहो वहिनी,पुरुष जरा असतातच रागीट थोड सहन केलं की झालं,बाकी सगळं चांगलं आहे ना!मग झालं तर.
      मला राहवलच नाही"आत्या, तिला खायला प्यायला मिळत नव्हतं म्हणून आम्ही लग्न करून नाही दिलंय.बाबा‌ पण चिडलेलेच होते.त्यांनी आत्याकडून चित्राच्या नवऱ्याला मी समज देणार आणि तुम्ही आणलेल्या स्थळाला संपूर्ण चौकशी केल्यावरच होकार देणार अशा दोन अटी घातल्या.
     आत्यानी पण चित्राच्या नवर्‍याला बाबांबरोबर जाऊन चांगली समज दिली. घरी आल्यावर बाबा अगदी सहज म्हणाले होते की " मुलींच्या  सासरच्यांना घाबरून न जाता मोकळेपणाने बोललं पाहिजे" आणि तेव्हाच मला कळलं होतं की माझ्यातला धीटपणा बाबांकडून आलाय.     
      चित्राच्या नवर्‍यात फारसा बदल नाही झाला पण बाबांना मात्र तो आणि त्याच्या घरचे वचकून राहू लागले.
      त्यानंतर आलेल्या स्थळाची पूर्ण चौकशी करून गौरीच लग्न झालं.तिचं नशीब असं की तिला मुलं नाही झाली.सुरवातीला तिला सासरी थोडा त्रास झाला.देवदेवस्की, अनेक डॉक्टरांचे उपाय वगैरे झालं दोघांमध्ये काही दोष नव्हता पण मुलं नाही झाली.थोड्या वर्षांनी गौरीनी तिचं गाण पुन्हा सुरू केलं आणि त्यात चांगलच नांव कमावलं. ह्यासगळ्यात तिच्या नवऱ्यान मात्र तिला चांगली साथ दिली.
      दुर्गानी ह्या सगळ्या लग्नांच्या गडबडीत स्वत:च एम्.एस्.सी. पूर्ण केलं होतं.तिला पी.एच्.डी करायचं होतं पण आधी स्वत:च्या पायावर उभी रहायचं असं ठरवल्यामुळे ती नोकरीच्या शोधात होती.ती ललित लेखन करत असे.महिला सक्षमीकरण हा तर तिच्या लिखाणाचा खास आवडीचा विषय होता.ह्या लिखाणाच्या माध्यमातून तिची  ओळख पत्रकार अशोकशी झाली.आणि आमची बंडखोर विचारांची दुर्गा त्याच्या प्रेमात पडली.आमच्या घरातून नकार नव्हताच पण त्याच्या घरातलं वातावरण मात्र तिच्या विचारांशी सहमत असेल असं जाणवत नव्हत.आणि तसंच घडलं.लग्नानंतर सासूने तिला नोकरी करायला ठाम नकार दिला.आणि अशोक पण आपल्या आईच्या विरोधात जायला अजिबात तयार होत नव्हता. भांडूप मधल्या एका सोसायटीतल्या घरात दीर,जाऊ,त्यांची दोन मुलं, सासु अशा कुटुंबात तिची घुसमट होऊ लागली.अशोक वेगळं रहायचं तर आई आपल्या बरोबर रहाणार असं म्हणू लागला.
     दुर्गानी घरात कोणालाही न सांगता पुण्याच्या काॅलेजात नोकरी धरली.आणि ती तिथेच भाड्याच्या घरात राहू लागली.अशोकनी तिथे येऊन तिच्याबरोबर रहावं म्हणून तिनं अनेकदा बोलावलं पण त्याचा ईगो आड येत होता.आणि दुर्गाचा घटस्फोट झाला.
      दुर्गानी तिच्या लेखनानं खूप नांव काढलं.काॅलेजच्या नोकरीतही ती छान रमली होती.पुण्यातच तिनं स्वत:च घर घेतलं. खूप महत्त्वाचं म्हणजे तिनं बाबांच्या शेवटच्या आजारपणात अतिशय जबाबदारीनं त्यांचं सर्व काही केलं.आई तर त्याकाळात सारखी म्हणायची"आपण उगीच मुलगा,वंशाचा दिवा वगैरे म्हणतो पण ह्या पोरीने तर कमाल केलीय.किती मनापासून करतेय सगळं!
     केदार पण लग्नानंतर थोडासा बदलला.त्याची बायको पण आम्हा बहिणींना सांभाळून घेत होती. मी तर त्यांच्या घरातच रहात होते.कारण मी लग्नच केलं नव्हतं.....
     माझ्या बाबतीत मी जे काही ठरवतं होते ते कधीच होत नव्हतं.'निनाद' आमच्या घरासमोर रहाणारा, माझा शाळेपासूनचा अगदी जवळचा मित्र.इतका जवळचा की आम्ही दोघे लग्न करणार हे जवळजवळ निश्चितच होतं.मला खरं म्हणजे सी.ए.व्हायचं होतं.पण निनाद म्हणाला म्हणून त्याच्या बरोबर सिव्हील इंजिनिअर झाले.मी शेवटच्या वर्षाला पहिली आल्यामुळे असेलही पण मला लगेच सरकारी नोकरी मिळाली.मला खरं म्हणजे स्वतंत्र व्यवसाय करायचा होता.पण पुन्हा निनाद म्हणाला"मी व्यवसाय सुरू करतो,सेटल झालो की तू जाॅईन हो.
      निनादच व्यवसाय, नोकरी काहीच जमत नव्हतं. तरी सुद्धा माझी आई त्यांच्या घरी जाऊन आपण लग्नाच ठरवून तरी ठेवूया का? असं विचारायला गेली.तर पठ्ठ्यानं "आम्ही दोघं फक्त मित्र आहोत.माझ्या तसं काही मनातही नाही" अस सर्वांसमोर बिनदिक्कत सांगितलं.
   आई तर अक्षरशः शाॅकमध्येच परतली."अग,तुम्हा दोघांच काही बोलणंच नव्हतं का झालं?"आईनी हताशपणे विचारलं. मी हिला काय सांगू? आम्ही बोलण्याच्या किती पूढे गेलो होतो.दुर्गाला कल्पना होती.त्यामुळे हे कळल्यावर ती लगेच आली.तो असं का वागला ह्याची मला पुसटशी सुध्दा कल्पना येत नव्हती.पण अपमानानी मात्र मी प्रचंड दुखावले होते.
     दूर्गा त्यांच्या घरी जाऊन त्याला खूप बोलून आली.
      थोड्याच दिवसांनी निनादच एका बड्या बिल्डरच्या मुलीशी थाटामाटात लग्न झालं. आणि त्याच्या स्वार्थी वागण्याचा अर्थ कळला.आपल्याला इतके वर्षात तो कळलाच नाही ह्याचा खूप संताप आला.
     पण लग्न न करण्याचा मात्र मनाशी निर्णय घेतला.
         त्यानंतर अवघ्या तीन वर्षात त्याच्या पदरात वर्षाचा मुलगा ठेवून त्याची बायको कॅन्सरनी गेली.त्यानंतर अधूनमधून माझ्या ऑफिस

 काही काम घेऊन निनाद यायला लागला.भेटला की साॅरी म्हणूनच बोलायला सुरवात करायचा.
       पण त्यानं दिलेलं फसवणूकीच दु:ख इतकं मोठं होत की तो माफ करायच्या लायकीचा सुध्दा मला वाटत नव्हता. 
       माझ्या नोकरीनं मला इतक्या मोठ्या संधी मिळाल्या, कर्तृत्ववान व्यक्तींचा सहवास मिळाला की हे सगळं विसरायला झालंय.
      पण एखादी संध्याकाळ एकटेपणा जाणवून व्याकुळ करते.
   आज मागे वळून बघताना वाटतं "आम्ही बहिणींनी आम्हाला पडलेल्या ज्या प्रश्र्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला ते प्रश्र्न कदाचित आता जुने झाले असतील पण त्यात महत्त्वाचं होतं आम्हाला घरच्यांनी दिलेलं लढण्याचं बळ! जे कोणत्याही  पिढीला आवश्यक असतं.
       सध्याचा जास्त महत्त्वाचा प्रश्र आहे 'महिलांची सुरक्षितता' आणि त्यासाठी पुन्हा एकदा घरातलं,समाजातलं वातावरण जे स्त्री-पुरुष समानता मानणारं असायला हवं असं मला मनापासून वाटतंय!       
     एक स्री म्हणून स्वत:ला शोधताना जे मनात माझ्या आलंय.....
मला खात्री आहे तेच अर्थात तुमच्याही मनातअसणार...
                                          ललिता छेडा
         जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा